नाट्य संमेलनात गेली अनेक वर्षे न चुकता मांडल्या जाणा-या सीमाप्रश्नासंबंधीच्या ठरावालाच यंदाच्या नाट्य संमेलनात काट मारण्यात आली.
बेळगाव (बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी)- नाट्य संमेलनात गेली अनेक वर्षे न चुकता मांडल्या जाणा-या सीमाप्रश्नासंबंधीच्या ठरावालाच यंदाच्या नाट्य संमेलनात काट मारण्यात आली. संमेलनात सीमाप्रश्नाचा ठराव न मांडण्याचा निर्णय घेतलेला नाही, अशी भूमिका संमेलनाच्या आधी घेणा-या नाट्य परिषदेने संमेलनाच्या अखेरच्या दिवशी होणा-या खुल्या अधिवेशनात आपली कातडीबचावू वृत्ती दाखवत अखेर हा ठराव मांडलाच नाही. संमेलनाचे सूप ठरावाविनाच वाजल्यामुळे मराठीभाषिकांची घोर निराशा झाली.
नाट्यसंमेलन देशात कुठेही असो, त्यामध्ये ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रा’चा ठराव हमखास मांडला जातो. कानडी जाचातून बाहेर पडू पाहणा-या बेळगावच्या जनतेच्या लढय़ाला नैतिक पाठिंबा म्हणून हा ठराव मांडण्याची गेल्या अनेक वर्षाची पंरपरा आहे. ही परंपराच बेळगाव संमेलनात मोडीत निघाली.
नाट्यसंमेलनाच्या दुस-या आणि अखेरच्या दिवशी सकाळी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतरच संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात सीमाप्रश्नाचा ठराव मांडला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. ‘प्रहार’ला मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत बेळगाववासीयांच्या भावना विचारात घेऊन सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्याचा प्रस्ताव काही सदस्यांनी ठेवला होता, परंतु कायदेशीर बाबींमुळे असा प्रस्ताव मांडता येणार नाही, अशी भूमिका नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी घेतली.
संध्याकाळी समारोपाच्या आधी झालेल्या खुल्या अधिवेशनात ठराव मांडण्यात आले तेव्हा त्यात सीमाप्रश्नाचा ठरावाचा समावेश नव्हता. खुल्या अधिवेशनात दरवर्षी दहा-पंधरा ठराव मांडले जातात, परंतु बेळगाव संमेलनातील खुल्या अधिवेशनात केवळ चारच ठराव मांडण्यात आले. त्यामुळे हे संमेलन आटोपते घेतले जात आहे की काय, अशी कुजबूज होती. संमेलमनाचे दोन दिवस व्यासपीठावर कुणीही सीमाप्रश्नावर साधे अवाक्षरही उच्चारले नाही. नाट्य परिषदेने या ठरावाच्या संदर्भात शेवटपर्यंत गुळमुळीत भूमिका घेऊन अखेरीस हा ठराव न मांडून बेळगावच्या जनतेची फसवणूक केल्याची चर्चाही होत होती.
दिवाकर रावतेंचा ‘अखंड संपूर्ण जय महाराष्ट्र’
संमेलनाच्या सांगता सोहळ्याला अनुपस्थित राहिलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला आपला प्रतिनिधी म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पाठवले. उद्घाटन सोहळ्यातील आपल्या भाषणात ‘जय महाराष्ट्र’ न बोलणा-या शरद पवारांवर रावते यांनी सडकून टीका केली. शरद पवारांनी जय हिंद म्हटल्यावर पुढचा जय का गिळला? हे ऐकून मराठी माणसाला काय वाटले असेल? कर्नाटकने आपल्याकडून केवळ घेतलेच नाही तर दिलेलेही आहे, असे पवार म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ काय? असे सवाल करून त्यांनी बेळगावमधील एका कार्यक्रमात पवार यांनी ‘जय कर्नाटक’ म्हटले त्याचे मोबाईल रेकॉर्डिंगही ऐकवले. तसेच आपल्या भाषणाचा शेवट ‘अखंड संपूर्ण जय महाराष्ट्र’ने केला.