ऑफस्पिनर आर. अश्विनसह मध्यमगती गोलंदाज हार्दिक पंडयाने टाकलेले ‘नोबॉल’ तसेच रात्रीचे दव भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले, असे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सांगितले.
मुंबई – ऑफस्पिनर आर. अश्विनसह मध्यमगती गोलंदाज हार्दिक पंडयाने टाकलेले ‘नोबॉल’ तसेच रात्रीचे दव भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले, असे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सांगितले.
‘‘उपांत्य फेरीचे सामने अर्धा तास लवकर सुरू झाले. त्यामुळे नाणेफेक हरणे घातक ठरले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजीवेळी सुरुवातीला कमी दव होते. मात्र त्यानंतर दव वाढत गेले. त्यामुळे चेंडू लवकर ओला होत होता. परिणामी स्पिनर्स अपेक्षितपणे चेंडू ‘टर्न’ करू शकले नाहीत. याचा फायदा प्रतिस्पर्धी फलंदाजांनी घेतला. लेंडल सिमन्सचे कौतुक करायला हवे.
मात्र ‘नोबॉल’वर त्याला मिळालेल्या जीवदानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्थिरावलेला सिमन्स बाद झाला असता तर वेस्ट इंडिजचा पाठलाग थोडा अवघड गेला असता. कारण नव्या फलंदाजाला ‘सेट’ होण्यास थोडा अवधी लागतो. फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून अपेक्षित मदत मिळत नव्हती. तरीही आम्ही चांगली चुरस दिली,’’ असे धोनीने म्हटले.
सातत्याने सरावानंतर ‘नोबॉल’ टाळू शकता येतात, असे भारतीय कर्णधाराचे मत पडले. ‘‘वारंवार सराव केल्यास फ्रंटफुटवरील ‘नोबॉल’ टाळता येऊ शकतात. ‘नोबॉल’ पडेल, असे कुठल्याही गोलंदाजाला वाटत नसते. मात्र मनात आणले तर गोलंदाज स्वत:ला ‘नोबॉल’ टाकण्यापासून वंचित ठेऊ शकतात,’’ असे धोनीला वाटते.
टी-२० फॉरमॅटमध्ये कितीही मोठी धावसंख्या सुरक्षित मानता येत नाही, असे धोनीने यावेळी सांगितले. ‘‘टी-२० क्रिकेटमध्ये अमुक इतकी धावसंख्या विजयासाठी पुरेशी आहे, असे म्हणता येणार नाही. कारण यापूर्वी २२०, २३० धावांचा यशस्वी पाठलाग झालेला आहे. खेळपट्टीचा रागरंग आणि तुमची गोलंदाजी यावर दुस-यांदा क्षेत्ररक्षण करणा-या संघाचे यश अवलंबून असते,’’ असे धोनीने म्हटले.