पावसाच्या धारांसोबत गारा पडल्या की, त्या हातावर झेलून खाण्यासाठी लहानग्यांबरोबर मोठय़ांचीही धावपळ व्हायची. पण, या गारा संत्र्याएवढय़ा आकाराच्या आणि सारे काही उद्ध्वस्थ करणा-या असू शकतात, याची कल्पनाही कुणाला आली नसेल. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या गारपिटीने चांगलेच रडवले. घरांच्या नुकसानीसह शेतीची वाताहत झाली. कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. विदर्भ-मराठवाडय़ाला या गारपिटीचा मोठा फटका बसला. हाता-तोंडाशी आलेला घासच जणू गारपिटीच्या प्रकोपाने हिरावून घेतला. या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी गारपीटग्रस्तांना आता मदतीची अपेक्षा आहे.
शेतक-यांच्या तोंडचा घास हिरावला
आपल्या राज्यातील शेतकरी तिस-या नैसर्गिगक संकटाला तोंड देत आहेत. आधी दुष्काळ, नंतर अतिवृष्टीमुळे उशिरा झालेल्या पेरणीमुळे खरीप हंगामात काहीही हाती न आलेल्या शेतक-यांचे रब्बीत सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने कंबरडे मोडले आहे.
मागील पंधरा दिवसांपासून विदर्भातील अकरा जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले आहे. अस्मानी संकटाने शेतकरी, शेतमजुरांच्या आयुष्याची घडी विस्कटून टाकली आहे. एकीकडे नसíगक आपत्ती ओढवली असतानाच लोकसभा निवडणुकीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. महाराष्ट्रात कधीही झाली नाही अशी गारपीट या वेळी झाल्याने संकटाचे गांभीर्य ओळखून आपद्ग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे.
राज्यकर्त्यांनी प्राधान्यक्रम ठरवताना अस्मानी संकटातून शेतकरी, शेतमजुरांना आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी पावले उचललीच पाहिजेत. ‘राजाने मारले अन् पावसाने झोडपले’ तर तक्रार कुणाकडे करायची, अशीच गत महाराष्ट्रासह विदर्भातील शेतकरी, शेतमजुरांची झालेली आहे.
शेतक-यांच्या आशा रब्बी हंगामावर केंद्रित होताच एकाएकी सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. गारपिटीने शेतीसह पशुधनाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भाचा विचार केल्यास सात लाख हेक्टरवर धान्यांचे पीक घेण्यात येते. भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान्यांचे ३० ते ४० हजार हेक्टरवरील दुबार पिकाचे नुकसान झाले आहे. या भागातील मोरगाव अर्जुनी, खंडाळा परिसरात मालगुजारी तलावातील सिंचनावर हे पीक घेण्यात येते. त्याचे नुकसान झाले आहे.
याशिवाय वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, यवतमाळ जिल्ह्यातील वणी या भागात ५ ते ६ हजार हेक्टरवर घेण्यात येणा-या जवस या तेलबिया पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच रब्बी ज्वारीचेही नुकसान झाले आहे. अमरावती, यवतमाळ भागातील संत्रा पिकाला गारपिटीचा फटका बसला आहे. फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान येणा-या बहराला आंबिया बहर म्हणतात. तसेच संत्र्याला जून, जुलैमध्ये मृग बहर येतो. या अवकाळी पावसाने मृग बहरातील संत्री, आणि आंबिया बहराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा संत्र्यांचे उत्पादन घटणार आहे.
विदर्भात नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्यात जवळपास सव्वा लाख हेक्टरवर (फळधारणा होणारी ९० हजार मोठी झाडे) संत्र्याचे पीक घेतले जाते. या फळपिकाचा मृग बहर ६० ते ७० टक्के खाली आला आहे. त्यामुळे शेतक-यांसह संत्रा काढणी करणा-या कंत्राटदारांवरही संकट ओढवले आहे. आंबिया बहराचे नुकसान झाल्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये येणा-या संत्राच्या पिकाचे प्रमाण घटणार आहे. त्यामुळे संत्र उत्पादकांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
याशिवाय मोसंबी, लिंबू या पिकांचीही मोठी हानी झाली आहे. राज्यात १५ लाख हेक्टरवर फळपीक घेतले जाते. त्यात विदर्भातील ४ ते ५ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. वर्हाडातील बागायती कापसाचेही नुकसान या गारपिटीने झाले आहे. त्यात बहुतांश बीटी कापसाचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, तासगाव, नाशिक या भागातील द्राक्षांच्या पिकाचेही गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
या भागातील बेदाणा उद्योगालाही गारपिटीचा फटका बसला आहे. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लाखनवाडा, अमडापूर परिसरात जवळपास १ हजार ८०० ते २ हजार हेक्टरवर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. त्याचेही नुकसान गारपिटीने झाले आहे. संत्रा, िलबू, मोसंबीसह आंब्याचा मोहर नष्ट झाल्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. डाळवर्गीय पिकांमध्ये येणा-या तुरीचेही नुकसान झाले आहे. यासह रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या गहू आणि हरभ-याचे एक लाख हेक्टरहून अधिक नुकसान झाले आहे.
गारपिटीने कोंबडय़ा, बक-या मृत झाल्या. गाय, म्हैस ही दुधाळ जनावरे मृत आणि मोठय़ा प्रमाणात जखमी झाल्यामुळे शेतक-यांच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील पक्क्या ३ हजार ५०० आणि ५ हजार ३२० कच्च्या घरांची पडझड झाली आहे. एकंदर ग्रामीण जीवनमान अवकाळी पाऊस, गारपिटीने विस्कळीत झाले आहे. पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीची शेतक-यांना कमीअधिक प्रमाणात भरपाई मिळेलही परंतु ज्यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीच्या कामावर आहे, त्या शेतमजुरांचे काय, त्यांना कोण मदत देणार, त्यांचे अश्रू कोण पुसणार, मनरेगाची कामेही या काळात होत नसल्यामुळे त्यांना आधार राहिलेला नाही.
शेतीचे नुकसान झाल्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी सोंगणीची कामे त्यांना मिळणे कठीण आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे. देशाच्या कृषिमंत्र्यांना पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी बैलगाडीतून प्रवास करण्याची वेळ येते, यावरून या नसíगक संकटाची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र, राज्य सरकारने २००३च्या कायद्यानुसार शेतक-यांना सरसकट मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे.
सर्वेक्षण, पंचनामा या प्रक्रिया सुरू राहतील. मात्र आज आपद्ग्रस्तांच्या घरातील चूल पेटवण्याची, त्यांना आधार देण्याची, त्यांना आरोग्य सुविधा पुरवण्याची गरज आहे. केंद्रीय पाहणी पथकाने विदर्भातील या भागाचा दौरा केला असून त्यांच्या अहवालानुसार मदत कधी मिळेल, याची आस धरून शेतकरी आहेत. विशेष म्हणजे शेतक-यांना यापूर्वी झालेल्या अतिवृष्टी, खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्याचादेखील विचार या निमित्ताने करण्याची गरज आहे. एरव्ही आपल्या कष्टाने सगळ्यांना भरभरून अन्नधान्य पुरवणा-या बळीराजाला काहीतरी मदत करण्याची वेळ आली आहे. नेले जरी घराला, वाहून पावसाने डोळ्यांतल्या घनांना, हासून आवरू द्या नाहीतर शेवटी नेहमीप्रमाणे शेतक-यानां स्वत:चीच समजूत काढावी लागेल.
मागील अनेक वर्षापासून हवामानात झालेला बदल आश्चर्यकारक आहे. पूर्वेकडून येणारे बाष्प आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे वर जात असल्यामुळे त्यांच्या संयोगातून ही गारपीट होत असल्याचे दिसून येते. हा हवामानातील बदलता चक्रवात आहे. ही स्थिती विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत आणखीन काही दिवस हे वातावरण कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओदिशाकडे हा चक्रवात सरकत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतीसह पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या काळात काही ठिकाणी गारपिटीने काश्मीरसदृश वातावरण निर्माण झाले आहे.
– डॉ शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ