देशात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच सर्वच राज्यांमध्ये जवळपास ५.५० लाख पोलिसांची पदे रिक्त आहेत.
नवी दिल्ली- देशात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच सर्वच राज्यांमध्ये जवळपास ५.५० लाख पोलिसांची पदे रिक्त आहेत. ही पदे एक वर्षाच्या आत भरावीत, असे आदेश केंद्राने सर्व राज्य सरकारना दिले आहेत.
केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना केंद्रीय गृहखात्याने पत्र पाठवली आहेत. केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी सांगितले की, सर्वच राज्यांकडे पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे २००९ ते २०१३ या कालावधीत देशातील गुन्ह्यांची संख्या २१,२१,३४५वरून २६,४७,७२२वर पोहोचली होती. त्यामुळे देशातील पोलिसांची रिक्तपदे कालबद्ध योजनेनुसार भरावीत. उत्तर प्रदेशात १,०१,१००, गुजरातमध्ये ४५,१९१, पश्चिम बंगाल ३८,७२५, आंध्र प्रदेशात ३२,२४७, हरियाणा २२,४४०, छत्तीसगड २०६७०, तामिळनाडू २०,२७४, कर्नाटक १९,२५१, बिहार १७,३५२ आणि पंजाबमध्ये १७,३५२ मध्ये पोलिसांची पदे रिक्त आहेत.
देशातील गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता सर्व राज्य सरकारनी पोलिसांच्या पदांचा पुर्नआढावा घ्यावा, असे गोस्वामी यांनी सांगितले.
पोलिसांच्या कमतरतेमुळे कायदा व सुव्यवस्थेची घडी प्रभावीपणे बसण्यासाठी आणि नागरिकांचा आत्मविश्वास कायम राहणे गरजेचे आहे. कारण पोलिस हे नागरिकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करत असतात, असेही ते म्हणाले.
१ जानेवारी २०१३ मध्ये देशात २२,०९,०२७ पदे मंजूर केली होती. त्यापैकी १६,६०,६६६ पदे भरली आहेत तर ५,४८, ३६१ पदे रिक्त आहेत.