जिथे जिथे मानवी वस्ती आहे, तिथे तिथे कायदा आहे. कायदा म्हणजे काय? तर संपूर्ण समाजाने, निदान त्या-त्या समाजातील बहुसंख्य लोकांनी, परस्पर व्यवहाराच्या सोयीसाठी, एकमताने निर्माण केलेले आणि सर्वाना बंधनकारक असलेले दंडक! कायदा हा सर्व माणसांनी पाळावयाच्या नियमांचे सर्वमान्य रूप असतो. तो दंडक असतो म्हणजे तो मोडल्यास दंड होणे नक्की असते. काही अतिक्रूर गुन्ह्यात देहदंडही असतो. जर दंड होणार नसेल तर कायदा हे केवळ सुभाषित बनते.
सुभाषित चांगलेच असते. पण ते केवळ त्याचे पालन करणा-यानाच चांगले वाटते. जे त्याचे पालन करणे गरजेचे मानीत नाहीत किंवा त्याला झुगारून देतात त्यांना सुभाषित किंवा सुभाषितांचे रचनाकार काहीच शिक्षा करू शकत नाहीत. (आपल्या देशात अलीकडील काही खटल्यांचा निकाल पाहता अतिश्रीमंत गुन्हेगार आणि त्यांच्या अत्यंत हुशार वकिलांनी कडक अशा प्रत्येक कायद्यालाही सुभाषितांचा दर्जा आधीच बहाल केला आहे हा भाग वेगळा!) मात्र ख-या लोकशाहीत कायदा म्हणजे लोकांची इच्छा, जेव्हा लोकांच्या सहमतीने, सर्वाना बंधनकारक बनते तेव्हा ते विधान कायदा म्हणविले जात असते. सुभाषित मात्र कुणालाही बंधनकारक नसते. ती केवळ एखाद्या सज्जन माणसाची माणसाने माणसाशी कसे वागावे त्याबद्दलची इच्छा असते. ती कुणावर लादता येत नाही.
माणसाच्या प्रगतीमधील टप्प्यात आदिम माणूस जेव्हा सुसंस्कृत होऊ लागला तेव्हा त्याला समाजाचे नियंत्रण आणि संचालन करणे गरजेचे वाटू लागले. यातही सुरुवातीला ‘बळी तो कान पिळी’ हाच न्याय होता. त्यामुळे पशूंसारख्या माणसांच्याही टोळ्या निर्माण झाल्या. या टोळीत जो शारीरिकदृष्टय़ा बलाढय़ तो टोळीचा प्रमुख, म्हणजे राजा झाला. त्याला सोयीचे वाटेल ते नियम तो इतरांवर लादू लागला. इतरांना ते आवडोत किंवा न आवडोत, त्याच्या भीतीने हे नियम इतर टोळीसदस्यांना पाळावे लागत. त्या बदल्यात त्यांना इतर टोळ्यांपासून संरक्षण मिळे. समाजात राहण्याचे फायदे मिळत. ती छोटीशी टोळी म्हणजे समाज अशी कल्पना केली तर टोळीचा म्होरक्या हा त्या समाजातले ‘सरकार’ होता. आणि त्या सरकारने घातलेली बंधने हाच तिथला ‘कायदा’ होता. जशी वष्रे जात तशी टोळीच्या प्रमुखाची शारीरिक शक्ती कमीकमी होई. दुसरा तरुण आणि आता सबळ झालेला माणूस मग आधीच्या टोळीनायकाविरुद्ध बंड करी, मग आधीच्या टोळीप्रमुखाला ठार करून किंवा नियंत्रणात आणून सत्तापालट होई. नवे सरकार अस्तित्वात येत असे. आधी टोळीतच राहून आधीच्या म्होरक्याचा दबाव सहन केलेला नवा टोळीप्रमुख हा समाजाची मनोभूमिका थोडी अधिक ओळखत असल्याने जास्त समंजसपणे आपले अधिपत्य राबवीत असे. असे वारंवार घडल्यानंतर अतिशय हळूहळू का होईना समाजव्यवस्थेत सुधारणा होऊ लागल्या. लोकसंख्या वाढल्यावर सर्वच घटकांचे दमन, नियंत्रण आणि संचालन करणे केवळ शारीरिक बळावर अशक्य झाले. त्यातून टोळी प्रमुखाच्या मर्जीतला, नात्यातला, जवळचा माणूस त्याचा सहायक बनू लागला. (भारतात दुर्दैवाने आपण आजही हेच होताना पाहत असतो.) मात्र यातून सत्तेचे अगदी प्राथमिक विकेंद्रीकरण सुरू झाले. कायद्याचे ‘एका व्यक्तीच्या मुखातून निघालेले शब्द’ असे अत्यंत व्यक्तीकेंद्री स्वरूप जाऊन सहमतीची गरज निर्माण झाली. निदान टोळीप्रमुखाच्या जवळच्या काही व्यक्तींची सहमती घेणे त्याला आवश्यक बनू लागले. ही बीजरूपाने झालेली लोकशाहीची सुरुवात होती. तरीही अगदी थोडय़ा लोकांनी संगनमताने मोठय़ा समुदायावर लादण्यासाठी केलेले नियम असेच त्या ‘कायद्याचे’ स्वरूप होते. जेव्हा एका माणसाला सत्ता गाजवता येईल एवढय़ा छोटय़ा टोळीचे रूपांतर ५-६ लोकांमार्फत नियंत्रण करावे लागेल इतक्या मोठय़ा टोळीत झाले तेव्हा प्रशासनाचे, समाजाचे, गावाचे एक छोटे एकक तयार झाले. माणसाची महत्त्वाकांक्षा जसजशी वाढत गेली तसे यातून वस्ती, गाव, शहर, राज्य असे प्रशासकीय स्वरूप तयार होऊ लागले. हे घडत असतानाही अजून समाजाचे नियंत्रण किंवा तथाकथित प्रशासन टोळीप्रमुखाची किंवा शस्त्रांची शारीरिक शक्ती त्याच्याकडे असलेल्या शस्त्रांचे भय, शारीरिक इजेची किंवा देहदंडाची भीती यावरच अवलंबून होते. जसे-जसे माणसाचे शारीरिक श्रेष्ठत्व हा मुद्दा निर्णायक ठरणे कमी होऊ लागले तसतसे इतर घटक हळूहळू प्रभावी बनू लागले. मग टोळीप्रमुखाला केवळ ‘मला सर्वानी मान द्यावा, माझ्या आज्ञेत राहावे’ इतक्याच गोष्टीचे आकर्षण न राहता आपल्या मोठय़ा संख्येने असलेल्या प्रजेकडून येणारा कर, म्हणजे फळे, फुले, शिकारीतील हिस्सा, धातू, सेवा अशा गोष्टीही महत्त्वाच्या ठरू लागल्या. त्यामुळे आपला कायदा न मानणा-यांना सरळ शारीरिक इजा किंवा देहदंड न देता त्यांच्याकडून दंड म्हणून अधिक संपत्ती किंवा सेवा वसूल करणे सुरू झाले. अशा प्रकारे टोळीप्रमुख, राजाची सत्ता काहीशी सौम्य, आणि समावेशक होऊ लागली. टोळ्यांमधील स्वाभाविक मानवी महत्त्वाकांक्षेमुळे मग ही टोळीरूपी राज्ये एकमेकांवर आक्रमण करून, एकमेकांशी लढून आपले महत्त्व सिद्ध करू लागली. आपल्या सत्तेचा प्रदेश वाढवण्याचा प्रयत्न करू लागली. हे करीत असताना हत्या, हिंसा, खून यांना कायदेशीर स्वरूप येऊन हे सर्व करणे म्हणजे त्या टोळीला किंवा समाजाला ‘हरविणे’, ‘युद्ध जिंकणे’ असा समाजाला स्वीकारार्ह संभावित अर्थ रूढ झाला. दुस-याने कष्टाने निर्माण केलेली संपत्ती जबरदस्तीने लुबाडणे म्हणजे ‘युद्ध जिंकणे’ ठरू लागले. लुटारू आणि महत्त्वाकांक्षी ‘टोळीप्रमुख’ मग ‘चक्रवर्ती राजे’, ‘महान सम्राट अलेक्झांडर’ ठरू लागले. मोठा भूप्रदेश आणि त्यावरील संपत्ती हडपण्यासाठी केलेली सांघिक चोरी, िहसा आणि खुनाखुनी याला नतिक अधिष्ठान देण्यात माणसाची कुटिल बुद्धी यशस्वी झाली. युद्ध‘शास्त्र’ निर्माण झाले. सगळीकडेच कौटिल्य आणि औरंगजेब निर्माण झाले.
मात्र हे घडत असतानाच आपल्या मनातील स्वाभाविक अंत:प्रेरणेला दाबून टाकून, आपल्या सदसद्विवेकबुद्धीला ठार करून आपल्या नितीशून्य महत्त्वाकांक्षेला मोकळे रान करून देणारे लोक जसे होते तसेच इतरांचा न्याय्य हक्क मान्य करणारी अशीही माणसांची चांगली प्रवृत्ती हळूहळू वाढतच होती. तिला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते इतरांना केवळ सांगता येत होते. मात्र शारीरिक बळ, कठोरपणा, निर्दयता आणि महत्त्वाकांक्षेच्या अभावी ते विचार इतरांवर लादणे सज्जन माणसांना शक्य नव्हते. असे करणे त्यांना रुचणारेही नव्हते. मात्र मानवी समाज अधिक न्याय्य पद्धतीने, परस्पर सहकार्याने आणि परस्पर हितासाठी चालावा अशी काही नतिकदृष्टय़ा विकसित लोकांची मनोमन इच्छा होती. त्यांच्यापुढे आपल्या विचारांचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी दोनच मार्ग होते. एक म्हणजे सतत इतरांचे नतिक ‘प्रबोधन’ करत राहणे किंवा दुसरा म्हणजे अशी एक शक्ती शोधून काढणे की जिच्या भीतीने लोक आपोआप चांगले वागतील. लोकांनी चांगले वागण्यासाठी त्यांचे नियंत्रण, शारीरिक दमन करणे गरजेचे ठरू शकत नाही यासाठी निघालेली संकल्पना म्हणजेच धर्माचा जन्म होता. यासाठी या नतिकदृष्टय़ा विकसित मात्र मवाळ आणि सौम्य माणसांनी ईश्वर हे मूल्य शोधून काढले. आणि राजसत्तेच्या समांतर अशी ईश्वरी सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला. पुढे त्यातूनच विविध धर्माची, धर्मग्रंथांची, पापपुण्य, स्वर्ग नर्क या संकल्पनांची निर्मिती झाली. यातून माणसाने काय साधले आणि काय गमावले ते पुढील लेखात पाहू या.