कणकवली पंचायत समितीचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम थाटात
कणकवली – पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेचे विकेंद्रीकरण न होता केंद्रीकरण होत असेल तर अशी घटना फार गंभीर आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकार काढून घेतले जात असतील आणि पंचायत समितीसारख्या स्वायत्त संस्थांवर पोस्टमनची भूमिका बजावण्याची वेळ येत असेल तर लोकप्रतिनिधींनी जागृत राहून अभ्यासपूर्ण विचारातून आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. ग्रामपंचायत सक्षम करताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या संस्थांचे अधिकार घटवले जाऊ नयेत. तसे होणे म्हणजे लोकशाहीच्या ढाच्यालाच आव्हान देण्यासारखे आहे. पंचायत समित्या सक्षम करण्यासाठी आमदार म्हणून मी सर्वतोपरी ताकद पणाला लावून प्रयत्न करेन आणि पंचायत समितीचे महत्त्व कमी होऊ देणार नाही, असे अभिवचन कणकवली – देवगड -वैभववाडीचे आ. नितेश राणे यांनी दिले. ते कणकवली पंचायत समितीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.
कणकवली पंचायत समितीचा रविवारी रौप्यमहोत्सवी कार्यक्रम थाटात झाला. यावेळी आ. नितेश राणे, जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, सभापती भाग्यलक्ष्मी साटम, महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, माजी जि. प. अध्यक्ष आर. बी. दळवी, संदेश ऊर्फ गोटय़ा सावंत, सुदन बांदिवडेकर, जि. प. सदस्या श्रीया सावंत, संजना सावंत, संजय देसाई, दीपलक्ष्मी डिचवलकर, प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे, तहसीलदार संजय पावसकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, विजय चव्हाण, राजेंद्र पराडकर, कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, आदींसह जि. प. व पं. स. सदस्य उपस्थित होते.
आर. बी. दळवी, तुळशीदास रावराणे, सदानंद हळदिवे, कांताप्पा शेटय़े, का. वा. राणे यांचा तसेच खा. नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कोळोशी ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. २५ वर्षात होऊन गेलेले सभापती, उपसभापती, पं. स, अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार ग्रामविस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी मानले. आ. नितेश राणे म्हणाले, २५ वर्षे पंचायत समितीने यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. यात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने सातत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिले. निवडून आलेल्या सदस्यांने पाच वर्षात दर्जेदार काम करून स्वत:च्या नेतृत्वाने टाकलेला विश्वास सिद्ध केला. राणेसाहेबांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा पर्यायही जनतेने स्वीकारलेला नाही, यातूनच २५ वर्षात पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाची प्रचिती येते. शेतक-यांना प्राधान्य देणारी पंचायत समिती म्हणून कणकवलीचे नाव राज्यभरात घेतले जाते. शेतक-यांसाठी गावठी भाजी आणि उत्पादनांचा आठवडा बाजार ही संकल्पना राबविणारी राज्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे. हे आदर्शवत काम पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या कौतुकाचे शब्द राज्यभरातून ऐकायला मिळतात तेव्हा आपल्या सहका-यांनी केलेल्या कामाचे समाधान वाटते. पंचायत समितीचे अधिकार आणि विकास निधी कमी झाला म्हणून रडत बसण्यापेक्षा नवे पर्याय शोधा. महसूल कसा वाढविता येईल, याचा विचार करा. आम्ही लोकप्रतिनिधी रडणारे नाही तर लढणार आहोत, हे दाखवून द्या. गेली २५ वर्षे या पंचायत समितीने जसे चांगले काम केले तसेच येत्या २५ वर्षातही आव्हानांचा सामना करत जनतेला दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प करा.
पंचायत समितीसमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, ती पेलण्याची ताकद आपल्यात आहे हे जनतेलाही दाखवून द्या. कारण निवडून येताना जनतेला आपण विकासाचा शब्द दिलेला असतो. त्यामुळे आता कारणे सांगता येणार नाहीत. पंचायत समितीचा महसूल वाढवून त्या माध्यमातून विकास करण्यासाठी प्रयत्न करू या. विधिमंडळात पंचायत समितीला अधिकार मिळावेत म्हणून माझे प्रयत्न राहतील. राज्य प्रगतशील ठेवण्यासाठी पंचायत समिती हक्काचे सत्तास्थान आहे. त्यामुळे अधिकार केंद्रित होत असतील तर लोकप्रतिनिधींनी सावध झाले पाहिजे. जागृत होऊन आपला विरोध दर्शविला पाहिजे. सरकारवर दबाव आणला पाहिजे. केंद्र सरकापर्यंत या विषयाचे गांभीर्य पोहोचले पाहिजे, असेही आ. नितेश राणे म्हणाले.
कणकवली पं. स. प्रथम क्रमांकाची ठरेल असे काम करा : खा. नारायण राणे
महाराष्ट्र राज्यात द्रष्टे नेते, भूतपूर्व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातून निघणा-या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि गाव व तालुका पातळीवर त्या चांगल्या प्रकारे राबविल्या जाव्यात, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था शासनप्रणाली निर्माण केली. गेली २५ वर्षे सिंधुदुर्ग?जिल्ह्याचे मी नेतृत्व करत आहे. त्यामुळे कणकवली पंचायत समितीचा कारभार जवळून पहात आहे. गेली २५ वर्षे कणकवली पं. स. अतिशय चांगल्या रितीने नागरिकांची कामे करत आहे. विकासकामांचे केंद्र म्हणून पं. स. चे काम सुरू आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी कणकवली पंचायत समितीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. कणकवली पं. स. चे सभापती, उपसभापती, अधिकारी आणि सदस्य पं. स. च्या माध्यमातून विधायक विकासाची कामे करत आहेत. पं. स. चे काम विधायक आणि सामाजिक बांधिलकी मानून उत्तम प्रकारे केले जात आहे. येथील अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिका-यांचे त्यासाठी अभिनंदन. भविष्यात चांगल्या कामाचे सातत्य ठेवा आणि राज्यात एक नंबरची पंचायत समिती ठरेल असे कार्य करा, असा आशावादही खा. राणे यांनी व्यक्त केला.