मुंबई शेजारील आधुनिक शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईत यावर्षी गुन्हेगारी घटल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.
नवी मुंबई – मुंबई शेजारील आधुनिक शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईत यावर्षी गुन्हेगारी घटल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. मात्र तरीही चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस यंदा देखील अपयशी ठरले आहेत. गतवर्षीच्या सरत्या वर्षात १२२ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. चोरटय़ांनी वर्षभरात १९३ घरफोडय़ा दिवसाढवळ्या केल्या आहेत. या गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण मात्र अवघे ४० टक्के आहे. गतवर्षी हे प्रमाण ४२ टक्के इतके होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत गुन्हेगारीत २ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यामुळे नवी मुंबई पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
नवी मुंबईत एकूण ४८ हत्या झाल्या असून त्यातील ४६ हत्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिला अत्याचाराच्या घटनाही वाढल्या असून २०१४ मध्ये ९० बलात्काराचे गुन्हे नोंद झाले होते, तर २०१५ मध्ये १०४ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यातील एका गुन्ह्याचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. २०१४ मध्ये घरफोडीच्या ५४९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१५ मध्ये हीच आकडेवारी ६०९ इतकी आहे.
पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अतिरिक्त आयुक्त विजय चव्हाण, गुन्हे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत, उपायुक्त शहाजी उमप, अरविंद साळवी, सुरेश मेंगडे, विश्वास पांढरे या अधिका-यांनी वर्षभरातील कामगिरीविषयी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
सरत्या वर्षात दुचाकी चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली असून या चो-या उघडकीला येण्याचे प्रमाण अवघे ४४ टक्के आहे. लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना ६ टक्केच यश आले आहे. २०१४ मध्ये महिलांच्या अपहरणाच्या १३८ घटना घडल्या होत्या. तर २०१५ मध्ये हा आकडा २२७ वर गेला आहे. यापैकी ८६ महिलांचाच पोलीस शोध घेऊ शकले आहेत. २०१४ साली सर्व प्रकारच्या एकूण गुन्ह्यांची संख्या ५२८८ होती.
यात ३५६१ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला असून २०१५ साली ५४०५ गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यापैकी ३६२० गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. विनयभंगाचे प्रमाण २०२ असून त्यापैकी १९५ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. रस्ते अपघाताची संख्या २०१४ मध्ये ५१६ इतकी होती. तर २०१५ मध्ये ६०४ इतकी आहे. रबाळे, रबाळे एमआयडीसी व कामोठे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे यावेळी पोलिसांनी मान्य केले. तर सीसीटीव्हीमुळे अनेक महत्वाचे गुन्हे उघड होण्यास मदत झाल्याचे स्पष्ट करत पोलिसांनी सीसीटीव्हीचा वापर अधिक करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.