कोल्हापुरात १२ मे रोजी आक्रोश मेळावा
कोल्हापूर – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारकडून स्पष्ट फसवणूक सुरू आहे. आता मराठा बांधव आरक्षणासाठी आरपारच्या लढाईसाठी मैदानात उतरतील. त्याची सुरुवात १२ मे रोजी कोल्हापूर येथे होणा-या आक्रोश मेळाव्याच्या रूपाने दिसून येईल, असा इशारा मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी दिला आहे.
आक्रोश मेळाव्याच्या तयारीसाठी जिल्ह्यातील १२ तालुक्यात मराठा समाजाचे संघटन करण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला. शहरातील प्रमुखांची सुकाणू समितीही जाहीर करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या सरकारच्या भूमिकेसंदर्भात आढावा घेण्यासाठी इचलकरंजी शहरातील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जुन्या नगरपालिका इमारतीतील सभागृहात झाली. बैठकीमध्ये उपस्थित सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला सवलती आणि आरक्षण देण्याबाबत सरकारकडून चालढकल करण्यात येत आहेत. याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.
कोल्हापुरातील आक्रोश मेळाव्यासाठी जिल्ह्यातील १२ तालुक्यातील समाज बांधवांचे संघटन करणे. सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती करणे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाची होळी करणे.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाण करणा-या समाजातील बांधवांना कायदेशीर लढाईसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. समाजातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी मदत करणे. जिल्हास्तरावर युवा एल्गार परिषदेचे नियोजन करणे. मराठा एकीकरण समिती स्थापन करणे, असे ठराव यावेळी बैठकीत करण्यात आले.
सरकारकडून होणारी फसवणूक आता मराठा समाज सहन करणार नाही. याकरिता समाज बांधव रस्त्यावर उतरून आरपारची लढाई करतील, असा इशारा पाटील यांनी दिला. सुरेशदादा पाटील आणि नितीन लायकर यांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाण करणा-या समाजबांधवांच्या कायदेशीर लढाईसाठी प्रत्येकी १० हजार देण्याची घोषणा केली.
यावेळी पुंडलिक जाधव, महादेव गौड, आबा जावळे, मोहन मालवणकर, अमृत भोसले, संतोष सावंत, संतोष शेळके, संजय जाधव, अमर जाधव, नितीन लायकर, अरविंद माने, सागर जाधव, नागेश पाटील, धर्मा जाधव, राजू निर्मळे, प्रवीण केर्ले आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
मागील सरकारप्रमाणेच राज्यातील सध्याचे सरकारही मराठा समाजाची फसवणूक करत आहे. मूक मोर्चानंतर देखील सरकारला जाग येत नसल्याने आता मराठा समाज रस्त्यावर उतरून आक्रोश करणार आहे. १२ तारखेला होणा-या आक्रोश मेळाव्यात राज्यव्यापी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे सुरेशदादा पाटील यांनी स्पष्ट केले.