मुरबाड तालुक्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले असल्याने हे मार्ग धोकादायक ठरत असतानाच, आता दूधनोली नदीवरील पुलाच्या पायााचे चिरे गायब झाल्याने हा पूल जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.
मुरबाड – मुरबाड तालुक्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले असल्याने हे मार्ग धोकादायक ठरत असतानाच, आता दूधनोली नदीवरील पुलाच्या पायााचे चिरे गायब झाल्याने हा पूल जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.
म्हसा-धसई हा रस्ता प्रमुख रहदारीचा मानला जातो. या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात एसटी बस वाहतूक, खासगी वाहनांची वाहतूक होत असते. अनेक विद्यार्थी, ग्रामस्थ या मार्गावरून प्रवास करतात. परंतु दोन दिवस पडणा-या पावसामुळे या पुलाजवळील मातीचा भाग व संरक्षक भिंत खचून रस्त्यालगत मोठी खिंडार पडली आहे. हा मार्ग अरुंद असल्याने येणा-या-जाणा-या वाहनांसाठी हा पूल जीवघेणा ठरू शकतो. नदीत अनेक ठिकाणी रेतीउपसा केल्याने नदीचे पात्र बदलत आहे. त्यामुळेच हे पुलाच्या पायाचे चिरे गायब झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
परिणामी रस्त्याला लागूनच हा मोठा खड्डा पडल्याने रात्री-बेरात्री येणा-या-जाणा-या वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन हा खड्डा लवकरात लवकर बुजवून नदी बाजूला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी होत आहे.
नदीतून रेतीउपसा केल्याने नदीचा मुख्य प्रवाह बदलला आहे. या पुलाच्या बाजूची संरक्षक भिंत तुटल्याने हा रस्ता खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत माहिती दिली असता, त्यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.- संजय वडवले, स्थानिक ग्रामस्थ, दूधनोली
याबाबत प्रथम सरकारकडे अहवाल पाठवावा लागेल. या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर हे काम करण्यात येईल. – ए. वाय. चौगुले, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरबाड