गावातल्या बांदेश्वरच्या जत्रेसाठी दादू पराडकर बांबरवाडीत आला होता. जत्रेचं निमित्त तर होतंच! पण पराडकर आणि बापू गुरवाच्या घरामध्ये असलेल्या आंब्याच्या कलमावरून गेले कित्येक महिने त्या दोन कुटुंबात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे विश्वनाथ पराडकराने दादूला म्हणजे आपल्या मुलाला गावी बोलावलं होतं.
गावातल्या बांदेश्वरच्या जत्रेसाठी दादू पराडकर बांबरवाडीत आला होता. जत्रेचं निमित्त तर होतंच! पण पराडकर आणि बापू गुरवाच्या घरामध्ये असलेल्या आंब्याच्या कलमावरून गेले कित्येक महिने त्या दोन कुटुंबात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे विश्वनाथ पराडकराने दादूला म्हणजे आपल्या मुलाला गावी बोलावलं होतं. बापू गुरवाच्या बायकोचं म्हणणं होतं की, आंब्याच्या कलमाचा थोडासा बुंधा पराडकरांच्या कंपाऊंडमध्ये गेल्याने त्या कलमावर ते हक्क दाखवत होते. पण खरं म्हणजे आपल्या सास-यानेच ते आंब्याचे कलम लावलं होतं. अर्थात त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झालेली ही केस कोर्टात चालू होती. त्या केससंदर्भातच विश्वनाथाने दादूला गावी बोलावलं होतं.
पण जेव्हा बापू गुरवाच्या घरामागच्या पडवीत दादूला अठरा-वीस वर्षाची एक सुंदर पोरगी नजरेस पडली आणि ती पोरगी बापूची पुतणी असल्याचं कळलं, तेव्हा सुरुवातीला कलमाच्या हक्कासाठी तणतणणारा दादू शांत झाला. बापू गुरवाच्या घरामागची पडवी आणि पराडकरांच्या घरासमोरची बाजू समोरासमोर येत असल्याने दिवसभरात दादूला खूप वेळा त्या पोरीचं दर्शन घडलं.
बापूच्या पुतणीला बघून दादू अक्षरश: तिच्या प्रेमात पडला आणि त्याचवेळी त्या कलमावरचा हक्क सोडण्याचा कौल त्याच्या प्रेमळ मनाने दिला. पण जेव्हा त्याने आपल्या वडिलांना म्हणजेच विश्वनाथ पराडकराला आपण केस मागे घेवूया असं सांगितलं, तेव्हा विश्वनाथ दादूवर भयंकर भडकला आणि म्हणाला,
‘दादू, तुजा डोक्या तर फिरला नाया ना? अरे, इतकी वर्सा कोर्टात केस चालू आसा. आनी त्या केशीत किती पैशे गेले हय़ेची तुका कल्पना हा?’
‘तरी पण आप्पा, उगाच रोजरोजची भांडणं होण्यापेक्षा कुणीतरी माघार घेतलेली बरी!’ बापूच्या पुतणीच्या प्रेमात आंधळा झालेल्या दादूने सामंजस्यपणा दाखविला. पण विश्वनाथाने त्याला अजिबात न जुमानता सांगितलं,
‘हय़ां बग दादू, तू आसतंस मुंबय्त! तुका आमचा मरान कळाचा नाय. त्येच्यापेक्षा तू हय़ां भानगडीत पडा नूको. जो काय निर्णय होतलो तो आता कोर्टातच!’ विश्वनाथाने शेवटचं सांगून टाकलं आणि बापूच्या पुतणीला कटवण्यातला मोठा अडथळा होता तसाच राहिला. दरम्यान, बापाच्या नकळत दादूने बापूच्या बायकोची भेट घेऊन तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही अयशस्वी ठरला. कारण दादूला दारात पाहिल्यावरच बापूची बायको कुत्र्यासारखी त्याच्या अंगावर गेली.
तरीही स्वत:कडे कमीपणा घेत दरवाजाच्या बाहेर उभा राहून तो तिला म्हणाला, ‘काकी, आपण शेजारी असून अशी भांडणं बरोबर दिसत नाहीत. त्यापेक्षा एक वर्ष कलमाचं उत्पन्न तुम्ही घ्या. एक वर्ष आम्ही घेतो, किंवा प्रत्येक वर्षी अर्धी-अर्धी वाटणी करू.’ दादूच्या या सल्ल्यावर विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहात बापूची बायको त्याला म्हणाली,‘अर्धा-अर्धा करूक कलाम काय तुज्या बापाशीन लावल्यान नाया. माज्या सास-याची आठव हा ती! त्येच्यार मी दुस-या कोनाचो हक्क गाजव्क देवचंय नाय.
तेवा इलंस तसो तू वाटेक लाग आनी पुन्हा माज्या दारात पाय ठेव नूको. तंगडा तोडून ठेवीन.’ असं म्हणून धाडकन् तिने दरवाजा लावून घेतला आणि बापूच्या पुतणीचं दर्शन न घेताच दादूला माघारी फिरावं लागलं.
दरम्यान, एक दिवस ती मुलगी आपल्या मागच्या परसात भांडी घासत असताना संधी साधून दादूने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळी नाम्याच्या भाचीच्या बाबतीत जे झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये असं त्याला वाटत होतं.
कारण बांबरवाडीत पहिल्यावेळी तो प्रेमात पडला ती पोरगी पार बहिरी निघाली होती. म्हणूनच त्याने संधी मिळाल्यावर तिच्याशी संवाद साधला. ती भांडी घासत होती, त्याच्या बाजूलाच गुलाबाचं एक झाड होतं. त्या गुलाबावर सुंदर फुलंही फुलली होती. ती फुलं बघून दादूने प्रेमळपणाने तिला विचारलं,‘गुलाबाचं झाड कुणी लावलं?’ दादूच्या या प्रश्नावर तिची मान मात्र खालीच होती. आपल्याकडे ती बघतही नसल्याचे पाहून दादूने पुढचे डायलॉग चालू केले.
‘मला खूप आवडतो गुलाब! गुलाबाची फुलं छान-छान असतात. लाल, पिवळी, निळी, हिरवी.. तुझ्या डोक्यात छान दिसतील. पण शेणखत घाल.. गुलाबाला. फुलं आणखी फुलतील.’ तरीही ती बोलत नसल्याचे पाहून दादू थोडा वेळ थांबला आणि मग म्हणाला, ‘आमच्यावर राग आहे वाटतं!’ त्या पोरीने ऐकलं न ऐकल्यासारखं केलं आणि धुतलेली भांडी घरात नेऊन मागचा दरवाजा बंद करून टाकला.
दोघांच्या घरच्या लोकांना बाजूला करून डायरेक्ट पोरीशीच संपर्क साधून प्रेम सफल करण्याचा त्याचा शेवटचा मार्गही अस्थिर झाला होता. आणि अशातच त्याचा गावचा खास मित्र राजा पाटकराने संध्याकाळी त्याला बातमी दिली की, बापूच्या पुतणीचं लग्न ठरलं. त्या बातमीने दादू भयंकर अपसेट झाला. त्या पोरीच्या प्रेमात आंधळा झालेल्या दादूला तो मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून तो स्वत:ला सावरूच शकला नाही. राजा पाटकराला तो म्हणाला,
‘असं कसं ठरेल लग्न? मी हे लग्न कधीच होऊ देणार नाही.’
‘काय करतलंस तू?’
‘मी अॅक्शन घेईन. माझं प्रेम हाय तिच्यावर! मी सांगेन तिला.’
‘कदी सांगतलंस? त्येच्या पयल्या बाळंतपनात?’
‘अरे, पण मी करू तरी काय? कलमाच्या या भांडणात माझ्या प्रेमाला तुडतुडा लागलाय.’ हतबल होऊन दादू म्हणाला.
‘दादू, तू अजिबात निराश होव नूको. अरे कसो झालंस तरी तू माजो मित्र आसस. तुज्यासाठी मी काय वाटात ता करतंलय. आपन सरळ त्या पोरीकच पळवया.’
‘काय?’ राजा पाटकराचा सल्ला ऐकून दादू उडालाच.
‘तू घाबरा नूको. जा करूचा हा ता सगळा मी करतंलय. तू फक्त तूजो हात ढिलो सोड. माजो एक मानूस हा. त्येका दोन हजार रुपये देव्क लागतले. ते तू माज्याकडे देव्न ठेव.’ राजाच्या या बोलण्यावर दादू म्हणाला,
‘पण तो नेमकं करणार तरी काय?’
‘आदी आयकान तर घे. माजो मानूस त्या पोरीक बेशुध्द करून गोणत्यात घालून पळवतलो. तू फक्त कनकवलेक माज्या मित्राच्या घराकडे थांबान ऱ्हव. आमी बापूच्या पुतणीक घेव्न थंयसर येतव. त्येका तुज्यावांगडा लग्नासाठी राजी करूचा पन माजोच मानूस बगतलो. पन लगीन झाला की तू मातर मुंबय्क सटक.’ अशाप्रकारे राजाने सगळा प्लॅन दादूला सांगितला.
त्या पोरीच्या प्रेमात आंधळा झालेल्या दादूने डोळसपणे त्याला लगेच मान्यताही दिली. ए. टी. एम. मधून दोन हजार रुपये काढून त्याने राजाकडे दिले आणि दुस-या दिवशी मुंबईला जातो असं सांगून दादूने कणकवलीला राजाच्या मित्राच्या घरी आपला मुक्काम हलविला. त्या पोरीसाठी जीव ओवाळून टाकायला तयार झालेल्या दादूला फक्त दोन हजार रुपयात आपण प्रेमात पडलेली आणि एकतर्फी प्रेमावरून लग्नासाठी तयार झालेली पोरगी मिळत होती. आणि तेच त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं.
प्लॅन ठरलेल्या दुस-या दिवशी पहाटे तीन वाजता कणकवलीच्या राजाच्या मित्राच्या घरचा दरवाजा खटखटला. रात्रभर जागत राहिलेल्या दादू पराडकराची प्रतीक्षा संपली. क्षणाचाही विलंब न लावता त्याने दरवाजा उघडला. राजा आणि त्याच्या दोन मित्रांनी भरलेलं पोत आत सरकवलं. ते पोतं पाहताच कधी एकदा बापूच्या पुतणीचं दर्शन घेतो असं दादूला झालं.
आपल्या प्रेमाच्या मूर्तीला बाहेर काढण्यापूर्वीच सगळय़ांच्या नकळत दादूने बाहेरूनच त्या पोत्याचं एक ओझरतं चुंबन घेतलं. पण प्रत्यक्षात त्या पोत्याचं तोंड उघडल्यावर बापूच्या पुतणीऐवजी बापूच्या कैदासीन बायकोचं तोंड दिसल्यावर दादूची दातखिळीच बसली.
अजूनही बेशुध्द अवस्थेत असलेल्या त्या भांडखोर बाईचं तोंड उघडण्यापूर्वीच दादूने पोत्याचं तोंड बंद केलं आणि निराश व घाबरलेल्या अशा द्विधा मन:स्थितीत तो राजाला म्हणाला, ‘राजा, हे आणखी दोन हजार रुपये तुझ्या माणसाला दे आणि ताबडतोब आताच्या आता या बाईला तिच्या घरी सोडायला सांग. मी आता मिळेल त्या गाडीने इथूनच मुंबईला निघतो.’