मधुमेहींचा पाय हा ब-याच वेळा रुग्ण आणि त्यांचा डॉक्टर या दोघांनाही डोकेदुखी ठरतो. कारण वेळीच आणि योग्य ते उपाय करूनही अॅप्युटेशन म्हणजे पाय कापून टाकणं, सारख्या मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. कधी कधी तर हे सर्व करूनही हा रोग प्राणघातक होतो.‘मधुमेहाची राजधानी’ म्हणून कुप्रसिद्ध होत चाललेल्या भारतात प्रत्येकाने आपल्या पायांची काळजी घेणं गरजेचं ठरत आहे.
‘आपके पाँव देखे. बहुत हसीन हैं, इन्हे जमींपर मत उतारिएगा. मैंले हो जाएंगे,’ हा प्रसिद्ध संवाद आहे ‘पाकिजा’ या चित्रपटातला. अभिनेता राजकुमारने चित्रपटाची नायिका मीना कुमारी हिच्यासाठी म्हटलेला हा संवाद आजही रसिकांच्या ओठी आहे. आज ‘मधुमेही आणि पाय’ अर्थात ‘डायबेटिक फूट’ या विषयावर लिहिताना मला तो सतत आठवतोय. कारण मधुमेही व्यक्तींनी त्यांच्या पायांची निगा स्वत: राखणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. पायांची काळजी का आणि कशी राखली पाहिजे, यासाठीचा हा लेखनप्रपंच!
मधुमेह हा संपूर्ण शरीराला आणि सर्वच अवयवांना हळूहळू धोका पोहोचवतो, हे आता सर्वाना माहीत झालं आहे. मधुमेहामुळे व्यक्तीच्या राहणीमानावर विपरित परिणाम होतो. अन्न खाण्याच्या रोजच्या सवयींवर निर्बंध येतात. सततच्या डॉक्टरांकडच्या आणि प्रसंगी हॉस्पिटलच्या वा-या करून शरीरावर ताण पडतो. खिशाला कात्री बसते ती वेगळी. आज मेडिक्लेमसारख्या आरोग्यसेवाही मुधमेहींच्या इलाजावर केल्या जाणा-या आर्थिक ताणामुळे बेजार झाल्या आहेत. मधुमेहींच्या पायाला झालेल्या जखमा, त्यात होणारा जंतुसंसर्ग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गँगरीनसारख्या समस्या हे मधुमेहींसाठी रुग्णालयात भरती होण्याचं प्रमुख कारण आहे. क्वचितप्रसंगी हे जीवघेणंही ठरतं.
मधुमेहींचा पाय हा ब-याच वेळा रुग्ण आणि त्याचा डॉक्टर या दोघांनाही डोकेदुखी ठरतो. कारण वेळीच आणि योग्य ते उपाय करूनही अॅप्युटेशन म्हणजे पाय कापून टाकणं अशा मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. कधी कधी तर हे सर्व करूनही हा रोग प्राणघातक होतो.
मधुमेहींच्या पायाच्या जखमा आणि त्यातील जंतुसंसर्ग याची तीन प्रमुख कारणं आहेत. मधुमेहींच्या पेशी या रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे जंतुसंसर्ग होण्यास पोषण वातावरण निर्माण करतात. एखादी लहानशी जखम पायाच्या तळव्याला झाल्यास त्यात चटकन् जंतुसंसर्ग होऊन अवघ्या काही तासातच जखम चिघळून पायाच्या तळव्यापासून वरवर पसरू लागते. ब-याच वेळा पायांच्या बोटांच्या मधल्या पेरापासून जखम होण्याला सुरुवात होते.
मधुमेहींच्या पायाच्या संवेदना वाहून नेणाऱ्या चेतापेशी या निकामी होतात. त्यामुळे पायाच्या तळव्याच्या व इतर भागांच्या संवेदना नष्ट होतात. त्यामुळे शरीराचा भार पाडून तळव्याला कॅलोसिटी होतात. त्यातून जंतुसंसर्ग पटकन होतो. तसंच पायाला खडे इत्यादी टोचल्यास संवेदना नसल्याने जखमा होतात.
मधुमेहींच्या रक्तवाहिन्या निमुळत्या होत जातात. हा प्रकार पायाच्या लहान रोहिण्यांमध्ये अधिक दिसून येतो. त्यामुळे त्या भागाला रक्तपुरवठा कमी होऊन जंतुसंसर्गाला प्रतिकार करता येत नाही. त्यातून जंतूंचा अनिर्बंध प्रसार होत जातो.
मधुमेहींच्या पायाच्या जखमा आणि त्यातून होणारा जंतुसंसर्ग यांच्या उपचारात रक्तातील साखरेच्या प्रमाणावर चटकन् नियंत्रण आणणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी रुग्णाला दाखल करून नियमितप्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून त्यावर इन्सुलीन आणि इतर औषधांच्या मदतीने नियंत्रण आणणं जरुरीचं असतं. त्याशिवाय पायाच्या डॉक्टरी किंवा सीटीस्कॅन, एमआरआय या तपासण्या करून रोहिणीमधील रक्तप्रवाहाची स्थिती पाहणं. तसंच निलेमधील निर्बंध, व्हेरिकोव्हेन्स, हे रोगनिदान करणं महत्त्वाचं असतं. जखमेत पू झाल्यास शस्त्रक्रिया करून पू काढून आणि संसर्ग झालेल्या पेशी काढून टाकाव्या लागतात. तरीही जंतुसंसर्ग पसरू लागला तर उरलेला पाय वाचविण्यासाठी खराब झालेला पायाचा भाग कापून टाकावा लागतो. कधी कधी हा संसर्ग रक्तामधून पसरून जीवघेणा होऊ नये, यासाठीसुद्धा पाय कापून टाकावा लागतो. याशिवाय जंतुसंसर्गावर प्रभावशील योग्य अशी प्रतिजैविकं (अँटीबायोटिक्स) द्यावी लागतात.
हे सारे टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय करणं उत्तम. मधुमेहींनी रक्तातील सारखरेचे प्रमाण योग्य ते राहील असं पाहवं. पायाची स्वच्छता राखून वेळोवेळी पायाचं निरीक्षण करावं. अनवाणी पायांनी फिरू नये. त्यायोगे जखमा टाळता येतील. वेळोवेळी नखं काळजीपूर्वक काढून पायांची बोटं आणि बोटांमधील जागा स्वच्छ ठेवावीत. तळव्याला संवेदना नसल्यास मधुमेहींसाठी असणारी खास पादत्राणं घालावीत. या पादत्राणात शरीराचे पायावर पडणा-या वजनामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्याची वेगवेगळी तंत्र वापरली जातात. यासाठी वेळोवेळी ‘पोडोयाट्रिस्ट’ या तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्याने पादत्राणात योग्य ते बदल करावेत. आहार नियंत्रण औषधांच्या योग्य उपचाराने रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवल्यास मधुमेहींना पायाचे आजार टाळता येतील.