यावरून घडलेले प्रसंग नमूद करण्याआधी काही प्रथा, समजूती आणि सवयींची पार्श्वभूमी नमूद करणे, आवश्यक आहे. ट्रेनने प्रवासाला जाताना अशी प्रथा आणि समजूत असते की, लांब पल्ल्याच्या गाडया, ज्या सातनंतर सुटत. त्यांना एक भोजनयान म्हणजे डायनिंग कार किंवा पॅन्ट्री कार असे. ज्यातून जेवण, न्याहारी वैगेरे दिले जात. इतकेच नव्हे तर पुणे, नाशिकदरम्यान जाणा-या डेक्कन क्वीन, इंद्रायणी, पंचवटी वैगेरे गाडयांतून न्याहारी दिली जाते. अर्थात याला काही गाडया अपवाद असतात, याची मला कल्पना नव्हती.
स्थानिक, रणजी आणि दुलीप ट्रॉफी लढतींच्या दिवशी सकाळी भरपूर न्याहारी, जेवणाच्या सुट्टीत फक्त सूप, एक ब्रेडचा स्लाइस आणि असल्यास सफरचंद, फ्रूट सलाड किंवा आइस्क्रीम ही माझी सवय. मात्र १९७३ मध्ये कानपूरच्या माझ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दुपारी आमच्या खोलीत टेबलावर १०-१२ बशा आणि भांडी पाहून थक्क झालो. दोन भाज्या, चिकन, मटन, दोन प्रकारच्या आमटया (शाकाहारी आणि अंडय़ाची करी), नान, रोटी, ब्रेड, सलाड, दही हे पदार्थ म्हणजे ७-८ जणांचे जेवण होते. ‘ये क्या लाया है’ असे विचारताच ‘ये कम है क्या? और लाऊँ’ असे म्हणताच, ‘ते तसेच ठेवा’ असे सांगितले आणि सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाला खाण्यास सांगितले. आमच्यासाठी सूप (शाहाकारी टोमॅटो), यातील दोन ब्रेडचे स्लाइस आणि थंडीत आइस्क्रीम नको. सफरचंद आण. तसेच रोज हेच ठेव, असे सांगितले.
‘तुम्ही भुकेले राहू नका. सफरचंद तरी भरपूर खा’ म्हणून रोज डझनभर सफरचंदे आणून ठेवल्यावर, इतकी कशाला आणली, असे म्हणताच माझे सहकारी ‘अरे, असू दे. हॉटेलवर नेऊ या. आपले सहकारी आणि आपणास रात्री खाता येतील, असे म्हणून ती हॉटेलवर घेऊन जात असू. ही खालील किश्श्यांची पार्श्वभूमी आणि आता किस्से.
काठेवाडी मामा : १९६८ मध्ये राजकोटमधील मुंबई आणि सौराष्ट्र या रणजी सामन्यासाठी माझी नेमणूक झाली. माझे सहकारी देसाई होते. हे चांगलेच जाडजूड होते. फावल्या वेळात ते कूपरेजवर फुटबॉलच्या सामन्यात पंचगिरी करत. तसेच चौपाटीवरील स्विमिंगपूलमध्ये नवोदितांना पोहणे शिकवत. त्यांच्या जाडेपणामुळे काही क्रिकेटपटू त्यांना, ‘‘तुम्ही पाण्यात उतरता तेव्हा तलावातील पाणी ओसंडून जाऊ नये म्हणून आधीच त्याची पातळी कमी करतात का,’’ असे थट्टेने विचारत. तेव्हा तेही, ‘‘पाणी ओसंडून जाण्याचे (ओव्हरफ्लो) नळ माझ्यासारखेच मोठे ठेवले आहेत. त्यामुळे पाणी समुद्रात वाहून जाते,’’असे सडेतोड उत्तर देत. असो. त्या सामन्यासाठी रात्री ७.३० वाजता सुटणा-या सौराष्ट्र मेलने निघालो. पूर्वी राजकोट, भावनगर या ठिकाणी जाण्यास प्रथम मुंबई ते सुरेंद्रनगपर्यंत मोठी गाडी (ब्रॉड गेज) आणि नंतर छोटी गाडी (मीटर गेज) असे. आता थेट मोठीच गाडी जाते. गाडीत आठ वाजता तिकीट तपासनीस आल्यावर त्याला सर्वसाधारण रितीप्रमाणे जेवणाची ऑर्डर देऊ लागल्यावर देसाई व तपासनीस दोघेही मला म्हणाले की, या गाडीला जेवणाचा डबा (डायनिंग कार) नसतो. कारण या गाडीला येणारे सर्व प्रवासी जेवूनच येतात. पहाटे पाच किंवा सकाळी सात वाजता अहमदाबाद किंवा सुरेंद्रनगरला उतरून न्याहारीस घरी पोहोचतात. मला भूक तर होतीच. तेव्हा देसाईंना ‘तुम्ही कसे जेवणार’ असे म्हणताच त्यांनीही ‘मी जेवूनच आलोय व भूक नाही,’ असे उत्तर दिले. डहाणू स्टेशनवर सहा केळी घेतली. मी दोन खाऊन देसाईंना ‘तुम्हीपण खा’ असे म्हणताच त्यांनी उरलेली चार खेळी फस्त केली आणि भरलेले पोट तट्ट केले.
पहाटे पाच वाजता अहमदाबाद स्टेशनवर चहा, केक आणि डोनट घेतला. मात्र त्यांना वास येत होता. (शिळे होते). म्हणून टाकून दिले. सुरेंद्रनगरला छोटया गाडीत बसलो. न्याहारीसाठी काही मिळते का, हे पाहत असताना ‘बोलो, नास्ता, चाय’ असे ओरडत जाणाऱ्या माणसास बोलावून शाकाहारी कटलेट, ब्रेड बटर आणि चहाची ऑर्डर दिली. काय घेणार, असे देसाईंना विचारताच त्यांनी ‘डबल आम्लेट, ब्रेड आणि चहा सांगितला. ते आल्यावर भूक लागल्यामुळे मी नाश्ता झटपट संपवला, तसेच देसाईंनीही. नंतर ते टॉयलेटमध्ये गेले असताना वेटर ‘नाश्त्याचे पैसे लवकर द्या. आता गाडी सुटेल’ असे म्हटल्यावर मी ७-८ रुपयांचे बिल देऊन टाकले. देसाई बाहेर आल्यावर मला म्हणाले, ‘‘अरे, तु कशाला पैसे दिलेच. मी देणारच होतो. आता राजकोटला दिल्यावर हिशोब करू.’’
खरी फसवणूक नंतरच झाली. १० वाजता तोच वेटर जेवणाची ऑर्डर घेण्यास आला तेव्हा त्याला, ‘‘नाश्त्याचे पैसे घाईने का घेतलेस’ असे विचारताच ‘साहेब, जेवणाची ऑर्डर घेण्यास येईपर्यंत प्रवासी मध्येच उतरून जातात. म्हणून तसे करावे लागते,’’असे वेटरने सांगताच मला हसू आले.
पुणेरी मामा : पुणे तिथे काय उणे. पुण्यातच नव्हे तर इतर शहरांतही मिळणारी ‘पुणेरी मिसळ’, ‘पुणेरी भामटा’, ‘पुणेरी जोडा’ या सर्व गोष्टी ख्यातनाम आहेत. पण ‘पुणेरी मामा’ हा शब्दप्रयोग आम्हाला लागू पडला. त्याचा हा किस्सा. १९७४ च्या एप्रिलमध्ये बोर्डाचे माजी उपसचिव मामा करमरकर यांचा गौरवनिधी सामना पुण्यात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी माझी आणि रुबेन यांची पंच म्हणून नेमणूक केली गेली होती. सकाळी १० वाजता सुरू होणा-या सामन्यासाठी आम्ही नऊ वाजता नेहरू स्टेडियमवर पोहोचलो. तेव्हा ‘नाश्ता करून घ्या’ असे सांगितल्यावर बाजूच्या शामियान्यात प्रवेश केला तर फक्त चहा आणि बिस्किटे शिल्लक होती.
आमंत्रित अपेक्षेपेक्षा जास्त संख्येने आल्यामुळे पोहे आणि उपमा संपून गेला होता. दोन स्वयंसेवकांनी दिलगिरी व्यक्त केली. दुपारच्या जेवणात भूकशामक पुणेरी बेत आहे. सूप, पुरी, भाजी, जिलेबी, मठ्ठा, मसालेभात आणि पापड आहे, असे सांगताच तोंडाला पाणी सुटले. एक वाजता जेवणाची सुट्टी झाल्यावर आत येऊन हात, तोंड धुवून त्या मंडपात गेलो तर पदार्थाच्या टेबलाजवळ मोठी झुंबड उडाली होती. जवळ शिरकावही करणे शक्य नव्हते. म्हणून फिरत असताना तेवढयात दोन पदाधिकारी जवळ येऊन आम्हास म्हणाले, ‘अहो, तुम्ही नुसते सूप घेता, अशी तुमची ख्याती आहे. तेव्हा सूप मागवतो, म्हणून एकाला सूप आणावयास सांगितले. असे सामने गंभीरपणे न खेळता खेळीमेळीने खेळावयाचे असतात, हे मागे लिहिले आहे. त्याप्रमाणे आम्हीही पंचगिरीत गंभीर नव्हतो. तेव्हा आज जेवणार आहोत, असे सांगताच पदाधिकारी चकीत झाले. तेथील स्थानिक पंचाने दोन पु-या, भाजी, दोन जिलेब्या आणि थोडा मसालेभात असलेल्या दोन बशा आम्हांस दिल्या. मठ्ठा संपल्यामुळे (उन्हाळा होता) कोका कोलाची बाटली आम्हांस दिली. आमचा जेवणावर ताव मारण्याचा मनसुबा फोल ठरला. मात्र चहापानाला दोन बशा सँडविच, चहा आणि बिस्किटे आणून दुपारची कसर भरून काढली.
रात्री पूना क्लबवर समारंभ आणि जेवण झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या गाडीतून निघून गेला. आम्ही लाल रंगाच्या सरकारी एसटीने मुंबईस आलो. समाधान एवढेच की, वाडेकर, सोलकर, पारकर, साळगावकर, कानिटकर, पतौडी, जयसिंहा, अबिद अली आणि इतर रणजीपटूंचा सहभाग असलेल्या मामा कानिटकरांच्या गौरव सामन्यात आमचाही सहभाग झाला. मात्र मामांच्या पुण्यातील सामन्यात आमचाही ‘मामा’ झाला, हेही खरेच.