मित्र-मैत्रिणींसोबत जाण्यापेक्षा कुटुंबासोबत सहलीला जाण्याची मजा काही औरच! आणि त्यात एखाद्या निसर्गरम्य वातावरण असलेल्या ठिकाणी जायचं म्हणजे त्या मजेत आणखीनच भर पडते
मित्र-मैत्रिणींसोबत जाण्यापेक्षा कुटुंबासोबत सहलीला जाण्याची मजा काही औरच! आणि त्यात एखाद्या निसर्गरम्य वातावरण असलेल्या ठिकाणी जायचं म्हणजे त्या मजेत आणखीनच भर पडते. आता निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायचं तर त्यामध्ये कोकण भागाला वगळून चालणार नाही. निसर्गरम्य वातावरण म्हटलं की, कोकणाचा निसर्ग समोर येतो. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो. यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात जायचं म्हणून महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनला जायचं ठरलं. श्रीवर्धनला एक सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. श्रीवर्धन गावाच्या बाजूला असलेलं दांडा हे आमचं गाव. तिथे आमचं घर असल्यामुळे दुस-या ठिकाणी आमची राहण्याची सोय आम्हाला करावी लागली नाही.
खरं तर आमच्या गावी जाण्याचा योग जुळून आला तो श्रीवर्धनमुळे, त्या निमित्ताने का होईना आम्ही गावी गेलो. रात्रीचा प्रवास जास्त सोयीचा म्हणून खासगी गाडी करून आम्ही रात्री आठ वाजता गावी जाण्यास निघालो. कधी एकदा मुंबई सोडून गावचा रस्ता गाठतोय असं वाटत होतं. आता कोकणच्या रस्त्यावरून जायचं म्हणजे गाडीत झोप तरी कसली येणार म्हणा. म्हणून मी गाडीतून जाताना लागणारी थंडगार हवा, झाडा-झुडपांचा येणारा सुगंध, काळोखातून दिसत नसला तरी जाणवणारा निसर्ग या सगळ्याचा आनंद लुटत होते. पहाटे पाच वाजता आम्ही दांडा गावात म्हणजे आमच्या घरी पोहोचलो. निसर्गाच्या सान्निध्यातून झालेला हा आठ तासाचा प्रवास कधी संपला काही कळलंही नाही. आठ तासांचा प्रवास केला तरी कोणत्याही प्रकारचा थकवा अजिबात जाणवत नव्हता. कारण पहाटेच्या प्रसन्न वातावरणाने मन अगदी प्रसन्न झालं होतं. पहाटेचे पाच वाजले होते, आता झोपायचं नाही म्हणून आम्ही लगेच आजूबाजूचा परिसर फिरायला गेलो. सूर्योदयाच्यावेळी कौलावर पडणारी सुंदर सोनेरी किरणं, वा-याबरोबर डोलणारी नारळाची झाडं, शांत वातावरणात येणारा समुद्राचा आवाज हे असं निसर्गसौंदर्य मी या आधी कधीच पाहिलं नव्हतं.
फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही हरिहरेश्वरला जाण्यास निघालो. हरिहरेश्वर मंदिरातील देवाचं दर्शन घेतलं. रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकडय़ांच्या कुशीत लपलेलं गाव म्हणजे हरिहरेश्वर. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचं तीर्थस्थान मानलं जातं. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचं कुलदैवत आहे. हरिहरेश्वरातील सगळय़ात महत्त्वाचं देऊळ म्हणजे काळभैरवाचं, सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचं दर्शन आणि नंतर हरिहरेश्वराचं आणि पुन्हा काळभैरवाचं दर्शन घ्यायचं अशी इथली प्रथा आहे. हरिहरेश्वराचं दर्शन घेतल्यावर तेथील समुद्रात आम्ही बेभान होऊन पाण्यात भिजलो. समुद्राजवळ बराच वेळ मजा केल्यानंतर आम्हाला चांगलीच भूक लागली होती. म्हणून आम्ही समुद्राजवळच असलेल्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला. मग तिथे खाणं-पिणं झाल्यावर आम्ही श्रीवर्धनजवळील एमटीडीसी रिसॉर्टला गेलो. हे एक छान ठिकाण आहे. पुन्हा एकदा आम्ही समुद्राजवळ मजा करायला गेलो. समुद्राजवळ गेल्यावर आम्ही खूप खेळलो, पाण्यात भिजलो, खूप सारे फोटो काढले. अशा प्रकारे श्रीवर्धनच्या समुद्रात आम्ही इतके हरवलो की पुन्हा घरी परतूच नये असं वाटत होतं. या एका दिवसाच्या सहलीमध्ये आम्ही कोकणच्या संपूर्ण निसर्गाचं रूप पाहिल्याचा आनंद आम्हाला होत होता. आतापर्यंत मी कधीही इतकी मजा केली नव्हती, तितकी मजा आम्ही आमच्या गावी सहलीच्या निमित्ताने केली. तेथील फेसाळणारा समुद्र आणि हे दृश्य म्हणजे खरोखरच अविस्मरणीय आहे. आजही तो दिवस, ती मजा आठवली की पुन्हा एकदा त्या निसर्गाच्या वातावरणात गेल्यासारखं वाटतं.
ं