मैदानात लढणा-या सैनिकाला ‘तू असं लढ तसं लढ’ हे युद्धात नसणा-या रिंगणाबाहेर असलेल्यानं सांगणं चूक आहे. तसं फिल्म किंवा नाटक करताना त्यानंच काय दुस-या कोणीही ढवळाढवळ केलेली मला काय किंवा कुठल्याच क्रिएटिव्ह माणसाला खपणार नाही, तसंच.. पण तरीही सांसारिक जबाबदारी म्हणून मीही ‘सामना’मध्ये नोकरी पत्करलीच नं. पण ती नोकरी. पण तरीही तत्त्वनिष्ठतेचा आव आणणा-या काही लोकांना ते आवडलं नाही. मग म्हणजे सरकारला विरोध करणा-यांनी बस किंवा ट्रेनमध्ये पण बसता कामा नये! नामदेव यांच्यासारख्या वादळी व्यक्तिमत्त्वाची जीवन साथीदार म्हणून साथसंगत करणा-या मल्लिका अमरशेख यांनी ‘सत्यता’ या नियतकालिकात लिहिलेला लेख.
खूप लांबून दूरवरून पावसाच्या पाण्याचा आवाज.. नाही.. नळाच्या पाण्याचा.. पहाटेचे चार.. जडावलेले डोळे, झोपेचं भलमोठं ओझं दोन्ही डोळ्यांवर.. पाणी भरून पुन्हा अंग टाकलं जमिनीवर.. झोपेनं हसून डोळय़ांच्या डोहात बुडी मारली.. आणि तेव्हाच धडधड दार वाजू लागलं.
काय कटकटय्.. सुखाची झोप पळून गेलेली.. बाहेर दाराबाहेर — हा आऽवाऽज कोऽणाचा, झिंदाबाद.. असे बरेच आवाज न् त्या आवाजांचे मालक जवळ पन्नास-साठ-जास्तच उभे होते. हातात लाल निळया रंगाचे पँथरच्या चित्राचे झेंडे घेऊन, मी आत येऊन नामदेवला उठवलं.. तो घाईनं अत्यानंदानं तातडीनं बाहेर गेला..
‘‘अरे, इकड ये-पाणी घे -’’
आता एवढया लोकांना पाणी-चहा-सदानंद हॉटेल कदाचित उघडलं असेल तर ठीक. जाऊ दे. नामदेव बघेल. मी पुन्हा जमिनीवर अंग टाकून छोटया आशूच्या अंगावर पांघरून टाकत पुन्हा निद्रादेवीच्या राज्यात सुखाची माझी गाठोडी शोधू लागले –
‘‘ए मूर्खा, पाणी टाक अजून-हां हलवं चांगलं-ए, लांब कालथा दे आणि अजून पीठ दे. खळ घट्ट चिकट व्हायला हवी. पोस्टर चिकटणार कसं साल्या.’’
‘‘चपातीचं पीठय् ते. मी नाही देणार.’’
‘‘ए सुरेश, पळ चक्कीतून नायतर दुकानातून पीठ आण.’’
‘‘चक्कीतूनच आण. खाली पडलेलं पीठ तो स्वस्तात देईल.’’ इति मी.
मग पोस्टरला लावायची खळ रात्री १०-११ वाजता रटरटू लागते. टॅक्सी येते. सर्वाना सांगितलं जातं. ‘‘कोण वाचतं ही पास्टर्स?’ मी प्रश्न विचारला मनातच.
फ्रेम कट टू पुणे –
जयदेव भाऊजी, एल. डी. नाराज आहेत. नामदेवही पँथर सोडून चाललेत. शेवटची दिलजमाईची मिटिंग. मी दिलीप चंद्याबरोबर बुके न् चिठ्ठी पाठवलीय, ‘टिकण्याचाच प्रयत्न करा. ही चळवळ तुटू नये यासाठी सदिच्छेची फुलं’ पण मला कोण विचारतंय? पुण्यामध्ये फ्रॅक्शन झालेच. बाकी काही होवो. म्हंजे जवळ मी न् आशूच असलो तरी काही फ्रॅक्शन झाले-माणसं सोडून गेली म्हणून दु:खी वगैरे नाही. पैसे नाही-तरी आम्ही आपले उभेच आयुष्याबरोबर लढत-उद्याच्या भाकरीची-भविष्याची चिंता नाही. चिंता फक्त समष्टीची. समष्टी-हूं. समष्टी नाही झाली सवत झाली.
बायका त्याच्या प्रेमात पडतात त्याची भीती नाही वाटत, कारण तो नाही प्रेमात पडत. कारण ऑलरेडी त्या मेल्या समष्टीच्या आकंठ प्रेमात तो बुडालेला.
त्याचा वैचारिक अधिष्ठान खोल-व्यापक सगळया पृथ्वीला छेदत-भेदत जाणारं आकळून घेणारं असलं तरी – ती शिस्त वेळ-पैसा याचं नियोजन नसल्याने आणि मूलत: तो डँबिस नसल्यानं तो राजकारणी नाही, असं विधान करावंसं वाटतं.
अमरावती-नागपूर प्रकरण-सुनील दिघे, सिन्हा पती-पत्नी. नामदेवऐवजी सभेला गेले. त्यांचा जीव घेण्यासाठी आलेले न् जीवाचं पायावर निभावलेलं प्रकरण-अजून विसरता येत नाही. नामदेव तिथं असता तर? तेव्हाच त्याचा खून पँथरमधल्या संकुचितवाद्यांनी करून टाकला असता.
संजीव रेड्डी- सुभाष सरीन असं गळलेले तुटलेले मोहरे-लंबू दिलास-बटर विलास-मकाण्डा-शिवपुत्र- असे समस्त कामाठीपुरा निवासी-बडा सय्यद-छोटा सय्यद-नवाब-आणि असे अनेक नामदेवचे जिवाभावाचे दोस्त लोक-असंख्य लोक, असंख्य चेहरे-चळवळीतले बाहेरचे-प्रत्येक दिवस हा एक प्रकांड अनुभव, प्रत्येक घटना ही चळवळीशी-नामदेवशी कुठून ना कुठे जोडलेली-निवडणुकीला उभे राहाल-निवडणूक असो की पँथरचा मेळावा-अधिवेशन-त्याने काहीही ठरवलं माझ्या कपाटातले किडूकमिडूक सोन्याचे चमचाभर दागिने थरथरू लागायचे; पण त्याचं काही चालायचं नाही आणि मीही निर्लिप्त-स्थितप्रज्ञ असल्याचा सुरेख अभिनय करत ते द्यायचेही. उपाशी न राहता सोन्यासारखं मटण-मासे खातोय् हेच खूप. हा आनंद फार मोठा. रेशनचं महत्त्व मला नामदेवच्या संसारातच कळलं. न् मी मानतेच की अंगावर सोनं असण्यापेक्षा माझ्या स्वयंपाक घरातल्या बरण्यात डाळ-तांदूळ असणं जास्त महत्त्वाचं. म्हंजे भरलेल्या बरण्या म्हंजे हा चपलाहार-ही मोहनमाळ-या पाटल्या!
शिबीर घ्यायचं म्हणजे कार्यकर्ते येणार. मग त्यांचं खाण, चहा वगैरे तर ‘ते बघता येईल.’ पैसे?- ते बघता येईल.
मी न् पुलंच्या सुनीताबाई यात फरक असेल तो राहणीमानाचा आणि वााण्याचा-पु. लं. बिचारे गरीब पती होते. त्यामुळे ते ऐकायचे तरी; पण माझ्या संसारात मीच सर्व आघाडय़ांवर लढत होते न् आहे आत्ताही.
फक्त कार्यकर्ते न् येणारे वरपांगी माझं ऐकतात-करतात नामदेवच्याच मतानं! एक अख्खं पुस्तक लिहून नामदेव-भांडण-चळवळ असं मांडलं तरीही ती सगळी माणसं मला (माझ्यासमोर तरी) मला मानतात- घाबरतात (दाखवतात) मी न् नामदेवनं मिळून काढलेल्या चळवळीसाठी खस्ता-त्रास मानतात हे पण खूपच. कदाचित त्या सगळय़ांनाच माहीत असावं की, चळवळीत किती त्रास असतो ते.
त्याच्या चळवळीबद्दल माझी स्वत:ची एक स्पष्ट भूमिका आहे. नामदेवनं लिहिलेली पँथरची घटना व जाहीरनामा हा खरोखरीचं अत्यंत पॉजिटिव्ह क्रांतिकारी, व्यापक ख-या अर्थानं समाजाभिमुख-अन् बरोबर घेऊन जाणारा आहे. दलित हा नुसता जन्मानच नाही तर आर्थिकदृष्टयाही शोषित आहे, असे असणारे सर्वच दलित. हा व्यापक दृष्टिकोन पहिल्यांदा नामदेवनं मांडला. त्यामुळे दलितांचे अल्पसंख्य.. संपून अस्पृश्यांच्या मुक्तिलढयाचे योग ध्रुवीकरण होईल, अशी त्याची भूमिका होती.
मार्क्सनं मांडलेल्या सिद्धांताशी सुसंगत जवळ जाणारा हा दृष्टिकोन होता, म्हणून त्या विचाराला अनुलक्षून नामदेवला डाव्यांशी हातमिळवणी करणारा म्हणून अनेकांनी टिकास्त्र सोडलेलं.
नामदेवची चळवळ-पँथर-त्यामधली माणसं-त्यांचे चांगले-वाईट गुणधर्म-दुटप्पी-संधीसाधू किंवा नामदेवला जीव लावणारे पण नामदेवच्या चळवळीला सत्ता-पैसा नसल्यामुळे नाईलाजानं नामदेवला सोडणारे, पण तरीही प्रेमानं नामदेवला भेटणारे-
शिवसेनेच्या बरोबर त्यानं केलेली युती मला आवडली नाही. पटली नाही.
पण मी मत व्यक्त करते न् सोडून देते.
कारण मैदानात लढणा-या सैनिकाला ‘तू असं लढ तसं लढ’ हे युद्धात नसणा-या रिंगणाबाहेर असलेल्यानं सांगणं चूक आहे. तसं फिल्म किंवा नाटक करताना त्यानंच काय दुस-या कोणीही ढवळाढवळ केलेली मला काय किंवा कुठल्याच क्रिएटिव्ह माणसाला खपणार नाही, तसंच..
पण तरीही सांसारिक जबाबदारी म्हणून मीही ‘सामना’मध्ये नोकरी पत्करलीच नं. पण ती नोकरी. पण तरीही तत्त्वनिष्ठतेचा आव आणणा-या काही लोकांना ते आवडलं नाही. मग म्हणजे सरकारला विरोध करणा-यांनी बस किंवा ट्रेनमध्ये, पण बसता कामा नये!
थोडं विषयांतर झालं; पण चळवळीत काम करताना चळवळीत न काम करणा-यांनाही वेगवेगळे चटके बसू शकतात. नामदेव एकुलता एक असल्यानं फार लाडका-पँथर-हाणामा-या-दाद-संघर्ष-केसेस- पोलिस-आता चळवळीत तर असतंच हे; पण त्या बिचा-या आईला काय माहीत.
मॅक्झिम गार्कीच्या ‘आई’ पुस्तकात – इथंसुद्धा तशा आया अनेक होत्या. मुलाबरोबर चळवळीत काम करणा-या, हक्कासाठी लढणा-या, गिरणी कामागारांच्या संपात, मोर्चात सहभागी होणा-या-खुद्द माझ्या आईनंही मोर्चात, संपात सीपीआयबरोबर काम करताना जिने चढ-उतार करताना माझ्याआधीच एक बाळ सातमासी गमावलेलं-पण नामदेवची आई फक्त आईच होती. बाहेरचं जग तिच्यालेखी नामदेवच. एका पुण्याला आम्ही दोघं गेले असता त्यांना कुणी सांगितलं काय की, की तुमच्या मुलाला मारलं-झालं त्यांना तत्क्षणी वेडाचा तीव्र झटका आला.
नंतर त्यांना आम्ही डॉ. पाटकरांकडे नेलं वगैरे-तरी त्या पूर्ण ब-या झाल्यावरही मधूनच त्यांना वेडाची तीव्र लहर आली की, त्या तडक उठून बाहेर तरातरा निघायच्या-मग मी तव्यावरची पोळी खाली टाकून अनवाणी पायांनी त्यांच्या मागं पळायचे-हात धरून त्यांना घरी आणायचे; पण त्यांचं एक वेड जे नामदेवनं घेतलं जे मला फारच भारी पडलं ते म्हंजे-जो येईल त्याला हात धरून जेवायला बसवायचं. हे म्हंजे फारच. त्यामुळे माझ्या अध्र्या आयुष्यातला सर्वाधिक वेळ स्वयंपाकघरात गेला, जो देणं मला आवडत नव्हतं न् परवडत नव्हतं.
कार्यकर्त्यांना प्रेम आणि जेवणापेक्षा त्याबरोबर पैसे-पद-सत्तेमध्ये काही जागा.. असं हवं असतं, हे त्या दोन वेडया मायलेकरांना कळलंच नाही कधी आणि मुळात चळवळीमध्ये कार्यकर्त्यांना राजकीय ज्ञान देणं आणि त्यांचा वैचारिक पाया मजबूत करणं आणि समाजाचे प्रश्न ठोस मार्गानं सोडवणं हे मुख्य काम आज अत्यंत महत्त्वाचं आहे, हे नामदेवची पँथरच काय. पण बाकीच्याही पक्षांच्या गावी नाही, ही दु:खाची गोष्ट आहे.
त्यापेक्षा मेधा पाटकर, अण्णा, बाबा आमटे, मदर टेरेसा यांनी आपापल्या मार्गानं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तरी केला. मेघाबाईंचा पक्ष नाही; पण ती सातत्यानं प्रश्न कुठले ना कुठले घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. अण्णांना काँग्रेसवाल्यांनी दलित पँथरपेक्षा जास्त वेगानं संपवलं (खरं तर इतके काही ते भयंकर नव्हते) दलित पँथर पहिल्यांदा तुटली याची कारणं बरीच आहेत. (माझ्या मते)
पहिली गोष्ट म्हणजे- दलित पँथरच्या आक्रमक जहाल भाषणांनी दलित वोटर्स पेटून उठू शकतात आणि त्याचबरोबर त्यातल्या नेतृत्वाच्या निर्णयात निवडणुकांचा कौल बदलू शकतो, ही गोष्ट काँग्रेसवाल्या हुश्शार लोकांच्या तत्काळ लक्षात आल्यानं त्यांना संपवण्याचे प्रयत्न सुरू झाले. नामदेवचे विचार न् भाषण सर्वात प्रभावी असल्याने आणि त्याचे ते विचार डावे वाटल्यानं पँथरमध्येच त्याच्यावर नाराज असणा-यांची संख्या वाढली. त्यातच सुनील दिघे न् बाळ खरमोडे, हिरामण पगार असे काही नक्षलवादी संघटनेशी संबंधित लोक पँथरमध्ये त्या वेळी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. झालं काय की, नामदेव डावा म्हणून राजा ढालेसारखी माणसं त्याला सोडून गेली. (सर्वात गंमत म्हणजे ज्या नामदेवनं पँथर काढली न् राजा ढाले त्यात नंतर आले, त्याच राजानं नामदेव ढसाळांची पँथरमधून हकालपट्टी अशी प्रेसनोट दिली!) आणि याच अंतर्विरोधामुळे आता दलित फोर्स नक्षली किंवा डाव्या विचारसरणीकडे आपण वळवू शकत नाही, हे लक्षात आल्यानं बाकीचे ‘डावे’ही नामदेवला सोडून बाहेर पडले! नामदेव एकटा पडला; पण तरीही तो लतिफ भैयांच्या बरोबर हिंडत होता. कार्यकर्त्यांना भेटत होता. कविता करत होता. माझ्याबरोबर भांडत होता-अंडरवर्ल्डच्या लोकांत मिसळत होता, असं सगळंच चाललेलं.
संभाजी काकडेंच्या ग्रुपमधल्या दिवेकरांनी नामदेवच्या पँथरमध्ये प्रवेश केला; पण नामेदवनं त्यांना अध्यक्षपद देऊन अनेक राजकीय पुस्तके वाचायला देऊनपण त्यांचा ओढा तसा संघटना काँग्रेसकडेच होता. तर कारखानदार-भांडवलदारविरोध असल्याने नामदेवला हे विळया-भोपळ्याचं सख्यं मानवत नव्हतं आणि मग दिवेकरही गेले.
एका तेजस्वी आक्रमक वैचारिक भूमिका असलेल्या चळवळीचं-त्यातला कार्यकर्त्यांचं ध्रुवीकरण वेगानं सत्ता संपत्ती असं चाललेलं- न् नामदेव हतबल होऊन पाहण्यापलीकडे काही करू शकत नव्हता. तो एकटा प्रश्न सोडवू शकत नव्हता; कारण शत्रू अदृश्य न् प्रचंड संख्येनं होते. चांगले विचार प्रश्न सोडवू शकतात, आणि फक्त चांगले विचारच प्रश्न सोडवू शकत नाहीत. (त्यासाठी आणि ब-याच गोष्टी लागतात.)
महाराष्ट्रातल्या ब-याच चळवळी यादरम्यान नष्ट झालेल्या. युक्रांद-मागोआ-एक गाव एक पाणवठा अशा अनेक चळवळी विस्कळीत धूसर होत नाहीशा झाल्या. याचं कारण वेगानं वाढणा-या ग्लोबलायझेशनच्या रेटयात येणा-या पिढय़ांनी चळवळीशी, समाजाशी नातं तोडत, त्याग करण्याचं थांबवलं- स्वप्न पाहण्याचं थांबवलं- नंतरची पिढी प्रॅक्टिकल झाली.
बापाचा संघर्ष-त्याग-अपेक्षाभंग-नैराश्य-वैफल्य-पैसा-नोकरी-घर-सुरक्षितता याबाबचं अस्थैर्य यांनी पेटलेला नवा तरुण आता राजकारणात क्रांती न् समाजाचे प्रश्न सोडवणं न पाहता-पद-खुर्ची-पैसे- निवडणुकांचं राजकारण-नोकरी-पैसा-डिजिटल बोर्डिगवरचा स्वत:चा फोटो-असं पाहू लागला.
कदाचित ही काही काळपुरती आत्ममग्न बधिरता समजू; पण प्रत्येक चळवळीत काळाची पावलं ओळखून स्वत:ला आत्मपरीक्षण करून रिजनरेट केलं पाहिजे. पुन:श्च शून्यातून नव्या कार्यकर्त्यांची फळी उभारली पाहिजे; कारण प्रश्न संपत नसतात. संघर्ष संपत नसतो. गट-पक्ष-जमात-प्रदेश यापलीकडं जाऊन एक सर्वसमावेशक चळवळ बांधण्याची वेळ आली आहे. बेकारी-महागाई-अज्ञान-अराजक-आर्थिक अरिष्ट-मूलतत्त्ववादी-प्रतिगामी शक्ती वाढत चालली आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी व्यापक विचार, निश्चित ध्येयधोरण असलेली चळवळ अत्यंत आवश्यक आहे. ज्याची सुरुवात दलित पँथरने केली आणि आताही सेकंड इनिग्जची सुरुवात त्यांनीच करावी.