हैदराबादमध्ये पूर्वी येथे सामने व्हायचे त्या मैदानाचे ‘फतेह मैदान’ असे नाव आहे आणि स्टेडियमला ‘लालबहादूर शास्त्रीं’चे नाव आहे.
मागील भागात हैदराबादचा उल्लेख आला. त्यावरून तेथील आठवणी जागृत झाल्या. हैदराबादला ‘नामपल्ली’ असे म्हणत. तिकिटावरसुद्धा पूर्वी हे सुद्धा नाव असे. त्यामुळे तेथे जाणारे पुष्कळ जण बुचकळय़ात पडत. पूर्वी कोलकात्याला जायच्या तिकिटावर ‘हावडा’ असे छापलेले असे. त्यामुळेही प्रवाशाला आपली फसगत तर नाही झाली ना, असे वाटे. तसे हैदराबाद शहर जुन्या इमारती असलेले, म्हणून की काय आपल्या नवी मुंबईप्रमाणे सिकंदराबाद हे नवे शहर वसवले. यांना ‘जुळी शहरे’ असे संबोधतात. या दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता फार सुरेख आहे. एका बाजूने मोठा तलाव आहे. ज्याचे नाव ‘हुसेनसागर’ आहे. पलीकडून या दोघांना जोडणारी आगगाडी आहे. दोन्हीकडून जाताना सुरेख दृष्य दिसते. या रस्त्याच्या मध्यावर तलावाला लागून एक मोठा चौथरा बांधला आहे. त्यात १९७१ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात जप्त केलेला ‘पॅटन’ रणगाडा ठेवला आहे.
अर्थात हैदराबाद हे प्रसिद्ध आहे ते चारमिनार व त्याच्या बाजूला असलेली प्रख्यात बांगड्यांची दुकाने व उंच टेकडीवर संगमरवरी टाइल्सनी बांधलेल्या बिर्ला मंदिरसाठी. एवढे वर्णन केल्यावर मूळ मुद्दय़ाकडे येतो. पूर्वी येथे सामने व्हायचे त्या मैदानाचे ‘फतेह मैदान’ असे नाव आहे आणि स्टेडियमला ‘लालबहादूर शास्त्रीं’चे नाव आहे. मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमनंतर जसे वानखेडे स्टेडियम बांधले. तसेच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने सिकंदराबाद शहरात नवे स्टेडियम उभारले. सर्व सामने आता तिथेच होतात. लाल बहादूर स्टेडियमवर एक विचित्र प्रकार होत असे. रात्री आच्छादित केलेली कव्हर्स सकाळी काढली की, त्यात तपकीरी रंगाचे लहान किडे वळवळताना दिसायचे. नवा पंच गोंधळायचा. पण मला माझे गुरू जुडा रुबेन यांनी याची कल्पना दिली होती. त्यामुळे गोंधळ झाला नाही. हे किडे केरसुणी किंवा पिसे असलेल्या काठीने अलगद जमा केल्यावर दोन ते तीन मुठीभर होत. त्यावेळी मला एक जुनी कविता आठवत असे. ‘कोठुनी आले येथे, काल संध्याकाळी नव्हते, हे किडे इथे पसरती, खेळपट्टीस भोके नसती.’ पण हे कोडे कधीच उलगडले नाही.
सर्वसाधारणपणे स्कोअर आणि धावफलक पॅव्हेलियनच्या बाजूला असतात. पण लालबहादूर स्टेडियम तसेच कोलकाता आणि बंगळूरु, कानपूर या ठिकाणी तो विरुद्ध बाजूला असे. (हल्ली माहित नाही). तसेच हैदराबाद आणि कोलकाता या ठिकाणी लढाई किंवा युद्धात ‘बंकर’ असतात, तसा स्कोअर बॉक्स असे. तोफांची तोंडे काढण्यापुरते जसे गोल किंवा चौकोन असतात, तसे या बॉक्सला असत. इशारा करताच त्यातून हळूच झेंडा बाहेर येई व इशाऱ्याची पोच मिळे. कानपूरला तर समालोचक, पत्रकार, स्कोअरर यांना पलीकडे (दुस-या बाजूस) जावे लागे. त्यानंतर ‘खेळपट्टीजवळ जाऊ नका व पाहणीही करू नका’ असा इशारा द्यावा लागे. स्कोअररने पंचांच्या इशा-याची पोच मिळाल्याशिवाय खेळ पुढे चालू करू नये, असा अलिखित नियम आहे.
असे सांगतात की, इंग्लंडमध्ये पूर्वी क्रिकेटपटू, स्कोअरर तंबूत बसत. एका सामन्यात मध्यंतरावेळी पंच स्कोअररकडे येऊन ‘माझ्या इशा-याची पोच का देत नाहीस?’ असे विचारू लागले. तेव्हा त्याने ‘तुम्ही पलीकडे तुमची पत्नी बसली आहे. तिकडेच सारखे इशारे करत आहात’ असे सांगताच ते ‘सॉरी’ म्हणाले. पण या उपर ‘तरीच तेथून गुलाबी रुमालाने पोच मिळत होती,’ असे विनोदाने म्हणाले. तेव्हा सर्वच हसू लागले.