महाराष्ट्रातल्या काँग्रेसला नेते आहेत. प्रदेश अध्यक्ष आहे, प्रभारी आहे. पण नेतृत्व नाही. मोदी-अमित शहा जोडीला हरवता येते याची साक्ष अहमद पटेल यांच्या विजयाने मिळाली. पण कुणीही हा विजय ‘कॅश’ करण्याच्या भानगडीत पडले नाही. मरगळलेले नेते, सैरभैर कार्यकर्ते यांच्या तावडीत सापडलेल्या काँग्रेसचे लचके तोडण्याचे भाजपने ठरवले आहे.
आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्तएक वर्ष आणि ८ महिने उरले आहेत. मतदारांसाठी वेळ असला तरी भाजपने आतापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांआधी अनेक राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. गुजरातसह पाच राज्यांच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातल्या आहेत. त्यामुळे ही दोन वर्षे राजकीय उलथापालथींनी देशातले राजकारण ढवळून निघणार आहे. निवडणुका म्हटल्या की, मोदींचा पाय एका जागी बसत नाही. त्यात गुजरात तर त्यांचे घरचे प्रतिष्ठेचे राज्य आहे. त्यामुळे येती दोन वर्षे निवडणुकीच्या रणधुमाळी पलीकडे देशात काहीही होणार नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. या वेळी ३६० जागा जिंकण्याचे भाजपचे टारगेट आहे. गेल्या वेळी हरलेल्या १५० जागांवर फोकस करण्याचे भाजपने योजिले आहे. प्रामुख्याने ओडिशा, बंगाल, तामीळनाडू, केरळ या राज्यांतील या जागा आहेत आणि भाजप तिथे जोर लावणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेऊन रणनीती ठरवली. भाजपला हे कितपत जमेल, २०१४ ची जादू पुन्हा नरेंद्र मोदी करू शकतील का? हे आजच सांगणे अवघड आहे. कारण मोदींची २०१४ ची लाट आज नाही. मोदींना तीन वर्षात काही करून दाखवता आले नसले तरी लोकांनी आशा सोडलेली नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ते दिसले. नोटाबंदीने हाल झालेले असतानाही लोकांनी उत्तर प्रदेशसारखे राज्य त्यांच्या हाती दिले. मोदी सत्तेत आले तेव्हा देशात ७ राज्यात भाजपची सत्ता होती. आज १८ राज्ये भाजपच्या हातात आली आहेत. १३८७ आमदार एकटय़ा भाजपचे आहेत. याचा अर्थ मोदींची मोहिनी अजूनही जनमाणसावर कायम आहे. तिहेरी तलाकच्या ताज्या निकालाचा फायदा भाजपच उठवणार आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मोदी लढणार कुणाशी? मैदानात त्यांच्या तोडीचा पैलवानच दिसत नाही. २०१९ साली त्यांना आव्हान देऊ शकेल असा एकही नेता विरोधकांमध्ये उरलेला नाही. राहुल गांधी कधी गंभीर नव्हतेच. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे नाव कालपर्यंत जोरदारपणे विरोधकांच्या छावणीतून पुढे आणले जात होते. पण आता नितीशकुमारच एनडीएच्या छावणीत दाखल झाल्याने विषयच संपला. विरोधकांनी २०१९ नव्हे तर २०२२ ची तयारी करावी अशी टिंगलटवाळी सुरू झाली आहे. संयुक्त जनता दलातील बंडाळीनंतर शरद यादव यांनी विरोधी ऐक्याची खटपट सुरू केली आहे. विखुरलेल्या विरोधकांना एकत्र आणणे एवढे सोपे नाही. ममता बॅनर्जी आणि मायावती यांचे अहंकार भयंकर आहेत. पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावरच शेवटी घोडे अडणार आहे. १९७७ साली इंदिरा गांधी हरतील असे कुणाला वाटले होते. पण हरल्या. १९८९ मध्ये राजीव गांधी आणि २००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी निवडणूक हरतील असे कुणी भाकीत केले होते? पण हरले. ७७ साली इंदिराजींना पाडणा-या जनतेनेच नंतर लगेच त्यांना पुन्हा डोक्यावर घेतले होते. १९८४ साली आपल्या पहिल्याच निवडणुकीत फक्त दोन जागा जिंकणारा भाजप आज सत्तेत येईल कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. पण आले. जनता निर्णय करते. पण त्यासाठी जनतेचा विश्वास कमवावा लागतो. विश्वासार्हतेचाच आज दुष्काळ असल्याने मोदींना ‘लाइन क्लिअर’ मिळत आहे.
देशाच्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचीही हवा वेगळी नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागले होते. ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुका भाजप व शिवसेनेने तसेच दोन्ही काँग्रेसने वेगवेगळ्या लढवल्या. भाजपचे १२३ आमदार तर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. काँग्रेसपक्ष फक्त ४२ जागा जिंकू शकला तर राष्ट्रवादी ४१ वर थांबला. बहुमतासाठी १४५ चा मॅजिकचा आकडा गाठण्यासाठी भाजपला २३ जागा कमी पडल्या. त्यामुळे सेनेला सोबत घेऊन भाजपने सरकार बनवले. पण सेनेने सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका निभावली. युतीच्या संसाराला कंटाळलेल्या भाजप आणि सेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे आतापासूनच ठरवले आहे. शिवसेनेने तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ३६ जागा जिंकण्याचे टारगेटही निश्चित केले आहे. अर्थात उद्धव ठाकरे यांनाच हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. भाजपचा सारा भार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. गेल्या तीन वर्षात भाजपला १३ महापालिका जिंकून देऊन फडणवीस यांनी रेकॉर्ड केला आहे. कुठल्याही मुख्यमंत्र्याला आतापर्यंत हे जमले नव्हते. भाजप पूर्वी स्वत:च्याच कोशात राहायची. फडणविसांनी दरवाजे-खिडक्या उघडल्या. विरोधकांमध्ये फोडाफोडी केली. कसेही करून निवडणुका जिंकायच्या, ताकद वाढवायची, ही भाजपची अलीकडची रणनीती आहे. त्याबरहुकूम फडणविसांचा बुलडोझर सुरू आहे. दमखम असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचे मिशन अजूनही संपलेले नाही. त्यामुळे लवकरच काही दबंग नेते भाजपमध्ये डेरेदाखल झालेले दिसतील. काँग्रेस, राष्ट्रवादीच नव्हे तर शिवसेनेचेही काही आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. त्या हिशोबाने महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप झालेला पाहायला मिळणार आहे.
येत्या निवडणुकीत कसेही करून राज्यात एकहाती सत्ता फडणविसांना आणायची आहे. याच जिद्दीने त्यांनी नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदा खेचल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे. विरोधी पक्षांचे त्यांना टेन्शन नाही ‘आपला छगन भुजबळ’ होण्याच्या भीतीने अनेक विरोधी नेते भाजपच्या वळचणीला उभे राहू पाहात आहेत. टेन्शन आहे तर ते शेतक-यांचे. ‘ऐतिहासिक कर्जमाफी’ म्हणून त्यांनी गाजावाजा केलेल्या कर्जमाफीचा एक छदामही अजून शेतक-यांच्या हातात आलेला नाही. पावसाने दगा दिल्याने खरिपाचा हंगाम बुडाला. त्यामुळे शेतक-यांची परिस्थिती आणखी वाईट आहे. अनेक भागात दुबार पेरणीही बुडाली. शेतक-यांची कर्जबाजारी वाढली आहे. दुखावलेल्या या ‘किसान व्होट बँके’ला मुख्यमंत्री कसा आणि केव्हा दिलासा देतात, त्यावर सारा खेळ आहे. निवडणुकीत लक्षात राहील असे ‘टायमिंग’ साधून मुख्यमंत्री कर्जमाफी शेतक-यांच्या हातात ठेवतील असे दिसते. फडणविसांच्या सा-या हालचाली निवडणुका जिंकण्याच्या हिशोबाने सुरू आहेत. काँग्रेसची काय तयारी आहे? एकदिलाने लढले तर मोदी-अमित शहांचा उमेदवारही पाडता येतो, हे अहमद पटेल यांच्या विजयाने नुकतेच पहायला मिळाले. पण काँग्रेसने अहमद पटेल यांच्या विजयाचे काय भांडवल केले? काहीही नाही. राहुल गांधींनी अहमद पटेल यांना सोबत घेऊन सारा देश पिंजून काढायला हवा होता. पण कमालीची मरगळ आहे. हे सुस्त नेते चपळ देवेंद्र चमूपुढे टिकतील? अजूनही असंख्य कार्यकर्ते काँग्रेसमध्ये टिकून आहेत, पण आपण काँग्रेसमध्ये का राहायचे? या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नाही. भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, या चिंतेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ग्रासले आहे. कारण काँग्रेसला नेताच नाही. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा टाइमपास चालू आहे. ‘मिस्टर क्लिन’ पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या जागी आणण्याचे घाटत आहे. पण चारित्र्याचे ढोल पिटून निवडणूक कशी जिंकणार? विलासराव देशमुख कार्यकर्त्यांना बळ देत.
पृथ्वीराजबाबा किंवा अशोक चव्हाण हे कसब दाखवू शकले नाहीत. भाजप दर दोन महिन्याने कार्यकर्त्यांना कार्यक्रम देत आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता रिकामा बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावातील काँग्रेसच्या दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू आहे. कुठल्याही चव्हाणाला नागपुरात तळ देऊन बसले पाहिजे असे वाटत नाही. नांदेड हा अशोक चव्हाण यांचा जिल्हा. तिथल्या काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला. प्रदेशच्या अध्यक्षाला आपला जिल्हाही सांभाळता आलेला नाही. सलग आठ वर्षापासून मोहन प्रकाश यांच्याकडे प्रभारी या नात्याने महाराष्ट्राचा कारभार आहे. आठ वर्षात काँग्रेसमधला अंधार वाढला. पण मोहन प्रकाश टिकून आहेत. दोन वर्षापासून खोळंबलेल्या संघटनात्मक निवडणुका सप्टेंबरअखेर उरकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवे नेते कदाचित मिळतीलही. पण विश्वासार्हतेचे काय? राष्ट्रवादीचीही परिस्थिती वेगळी नाही. हात राखून लढणे सुरू आहे. दोन काँग्रेस एकत्र मिळून लढल्या तर भाजपच्या तोंडाला फेस आणता येतो. गेल्या निवडणुकीतील मतांची टक्केवारी तेच सांगते. पुढा-यांना हे कळते, पण वळत नाही. पण आता तर तीही वेळ निघून गेली आहे. ओसाडगावच्या पाटीलकीसाठी मारामारी सुरू आहे.