कॉलेज संपल्यानंतरचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे आयुष्यात पुढे स्वत:च्या पायावर उभं राहणं, स्थिर होणं. स्वत:च्या आयुष्याबद्दल दूरदृष्टी यावेळी विकसित होत असते. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्यांला कॅम्पस इंटरव्ह्यू महत्त्वाचे वाटतात.
कॉलेजच्या अखेरच्या वर्षात अगदी मनासारखी धमाल केली जाते. पण कॉलेज पूर्ण होता होता मग वेध लागतात ते चांगल्या नोकरीचे ! नोकरीपेक्षा त्याला जॉब असं म्हटलं तर किंचित बरं वाटतं. तर हा जॉब मिळवण्याची मग धडपड सुरू होते. हवा तसा जॉब हव्या त्या कंपनीत मिळवणं म्हणजे तारेवरची कसरत असते. या कसरतीची सुरुवात होते ती कॉलेजच्या अखेरच्या वर्षापासूनच.
प्रत्येक कॉलेजमध्ये एक प्लेसमेंट डिपार्टमेंट असतं, ज्याचं मुख्य उद्दिष्ट उसतं ते म्हणजे त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोकरीचे अधिकाधिक चांगले पर्याय या त्यांच्या अखेरच्या वर्षात उपलब्ध करून देत राहणं, त्यांच्या शंका-समस्यांचं निराकरण करणं, आणि दरवर्षी कॉलेजमध्ये अधिकाधिक चांगल्या कंपन्या प्लेसमेंटच्या प्रक्रियेसाठी उपलब्ध करणं.
कॉलेजमधल्या या संपूर्ण प्रक्रियेला ‘कॅम्पस प्लेसमेंट’असं म्हणतात. आपल्याला कॉलेजमधल्या आपल्या अखेरच्या वर्षात लवकरात लवकर चांगला जॉब मिळावा, असं वाटणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या कॉलेजमधल्या या प्लेसमेंट ऑफिसशी सतत संपर्कात राहणं खूप महत्त्वाचं असतं.
कॅम्पस प्लेसमेंटचे दोन प्रकार असतात, ते म्हणजे ‘इन हाऊस कॅम्पस’ आणि ‘पूल कॅम्पस’ ! कॉलेजने स्वत:च्याच विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या एखाद्या कंपनीच्या प्लेसमेंट प्रक्रियेला ‘इन हाऊस कॅम्पस प्लेसमेंट’ असे म्हणतात. इन हाऊस प्लेसमेंट हा प्रकार अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यातले प्रमुख घटक म्हणजे कॉलेज आणि संबंधित कंपनी यांच्यातील समन्वय, एकमेकांबद्दलचा अनुभव, तसेच संबंध आणि मुख्य म्हणजे कॉलेजमधील मुलांची एकूण गुणवत्ता! या एकूण पार्श्वभूमीवर , त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट प्रक्रिया ठेवायची की नाही हे कंपन्या ठरवतात.
नामांकित कॉलेजांमध्ये हे घटक हवे तसे मिळत असल्याने तिथे मोठमोठय़ा नावाजलेल्या कंपन्यांची रेलचेल दिसून येते. तर इतर कॉलेजमध्ये ही मोठमोठी नावे क्वचित आढळून येतात. या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनासुद्धा ठाऊक असतात. त्यामुळेच वर्षागणिक नामांकित कॉलेजांची कट ऑफ आणि त्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवण्यासाठीची विद्यार्थ्यांमधली स्पर्धा वाढतच चालली आहे.
आता या पुढचा भाग असतो तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या पात्रतेचा. बहुतेक सर्वच कंपन्या प्लेसमेंटसाठी पात्र ठरण्यासाठीची अट अर्थात निवडीचे निकष आधी जाहीर करतात आणि फक्त तेच विद्यार्थी प्लेसमेंट प्रक्रियेसाठी उपस्थित राहू शकतात जे या अटीत पात्र ठरतात. बरेचदा ही अट सर्व वर्षाच्या (३ किंवा ४ र्वष) किंवा फक्त अखेरच्या वर्षाच्या गुणांची सरासरी असते.
ज्याला सर्वसाधारणत: अॅग्रीगेट असं म्हटलं जातं. ही अट कधी ७०-७५ टक्क्यांची असते तर कधी ५५-६० टक्क्यांची सुद्धा असू शकते. मोठमोठय़ा कंपन्या बरेचदा फर्स्ट क्लासला प्राधान्य देतात, म्हणजे कमीत कमी ६० टक्के अॅग्रीगेट असणारे विद्यार्थी. कंपनीने ठरवून दिलेल्यापेक्षा कमी अॅग्रीगेट असणारे विद्यार्थी सुरुवातीलाच प्रक्रियेतून बाद होतात.
त्यामुळेच अॅग्रीगेट टिकवून ठेवण्यासाठी सर्वच वर्षामध्ये फर्स्ट क्लास मिळवणे गरजेचे असते, कारण अॅग्रीगेट ही त्या सर्व गुणांची सरासरी (अॅव्हरेज) असते आणि बरेचदा कॉलेज लाईफ मनमुराद जगण्याच्या नादात अॅग्रीगेट टिकवून ठेवण्याकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होतं, आणि मग अवघ्या काही गुणांच्या फरकामुळे प्लेसमेंट प्रक्रियेच्या गेटपर्यंत जाऊन मागे फिरण्याची नामुष्की जिव्हारी लागते. त्यामुळेच कॉलेज लाईफ कितीही आनंदाने जगत असलो तरी चांगल्या कंपनीत जॉब हवा असल्यास किंवा साधारणत: पुढच्या प्रत्येक गोष्टींसाठी आपलं मुख्य लक्ष्य हे चांगले गुण मिळवण्याकडेच असायला हवं.
गुणांच्या अटीत पात्र ठरल्यानंतर मग पुढचा टप्पा असतो तो ख-या प्लेसमेंट प्रक्रियेचा. यात साधारणत: ३ विभाग असतात, ते म्हणजे अॅप्टिटय़ूड टेस्ट , ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू. अॅप्टिटय़ूड टेस्ट हा पहिला टप्पा असतो, ज्यात प्रामुख्याने किंचित अवघड असे प्रश्न विचारले जातात, ज्यांना सोडवण्यासाठी मर्यादित कालावधी दिला जातो. त्यासाठीच्या उत्तरांच्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडायचा असतो.
यात गणित, इंग्रजी आणि लॉजिक किंवा तंत्रज्ञान या विषयांवर प्रश्न विचारलेले असतात. ही मुलाखत सगळ्यात अवघड समजली जाण्यामागील प्रमुख कारण म्हणजे यात अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर प्रश्न विचारले जातात, ज्यासाठी वेगळी तयारी करण्याची गरज असते. उगाचच माहीत नसताना उत्तर निवडण्याची सवय इथे भोवते आणि जवळजवळ ५०-५५% लोक या फेरीतच बाद होतात.
हा टप्पा पार करणं म्हणजे बरेचदा अर्धी लढाई जिंकण्यासारखंच असतं. कारण पहिल्याच टप्प्यात यश मिळवल्याने आत्मविश्वास दुणावतो आणि बरेचदा यानंतरचे टप्पे किंचित किंवा बरेच सोपे असतात. पुढचा टप्पा असतो ग्रुप डिस्कशन ! नावावरूनच या टप्प्यात काय असणार ते कळतं ! प्रत्येक कंपनीमध्ये ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्यबळ विभाग असतो, जो एकंदरीत ही प्लेसमेंट प्रक्रिया आयोजित करतो.
प्लेसमेंटच्या प्रक्रियेत कोणते प्रश्न विचारावेत, त्यांची चाचपणी इथपासून ते कोणते आणि किती जण निवडावेत इथपर्यंत सर्वकाही हा विभागच सांभाळतो. ग्रुप डिस्कशन फेरीत पहिल्या फेरीतून निवड झालेल्या उमेदवारांचे दोन गट केले जातात, ज्यात एक विषय दिला जातो, ज्यात एका गटाने केवळ समर्थकाची भूमिका घ्यायची असते तर दुस-या गटाने केवळ विरोधकाची भूमिका घ्यायची असते.
बाजू कुठलीही असली तरीही प्रत्येक जण आपला मुद्दा किती ठामपणे, स्पष्टपणे आणि त्याचबरोबर किती सामंजस्याने समोरच्या लोकांना पटवून देऊ शकतो, त्यातला आत्मविश्वास आणि योग्यता इत्यादी अशा अनेक निकषांवर या फेरीत निवड केली जाते. या फेरीत लक्षात ठेवण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की ग्रुप डिस्कशन किंवा चर्चा म्हणजे भांडण नव्हे. अनेकदा आपलं म्हणणं पटवून देण्याच्या नादात आपला आवाज चढतो, हावभाव आणि हातवारे बदलतात, देहबोली आक्रमक होते, इत्यादी. पण या सर्व गोष्टी येथे कटाक्षाने टाळायच्याच असतात.
गोंधळून जाऊन असंबंध किंवा काहीच न बोलणं अथवा अतिउत्साहात आक्रमक होणं या दोन्ही गोष्टी येथे चालत नाहीतच. या फेरीसाठी इतरही काही नियम असतात, जे प्लेसमेंट प्रक्रियेत कुठेही सांगितले जात नाहीत, ते प्रत्येकाने स्वत:हून जाणून घ्यायचे असतात. समोरच्याला आपली बाजू पटवून देताना आपण त्या व्यक्तीचा किती आदर ठेवतो हा यात महत्त्वाचा भाग असतो.
बरेचदा चच्रेसाठीचा विषय हा सामाजिक, सांस्कृतिक असतो किंवा एखादा असा विषय ज्याला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतील. उदा. ‘शिक्षण आणि ज्ञान, हे समान की भिन्न?’ काहीवेळा मात्र उमेदवारांची आकलनक्षमता तपासण्यासाठी मुद्दाम द्वयर्थी विषय दिले जातात. यावेळी मात्र कुठला अर्थ घ्यावा आणि काय बोलावं हे त्या गटांमधल्या उमेदवारांवर अवलंबून असते. उदा. ‘कोलगेट’ हा विषय ! याचा एक अर्थ म्हणजे ‘कोल’-गेट अर्थात कोळसा घोटाळा किंवा मग दुसरा अर्थ म्हणजे कोलगेट टूथपेस्ट.
कुठलाही विषय दिल्यानंतर प्रत्येक गटाला पूर्वतयारीसाठी काही वेळ दिला जातो. या फेरीत नियमांचं पालन आणि मुद्देसूदपणा या निकषांवर दोन्ही गटातील सर्व किंवा काही उमेदवार निवडले जातात किंवा कधीकधी कोणीच निवडले जात नाही. ग्रुप डिस्कशन किंवा टेक्निकल इंटरव्ह्यू (यातील कोणता पर्याय ठेवावा हा संबंधित कंपनीचा निर्णय असतो.)
या प्रक्रियेतला अखेरचा टप्पा म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. पहिल्या दोन्ही फे-यांमध्ये निवडले गेलेले उमेदवार अखेर या फेरीत पोहोचतात. इथे कंपनीबद्दलची माहिती दिली जाते आणि उमेदवाराबद्दलची माहिती विचारली जाते. कंपनीचे नियम आणि अटी मान्य असल्यास त्या उमेदवाराची निवड कंपनीद्वारे केली जाते आणि मग कंपनीची अंतर्गत प्रक्रिया सुरू होते. अशाप्रकारे प्लेसमेंटची एकूण प्रक्रिया असते.
कॅम्पस प्लेसमेंटचाच दुसरा प्रकार असतो तो म्हणजे ‘पूल कॅम्पस’, जो पूर्णपणे इन-हाऊस पद्धतीप्रमाणेच असतो. एकच फरक म्हणजे, पूल कॅम्पसमध्ये प्लेसमेंट ज्या कॉलेजमध्ये आयोजित करण्यात येते, त्या कॉलेजव्यतिरिक्त इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येतं.
आयोजक कॉलेजच्या प्लेसमेंट विभागाकडून संबंधित माहिती इतर कॉलेजच्या प्लेसमेंट विभागांना कळवली जाते, जे पुढे ती माहिती आपापल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. दिलेल्या वेळी पात्र असलेले उमेदवार त्या आयोजक कॉलेजमध्ये हजर होतात आणि पुढची प्लेसमेंटची संपूर्ण प्रक्रिया ब-यापैकी इन-हाऊसप्रमाणेच असते. त्यात फारसा काही फरक नसतो.
प्लेसमेंट प्रक्रियेचा कॅम्पस प्लेसमेंटव्यतिरिक्त आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे ‘ऑफ-कॅम्पस प्लेसमेंट’. हा प्रकार फक्त पात्र उमेदवारांच्या बाबतीत वेगळा आहे. कॅम्पस प्लेसमेंट ही फक्त कॉलेजमध्ये शिकणा-या किंवा नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच फ्रेशर्ससाठी कॉलेजने आयोजित केलेली प्लेसमेंट प्रक्रिया असते. म्हणजेच यात कोणाही उमेदवाराला संबंधित कॉलेजच्या निमंत्रणावरून कॉलेजमध्ये आपली नावनोंदणी करावी लागते. त्याशिवाय या प्रक्रियेस उपस्थित राहता येत नाही. परंतु ‘ऑफ-कॅम्पस’ प्रक्रिया ही पूर्णत: संबंधित कंपनीमार्फत आयोजित केलेली प्रक्रिया असते.
ज्यात कोणत्याही कॉलेजचा सहभाग हा केवळ विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती देण्यापर्यंत आणि फार फार तर प्रक्रियेसाठी कॉलेजची जागा कंपनीला उपलब्ध करून देण्यापर्यंत मर्यादित असतो. याशिवाय या प्रक्रियेसाठीची उमेदवार नोंदणी हीसुद्धा कंपनीतर्फेच स्वत:च्या वेबसाईटवर केली जाते. कॉलेज यासाठी आपल्या विद्यार्थ्यांची नावे कंपनीला पाठवू शकतात परंतु प्रामुख्याने प्रत्येक उमेदवाराने स्वत:हून या प्रक्रियेसाठी कंपनीकडे नोंदणी करण्याची पद्धत या प्रक्रियेत अवलंबली जाते. त्यामुळे शिक्षण पूर्ण होऊन बरीच वर्ष झालेला किंवा असलेल्या जॉबपेक्षा चांगला जॉब हवा असलेला कुठलाही उमेदवार प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो.
इथेसुद्धा कॅम्पस प्लेसमेंटप्रमाणेच पात्र ठरण्यासाठी गुणांची अट किंवा कामाच्या अनुभवाची अट ही कंपनीतर्फे ठेवलेली असतेच. पुढची सगळी प्रक्रिया मात्र इतर प्रकारांप्रमाणेच इथेसुद्धा सारखीच असते. याशिवाय वॉक-इन इंटरव्ह्यू हा देखील एक प्लेसमेंटचा प्रकार आहे. ज्यात बहुतेक वेळेस कुठल्याही पात्रता अटीशिवाय इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी जाऊ शकतो.
काही कंपन्या वरीलपैकी सर्व किंवा फक्त काही घटक आपल्या प्रक्रियेत ठेवतात आणि त्याची पूर्वसूचना उमेदवारांना दिली जाते. याशिवाय काही कंपन्यांची अशीसुद्धा अट असते की एकदा त्या कंपनीच्या प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी झालेल्या परंतु निवड न झालेल्या अशा उमेदवारांना पुढील काही महिने त्या कंपनीच्या प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. हा काळ किती महिन्यांचा असावा याचा निर्णय कंपनी करते.
त्याशिवाय काही कॉलेजसुद्धा अशी अट ठेवतात की एखाद्या कंपनीत कॉलेजच्या प्लेसमेंट प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा नियमांचे उल्लंघन करणा-या विद्यार्थ्यांना कॉलेजतर्फे पुढील प्लेसमेंट्समध्ये सहभागी होता येत नाही. यामागील उद्दिष्ट हेच असते की जास्तीत जास्त उमेदवारांना सहभागी होण्याची संधी मिळावी आणि एकूणच या प्रक्रियेबद्दल उमेदवारांमध्ये गांभीर्य राहावे.
त्यामुळेच एखाद्-दोन संधी हुकल्या किंवा अपयश आले तरीही निराश होऊ नये. उलट भविष्यात येणा-या अनेक संधींची तयारी जोमाने करावी.