अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मोहन आगाशे यांच्यासारख्या अभ्यासू आणि धीरोदात्त व्यक्तिमत्त्वाची झालेली बिनविरोध निवड ही रंगभूमीवरील चांगल्या बदलांची नांदी म्हणावी लागेल.
आज रंगभूमीची अवस्था फार दारुण आहे. विशेषत: समांतर, हौशी रंगभूमी दुर्लक्षित राहिली आहे. सरकारकडून व्यावसायिक रंगभूमीसाठी अनुदान दिले जाते, पण समांतर किंवा हौशी रंगभूमीला ते मिळत नाही. तसे ते मिळाले तर या रंगभूमीला ऊर्जतिावस्था प्राप्त होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे त्या दिशेने डॉ. आगाशे यांच्यासारखा जाणता कलाकार प्रयत्न करेल.
बारामती येथे होणा-या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याची नाट्यरसिकांना उत्सुकता होती. अखेर ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. आगाशे यांच्या निवडीने नाट्यरसिकांना आनंद होणे स्वाभाविक आहे. खरे तर नाट्य संमेलन किंवा साहित्य संमेलन अशा उत्सवांच्या अध्यक्षपदी अशाच योग्य व्यक्तींची निवड होणे अपेक्षित असते. डॉ. मोहन आगाशे हे अत्यंत अभ्यासू कलाकार आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या नाट्य चळवळींमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे. नाट्यसृष्टीचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. नाट्यसृष्टीतील हौशी, व्यावसायिक, समांतर, सामाजिक प्रश्नांची मांडणी करणारी रंगभूमी अशा सर्वच क्षेत्रांचा त्यांना अनुभव आहे. नाटय़ क्षेत्राप्रमाणेच सिनेमाक्षेत्राचाही त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यांच्या या दांडग्या अनुभवांचा नाटय़सृष्टीला निश्चित उपयोग होऊ शकेल.
नाट्यसंमेलन किंवा साहित्य संमेलन यांच्या अध्यक्षपदी असणा-या व्यक्तीने त्या त्या क्षेत्राच्या समृद्धीच्या दृष्टीने चांगले निर्णय घेणे आवश्यक असते. अन् एखादी गोष्ट करायची ठरली की त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची वृत्ती डॉ. मोहन आगाशे यांच्याकडे आहे. नाटय़क्षेत्राचा जनमानसावर कोणत्या प्रकारचा प्रभाव पडेल, अशा प्रकारचे विचार आजपर्यंत दुर्लक्षित राहिले आहेत. त्याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न डॉ. आगाशे यांच्यासारख्या सहृदय कलाकारांकडून निश्चितच होतील.
नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हे केवळ एक वर्षासाठी असते. मुळात या पदावर आणि तेथील वातावरणाशी समरस व्हायला, त्याचप्रमाणे त्यासंदर्भातील माहिती गोळा करण्यात अध्यक्षाला एक वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत त्यांच्याकडून ठोस निर्णय घेतले जाणे शक्य होत नाही. त्यासाठी अध्यक्षपदासाठीचा कालावधी वाढवायला हवा. यापूर्वीच्या अध्यक्षांनीही हा कालावधी वाढवून मिळावा, अशा प्रकारच्या मागण्या केल्या होत्या. त्या दिशेने कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.
डॉ. मोहन आगाशे नाट्य चळवळीपासून हौशी रंगभूमी, समांतर रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत. त्यामुळे या क्षेत्रांशी त्यांची चांगलीच नाळ जुळलेली आहे. आपल्याकडे आतापर्यंत हौशी रंगभूमीला फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. वास्तविक, हौशी रंगभूमीवरूनच व्यावसायिक रंगभूमीला खरा फुलोरा मिळत असतो. त्यावरूनच अनेक सकस कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर येऊन प्रेक्षकांशी एकरूप होत असतात. त्यामुळे या रंगभूमीला मिळणारा प्रतिसाद अधिक वाढायला हवा. त्यासाठी यथायोग्य प्रयत्न व्हायला हवेत. आजार एकीकडे आणि उपचार भलतीकडेच असे बऱ्याचदा होते. ते बदलून आता मुळावरच उपचार व्हायला हवेत.
डॉ. मोहन आगाशे यांनी प्रायोगिक, समांतर, हौशी रंगभूमीप्रमाणेच त्यांनी सामाजिक प्रश्न मांडणा-या नाटकांमधूनही कामे केली आहेत. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांमधून कामे करतानाही त्यांनी नेहमीच त्यातील वेगळेपण जपले. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग पाहण्यासारखा असतो. अनेकदा नवोदित कलाकार सामाजिक प्रश्न मांडणा-या रंगभूमीवरून पुढे येत असतो. अशा कलाकारांना डॉ. आगाशे यांच्यासारख्या जाणत्या कलाकाराचे नेहमीच मार्गदर्शन मिळते. त्यामुळे सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या रंगभूमीकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आजपर्यंत राज्य नाटय़ स्पर्धामधूनही अनेक चांगले कलाकार पुढे आले आहेत. पण आता या स्पर्धाही दुर्लक्षित राहिल्या आहेत.
नाटय़ किंवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माणसे जोडणा-या कार्यकर्त्यांची खरी गरज असते. डॉ. आगाशे यांच्याकडे तो गुण आहे. आज मराठी नाटय़क्षेत्राची अवस्था फार दारुण झाली आहे. ज्या नाटकांनी सुवर्णकाळ पाहिला, प्रेक्षकांना रात्र-रात्र प्रेक्षागृहातील खुच्र्याना खिळवून ठेवले त्या नाटकाची आजची स्थिती फारशी चांगली नाही. आज वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद घालून आपण रंगभूमीपासून दूर चाललो आहोत. अनेकदा एकत्र येऊन या क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्याऐवजी आपण वेगवेगळे गट करतो आणि वाद घालत राहतो. त्यातून भांडणे, वादविवाद यापेक्षा अधिक काही निष्पन्न होत नाही. त्यामुळे हे गटतट थांबवून सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
डॉ. मोहन आगाशे हे मृदू, लाघवी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा लोकसंग्रह अफाट आहे. अनेकदा आश्चर्य वाटावे इतके ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये उमेदीने कार्यरत असतात. काम कोणतेही असो, डॉ. आगाशे यांच्या चेह-यावर कधी निराशा दिसत नाही. ‘ग्रिप्स थिएटर’ची चळवळ त्यांनी महाराष्ट्रात रुजवली आहे.
डॉ. आगाशे हे मुळात मानसोपचारतज्ज्ञ आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते अभिनय क्षेत्रात व्यस्त झाले असले तरी त्यांनी या त्यांच्या मूळ विषयाकडे अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. हाती घेतलेले प्रत्येक काम कसोशीने, नेटकेपणाने पार पाडण्याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकामुळे त्यांचे नाव अधिक चच्रेत आले. त्या नाटकामध्ये त्यांनी केलेला अभिनय अविस्मरणीय आहे. या नाटकाला सुरुवातीच्या काळात जोरदार विरोध झाला. त्या काळात रंगभूमीवर प्रेम असणारे अनेक जण विचारस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभे राहिले. त्यामध्ये डॉ. मोहन आगाशे यांचाही समावेश होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व धीरोदात्त असे आहे. त्यांच्या कारकीर्दीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री देऊन गौरव केला आहे.
आपल्याकडे सरकारकडून व्यावसायिक रंगभूमीसाठी अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर ते हौशी किंवा समांतर रंगभूमीसाठीही मिळायला हवे. तसे झाले तर या रंगभूमीला ऊर्जतिावस्था प्राप्त होण्यासाठी मदत मिळेल. समांतर रंगभूमीच्या विकासासाठी प्रयोग करणे महत्त्वाचे आहे. त्या दिशेनेही त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात येतील.
डॉ. आगाशे यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर मात्र माझा चांगला परिचय आहे. त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी नेहमीच गप्पाटप्पा होतात. अर्थात, त्यामध्ये केवळ टाइमपास नसतो तर रंगभूमीविषयी ते बोलत असतात. त्यांची अनेक कामे मी पाहिली आहेत आणि त्यावर प्रेमही केले आहे. त्यांची नाटकांची निवड अतिशय सुंदर असते. भूमिका कोणतीही असली तरी त्यामधून आपल्याला नवीन काय देता येईल, याचा ते नेहमीच विचार करतात. नावीन्यशोधाची त्यांची ही वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्यातील या वृत्तीचा रंगभूमीसाठी नक्कीच फायदा होईल. अजूनपर्यंत मी डॉ. मोहन आगाशे यांच्याबरोबर काम केले नसले तरी भविष्यात तो योग जुळून येईल. तसा तो येणे हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव असेल. अलीकडच्या काळात नाट्य संमेलन किंवा साहित्य संमेलन यांच्या अध्यक्षपदाची निवड निवडणुकांतून होते. इतर गोष्टींपेक्षा त्यातील निवडणुकांमधील राजकारणच गाजते. या पार्श्वभूमीवर डॉ. मोहन आगाशे यांची निवड बिनविरोध झाली हे महत्त्वाचे आहे. अशा पदासाठी निर्विवाद निवड असणे महत्त्वाचे असते आणि डॉ. आगाशे यांच्या रूपाने ती झाली आहे. त्यामुळे रंगभूमीवरील चांगल्या बदलाची ही नांदी म्हणावी लागेल.