नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे शांततेचे प्रतीक आहेत. ते माझ्या शपथविधी सोहळ्याला आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
कराची- नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे शांततेचे प्रतीक आहेत. ते माझ्या शपथविधी सोहळ्याला आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
ते शांतीदूत आहेत, त्यांच्यावर जे भारतीय टीका करत आहेत त्यांनी ती करू नये. ते टीका करण्यात त्यांचा वेळ वाया घालवत आहेत. शांतता ही दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे त्याशिवाय दोन्ही देश प्रगती साधू शकत नाहीत, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातले ट्विट केले आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात चर्चा होणे आवश्यक आहे. चर्चेशिवाय दोन्ही देशांमधले कोणतेही प्रश्न मार्गी लागणार नाही असेही ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.
इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. सिद्धू यांनी लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणा-या पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या आलिंगनामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर विरोधकांनी हा मुद्दा उचलत टीका केली आहे.
बजरंग दलाचा इशारा
काँग्रेस नेते आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांची गळाभेट घेतल्याने सुरू झालेला वाद शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता या वादात बजरंग दलाने उडी घेतली असून सिद्धू यांचा शिरच्छेद करणा-यास ५ लाखांचे बक्षीस बजरंग दलाने जाहीर केले आहे.
सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला असून बजरंग दलाचा आग्रा जिल्हाध्यक्ष संजय जाट याने सिद्धू यांचा शिरच्छेद करणा-यास ५ लाखांचे इनाम देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. या व्हीडिओत जाट हा ५ लाखांचा धनादेश दाखवताना दिसतो.
सिद्धूंकडून पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना अलिंगन दिल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वांना सिद्धू यांना धडा मिळावा असे वाटत आहे. ज्यांनी देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी आपल्या मुलाला गमावले आहे. अशा कुटुंबीयांना सिद्धूंच्या या कृत्यामुळे धक्का बसला आहे. लोक सिद्धूंच्या विश्वासघातकीपणाला कधीच माफ करणार नाहीत. आग्रामध्ये सिद्धू यांना येण्यास बंदी असल्याचेही जाट याने म्हटले आहे.
माझं काय चुकलं : सिध्दू
कारगिल युद्धानंतर वाजपेयी यांनी परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा केली होती. तर नरेंद्र मोदींनी कोणतेही आमंत्रण नसताना नवाझ शरीफ यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. मी पाकिस्तानला जाऊन आलो, तर माझे काय चुकले, असा सवाल सिध्दू यांनी केला आहे.
सिद्धूचे हात-पाय तोडण्याचा इशारा
मुंबईतल्या आझाद मैदानात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धू यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी सिद्धूचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्नही केला, परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. या मोर्चादरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी सिद्धूला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, आम्ही जागोजागी धरणे आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सिद्धूला अटक होत नाही, तोपर्यंत हे सुरू राहणार आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. सिद्धू मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असेही ते म्हणाले आहेत.