खारेपाटणपासून पाच किलोमीटरवर असलेलं नडगिवे गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. स्थानिकांनी या डोंगरांची ठेवलेली नावंही मजेशीर आहेत. पठारासारखा दिसणारा पाठार डोंगर, उंचीने मोठा म्हणून थोरला डोंगर, भरपूर झाडं, जंगल असणारा चेराडी डोंगर इत्यादी डोंगर गावाच्या सोबतीला आहेत. याच डोंगरांत गणपतीची पायरी, उंबराखालचं पाणी अशीही ग्रामस्थांची श्रद्धास्थानं आहेत. या गावातील गुंडयेवाडी या लेखकाच्या वाडीच्या या आठवणी.
सिंधुदुर्ग जिलचं प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटणपासून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेलं, मुंबई-गोवा महामार्गाच्या शेजारी वसलेलं नडगिवे हे माझं गाव. या गावाची आठवण येताच मन एकदम भूतकाळात जातं आणि बालपणी, शालेय जीवनात उन्हाळी सुट्टीत गावी जाण्यासाठी करावी लागणारी तयारी, खरं म्हणजे कसरतच, आठवू लागतं. फार पूर्वी बाबा मुंबईत आले, तेव्हा बोटीने प्रवास होत असे. पण आमच्या लहानपणी एसटीचा प्रवासच आम्हाला आमच्या गावी घेऊन जायचा. मुंबई ते खारेपाटण अशी दिवसाला तेव्हा एकच एसटी होती. तिचे आगाऊ आरक्षण करण्यासाठी रात्र रात्र जागवायला लागायच्या. मुंबई सेंट्रल स्थानकातील तिकीट खिडक्यांवर रात्री रांग लावायची, दुस-या दिवशी सकाळी आठला खिडकी उघडायची. ज्यांना पहिल्या दिवशी तिकीट मिळायचं ते नशीबवान ठरायचे; परंतु बहुतेक वेळा दोन-तीन दिवस रांग लावावीच लागे. अगोदरच्या दिवशी रांगा लावून ज्यांना तिकीट मिळत नसे, त्यातीलच कोणीतरी एक पुढाकार घेऊन यादी बनवायचा आणि या यादीवर हुकूम रांग लावली जायची. हा सर्व खटाटोप केल्यानंतर शेवटी एकदाची तिकिटं हातात पडली की, चेह-यावर आनंद झळकायचा. मग सुरू व्हायची गावी जाताना लागणा-या सामानाची खरेदी. यात मीठ-मसाल्यापासून सर्व असायचं. त्यातच इतर चाकरमानी गावच्या आपापल्या नातेवाइकांना देण्यासाठी भेटी घेऊन आमच्याकडे यायचे, त्याबरोबर खुशालीच्या चिठ्ठया, पैसे असायचे. तेवढाच एक गावच्या मंडळींना आधार. खरेदी केलेलं सामान व चाकरमान्यांनी दिलेल्या भेटी हे सर्व एका गोणीत भरून त्यावर नाव टाकलं जायचं. पत्र्याच्या ट्रंकमध्ये कपडे भरले जायचे. ही सर्व तयारी करून झाल्यावर आरक्षण केलेल्या दिवशीची एसटी पकडून गावी रवाना व्हायचं. संध्याकाळी साडेपाच वाजता सुटलेली एसटी बारा तासाने खारेपाटणला पोहोचत असे. तीच एसटी मग खारेपाटण-कणकवली असा फलक लावून पुढच्या प्रवासाला सज्ज व्हायची. याच एसटीने मग आम्ही महामार्गाच्या शेजारीच असलेलं आमचं नडगिवे गाव गाठत असू. आता रेल्वे, खासगी वाहने, आराम बस असे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत; परंतु सणासुदीला गावी जाण्यासाठी पूर्वीसारखीच कसरत अजूनही करावी लागते. तशी ती प्रत्येक कोकणी माणसाला करावीच लागते.
नडगिवे गाव इतर गावांप्रमाणेच वाडयावाडयांमध्ये विभागलेलं. त्यात आमची गुंडयेवाडी ही मुंबई-गोवा महामार्गाच्या एका बाजूला, तर दुस-या बाजूला बांबरवाडी. खारेपाटण ही बाजारपेठ पाच किमीवर तर तरळा ही दुसरी बाजारपेठ दहा किमीवर. गावचं दैवत गांगेश्वर यांचं देवस्थान देऊळवाडीत हल्लीच या गांगेश्वराच्या देवळाचा जीर्णोद्धार झालाय. मुंबईतील चाकरमानी आणि ग्रामस्थांनी जीवापाड मेहनत घेऊन आपल्याला सर्व कार्यात मदत करणा-या, आपल्या सतत पाठीशी असणा-या या ग्रामदैवताला सुंदर अशा कलात्मक वास्तूत स्थानापन्न केलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नडगिवे घाट आमच्या गावाशेजारीच. या नडगिवे घाटाची सुरुवातच अदिस्टीमातेच्या मंदिराने होते. स्थानिकांच्या रूढ भाषेत या देवस्थानाला चाळोबा देव अथवा चाळा म्हटलं जातं. या महामार्गावरून प्रवास करणारे चालक, वाहक आणि प्रवासी या त्यांच्या श्रद्धास्थानाला प्रणाम करून पुढील प्रवास सुखकर व्हावा एवढी माफक अपेक्षा धरून पुढचा मार्गक्रम आखतात. आम्हा नडगिवेकर मंडळींच्या कोणत्याही शुभप्रसंगाची सुरुवात करताना गावापासून मुंबईपर्यंत या देवस्थानाला श्रीफळ पुरवून कार्य सिद्धीस नेण्याचं गा-हाणं घातलं जातं. माझं गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. स्थानिकांनी या डोंगरांची ठेवलेली नावंही मजेशीर आहेत. पठारासारखा दिसणारा पाठार डोंगर, उंचीने मोठा म्हणून थोरला डोंगर, भरपूर झाडं, जंगल असणारा चेराडी डोंगर इत्यादी डोंगर गावाच्या सोबतीला आहेत. याच डोंगरांत गणपतीची पायरी, उंबराखालचं पाणी अशीही ग्रामस्थांची श्रद्धास्थानं आहेत.
त्याकाळी उन्हाळ्यात अखेरी-अखेरीस पाण्याचे थोडे हाल होत असत. आमच्या गुंडयेवाडीची विहीर घरांपासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर. त्यातही शेजारच्या दोन वाडीची माणसंही पाणी भरायला याच विहिरीवर यायची. साहजिकच सर्वाना पाणी पुरवल्याने विहिरीतील पाणी तळ गाठत असे, मग मध्यरात्री, उत्तररात्री लवकर उठून विहिरीत कंदिलाच्या प्रकाशात उतरून पाणी भरावे लागे. आम्ही मुंबईकर असलो तरी पाणी हे अत्यावश्यक असल्याने आम्हालाही ही कसरत करावी लागे, पण आता वाडीत व एकूणच संपूर्ण गावात नळाने पाणी पुरवलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे पाण्याची वानवा संपली आहे, पण त्या काळात पाण्यासाठी एक-दोन तास द्यावेच लागत.
आता बहुतेक घरे कौलारू आहेत. काहींनी स्लॅबही टाकले आहेत, पण जुन्या काळात घरांची छपरे नळ्याची असत. पावसाळा सुरू होण्याअगोदर हे नळे परतले जात. म्हणजे खालची बाजू वर करून संपूर्ण छप्पर साकारले जाई. ज्याच्या घराचे नळे परतायचे असतील त्याच्याकडे वाडीतील पुरुषमंडळी व बच्चेकंपनी सकाळपासूनच कामाला लागत आणि सूर्य डोक्यावर येईपर्यंत घर शाकारून झालेले असे. त्याच घरात या मेहनतीचा मोबदला म्हणून जेवण असे. उन्हाळी सुट्टीमध्ये मी याचाही अनुभव स्वत: काम करून घेतला आहे. टीमवर्क काय असतं, याचे प्राथमिक धडे इथेच पहिल्यांदा मिळाले. जी गोष्ट घराची तीच गोठयाची. पावसाळ्याची बेगमी म्हणून गुराढोरांसाठी चारा गोठयात साठवून ठेवला जातो, याचाही अनुभव घेतला आहे. मात्र गवतात काम केल्यानंतर अंगाला खाज सुटते. या वेळी शेतीची प्राथमिक कामंही होत असत. त्यात पातेरा (पालापाचोळा) गोल करणं, कवळ लावणं, शेतभाजणी करणे ही कामं असत. या कामांचा अनुभवही उन्हाळी सुट्टीत घेता आला.