भाजप आणि आरएसएस महिलांचा आदर करत नाहीत, असा आरोप करत महिलांच्या हाती जास्तीत जास्त सत्ता दिल्याशिवाय भारत कधीही महासत्ता बनू शकत नाही, असे ठाम मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
तुमकुर- भाजप आणि त्यांची वैचारिक संघटना असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलांचा आदर करत नाहीत, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. महिलांसाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. आरएसएसमध्ये महिलांना कोठेही स्थान नाही. ते काय बोलतात आणि काय करतात हे कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही, हे सर्वांनाच माहीत आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलांचा तसेच त्यांच्या विचाराचा आदर करत नाहीत. त्यांच्या संघटनेत महिलांना स्थान नाही, असे सांगत त्यांनी भाजप व आरएसएसवर हल्लाबोल केला. देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान हवे आहे. त्यासाठी आम्ही पक्षाचे दरवाजे नेहमी खुले ठेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्ष महिलांच्या सशक्तीकरणासाठी बांधील असून निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. महिलांच्या हाती जास्तीत जास्त सत्ता दिल्याशिवाय भारत कधीही महासत्ता बनू शकत नाही. जेथे कुठे महिला सशक्त आहेत किंवा त्यांना संधी दिली गेली आहे, ती राज्ये आज जलद गतीने प्रगत होत आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती केल्याचे राहूल यांनी यावेळी सांगितले. मनरेगा, महिला आरक्षण आणि अन्य विकासात्मक कार्यक्रमातून काँग्रेस सरकारने महिलांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध केली आहे.
राजकारणातही महिलांना समान संधी देण्याची आमची इच्छा असून ग्रामपंचायत, विधानसभा, संसदेत जास्तीत जास्त महिला दिसल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान हवे आहे. त्यासाठी आम्ही पक्षाचे दरवाजे नेहमी खुले ठेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी निडर होऊन रात्रीच्या वेळी फिरण्याचा असा एक दिवस नक्की येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांसाठी शाळा, रुग्णालये आणि संसदेची दारे उघडलेली आहेत. महिलांशिवाय प्रगती होऊच शकत नाही, यासाठी प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही राहूल यावेळी म्हणाले.