सध्या देशात जे चालले आहे; त्याचे वर्णन करण्यासाठी ‘असहिष्णुता’ हा शब्द अपुरा असल्याची टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी मोदी सरकारवर केली.
पुणे- सध्या देशात जे चालले आहे; त्याचे वर्णन करण्यासाठी ‘असहिष्णुता’ हा शब्द अपुरा असल्याची टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी मोदी सरकारवर केली. कोणी काय खावे, यावरून या देशात हत्या होत असेल तर ‘असहिष्णुता’ हा शब्दही कमी पडतोय, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, रॉय यांच्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फुले वाडय़ाबाहेर जोरदार निदर्शने केली.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुले वाडय़ात अरुंधती रॉय यांना ‘महात्मा फुले समता पुरस्कारा’ने समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
रॉय यांनी देशातील सद्य:स्थितीवर जोरदार ताशेरे ओढले. सध्याचे देशातील वातावरण हे असहिष्णुता म्हणण्यापेक्षाही घातक आहे. देशात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अनेक लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. सध्याच्या सरकारमधील लोकच भारत हे हिंदू राष्ट्र आहे, असे सांगत आहेत. अशा बाबींमुळेच देशातील सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. कोणी खाय खावे, कोणते कपडे घालावेत, हे तुम्ही ठरवणार आहात काय? असा सवाल त्यांनी केला.
फुले दाम्पत्य, आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला; तरीही त्यांच्या हिंदुकरणाचा प्रयत्न केला जात आहे. महात्मा फुलेंनी हिंदू धर्मातील प्रथा-परंपरांवर आसूड ओढले. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यामुळेच केली होती. आंबेडकर यांनीही हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला, मात्र आता फुले-आंबेडकरांना हिंदुत्ववादाशी जोडले जात आहे. यामागे सरकारचा काही विशिष्ट हेतू आहे. घरवापसीवरही त्यांनी जोरदार टीका केली. दलित, मागासवर्गीय, आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन यांना दहशतीखाली जगण्यास भाग पाडले जात आहे.
देशातील दलित, अल्पसंख्याक व बहुजन असुरक्षित आहेत. तसेच सर्व ठिकाणी हिंदुत्वाचे भाट असल्याचा घणाघात त्यांनी या वेळी केला. समाजसुधारकांचे हिंदुकरण करण्याचा भाजपा सरकारचा डाव असून, हा बौद्धिक भ्रष्टाचारच आहे. कधी आणि कुठून हल्ला होईल, याची शाश्वती राहिलेली नाही. मारल्या गेलेल्या व्यक्तीपेक्षा काल्पनिक गाय अभिप्रेत असणा-या नव्या सत्तेच्या वरवंटय़ाखाली सध्या सर्व जण भरडले जात आहेत.
भाजपा सरकार विकासाचा बागुलबुवा करतात. भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. प्रत्यक्षात हीच मंडळी बौद्धिक भ्रष्टाचार करून जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी तोफही रॉय यांनी डागली.