राजन तिरवडेकर मुंबईच्या परळ येथील दामोदर नाटय़गृहात गेली सतरा वर्ष दशावतारी नाटकांचा महोत्सव भरवत आहेत. याच नाटय़गृहात डोअरकीपरची नोकरी करता करता ते हा महोत्सव भरवतात आणि तोही कुठल्याही आर्थिक पाठबळाशिवाय ते केवळ एकटय़ाच्या बळावर. वेळप्रसंगी आपल्या खिशाला चाट देऊन, नुकसान सहन करून स्वत: पडद्याआड राहत ते भरवत असलेल्या या महोत्सवाचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे आपल्या मातीतली पारंपरिक कला जोपासली जावी.
मुंबईच्या परळ येथील दामोदर नाटय़गृहात दिवाळीच्या सुमारास जरा वेगळंच वातावरण दिसतं. या दिवसांत इथे कोकणातली पारंपरिक कला असलेल्या दशावतारी नाटकांचा महोत्सव भरतो. कोकणातून आलेल्या कंपन्या आपल्या खास पद्धतीने ही लोककला सादर करतात. हा नेम गेली सतरा र्वष अखंड चालू आहे. इतकी वर्ष हा महोत्सव भरतोय याला कारणीभूत आहेत राजन तिरवडेकर. कुणी एक तिरवडेकर हा महोत्सव भरवतात, त्यात काय विशेष, असा प्रश्न कुणाच्या मनात उमटणार असेल तर त्याचं उत्तर असं आहे की, तिरवडेकर हे याच दामोदर नाटय़गृहात डोअरकीपर म्हणून काम करतात. कुठलाही प्रायोजक किंवा संस्थेच्या पाठबळाशिवाय ते हा महोत्सव भरवत आहेत. तो भरवण्यामागे आपल्या मातीतली कला जगली, जोपासली पाहिजे हाच एवढाच त्यांचा हेतू आहे.
आपल्याकडे थोडंसं काम करून त्याचा मोठा गाजावाजा करण्याची वृत्ती जास्त दिसून येते. किंबहुना अनेकदा प्रसिद्धीसाठीच सगळा खटाटोप चाललेला असतो. त्यामुळे प्रकाशझोत कायम आपल्यावर राहील, या पद्धतीनेच काम चाललेलं असतं. म्हणूनच स्वत:ला पडद्यामागे ठेवून कोकणातली पारंपरिक कला आणि कलाकारांना प्रकाशात आणणा-या तिरवडेकर याचं वेगळेपण ठळकपणे जाणवतं.तिरवडेकर यांचा गेटकीपर ते महोत्सवाचे आयोजक हा प्रवास कसा झाला, हा फारसा वळणावळणाचा नसला तरी त्यात एक नाटय़मय वळण आहेच. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तोंडवळी हे तिरवडेकर यांचं गाव. ‘माझं सातवीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं. त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो. आठवीपासूनचं पुढचं शिक्षण डोंगरीच्या जनता हायस्कूलमध्ये झालं. तेव्हा मी माझ्या मामाकडे माझगावला आडवी चाळ येथे राहायचो. मी मुंबईत शिकायला आलो होतो, पण शिक्षणाचा गाडा काही दहावीच्या पुढे गेला नाही. दहावीत नापास झाल्यावर मी शिक्षण सोडून दिलं, पण त्यामुळे पुढे काय करायचं, असा प्रश्न पडला. शिक्षण नसल्याने चांगली नोकरी मिळण्यासारखी नव्हती. काही वर्ष काम शोधण्यात गेली. दामोदर हॉलशी संलग्न असलेल्या सहकारी मनोरंजन मंडळात गेटकीपर म्हणून मुलं हवी होती. कुणीतरी म्हणालं की, तुला काम मिळेल आणि नाटकंपण बघायला मिळतील. म्हणून तिथे गेटकीपर म्हणून कामाला लागलो. ते साल होतं १९८८. तिथे एकदा गेटकीपर म्हणून चिकटलो तो कायमचाच. तेव्हा मी अठरा-वीस वर्षाचा होतो,’ तिरवडेकर त्या प्रवासातला पहिला टप्पा सांगतात.
कोकणी माणूस म्हटल्यावर त्याच्यावर दशावतारी कलेचे संस्कार आपसूकच झालेले असतात. तसे ते तिरवडेकर यांच्यावरही झाले होते. त्यांच्या गावात लहानपणी त्यांनी दशावतारी नाटकं बघितली होती. त्यांचे काका आणि भाऊ हौशी नाटकात काम करत. तिरवडेकरांनीही सातवीत असताना ‘डाकू मानसिंग’ या नाटकात काम केलं होतं. त्यानंतर बॅकस्टेजला छोटी-मोठी कामंही केली. त्यामुळे त्यांना नाटय़कलेचा ब-यापैकी जवळून परिचय होता, पण आपण पुढे कधी महोत्सव भरवू, असं त्यांनाही कधी वाटलं नव्हतं. हे त्यांच्या जीवनात अनपेक्षितपणे घडलं. तिरवडेकर त्याविषयी सांगतात, ‘डी. एल. कोळंबे नावाचा माझा एक मित्र होता, तो शक्ती-तुरा वगैरेचे कार्यक्रम दामोदरला करायचा. तेव्हा काही महोत्सव वगैरे नसायचा. फक्त काही खेळ लावले जायचे. त्याने मला सांगितलं की, तू पण असे कार्यक्रम कर. माझ्याबरोबर पार्टनरशिप कर. तुला आम्ही मदत करू. त्याच्या सांगण्यामुळे मी यात आलो. नमन-खेळ वगैरेचे कार्यक्रम दामोदरमध्ये भरवू लागलो, पण ते केवळ दोन-चार खेळ असायचे. महोत्सव वगैरे नव्हता. महोत्सव भरवायला एक कारण घडलं. १९९३पासून दामोदरला मालवणी जत्रोत्सव भरत होता. तो तीन र्वष चालला. या जत्रोत्सवात दशावतारी नाटकं सादर व्हायची. ती बघायला खूप गर्दी व्हायची. तिकिटांसाठी अक्षरश: मोठी रांग लागायची. १९९५ पासून हा जत्रोत्सव बंद पडला, तेव्हा माझ्या मनात विचार आला की, जत्रोत्सव नाही, पण आपण दशावतारी नाटकांचा महोत्सव भरवला तर? मग मी दशावतारी नाटकवाल्यांना बोलवायला सुरुवात केली. तेव्हा मी शक्ती-तुरा-नमनाचे कार्यक्रम करतच होतो. ही रत्नागिरीतली कला, तेव्हा आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यतील कला सादर करू या, असं माझ्या मनात आलं. त्यानंतर मी दरवर्षी दशावतारी नाटकं बोलावू लागलो आणि आजतागायत त्यात खंड पडलेला नाही.’
अर्थात कुठलाही महोत्सव भरवणं ही साधी गोष्ट नसते. त्याला आर्थिक पाठबळ लागतं. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर कुणी असे महोत्सव भरवत नाहीत. एखादी संस्था नाही, तर कंपनीच महोत्सव भरवू शकते. तिरवडेकर यांच्यामागे कुठलीही संस्था किंवा प्रायोजक नव्हते. तरीही आपल्या गावच्या कलेसाठी काहीतरी करायला हवं, या भावनेतून त्यांनी एकहाती हे शिवधनुष्य पेलायला घेतलं. ते म्हणतात, ‘सुरुवातीला आर्थिक गणित जमवताना खूप हाल झाले. दशावतारी नाटक कंपन्यांना इथे बोलवायचं तर त्यांना बिदागी देणं भागच होतं. याशिवाय हॉलचं भाडं, तिकीटछपाई असा बराच खर्च होता. हे पैसे मला माझ्या खिशातूनच काढायला लागायचे. गेटकीपर म्हणून त्या वेळी मला महिन्याला हजार रुपयेही मिळायचे नाहीत.’ त्या वेळी काही लोकांनी केलेली मदत तिरवडेकर यांच्या खूप महत्त्वाची ठरली. ‘दामोदर’चे व्यवस्थापक पाटील, मयूर कदम, सतीश धैर्यवान या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. उदाहरणार्थ, ‘दामोदर’चे व्यवस्थापक पाटील यांनी तारखा वगैरे देण्यात सहकार्य केलं. तिरवडेकर यांची तळमळ त्यांना दिसायची. आपल्यातलाच एक सर्वसामान्य माणूस गावच्या कलेसाठी एवढं करतोय, तर आपण त्याला मदत करावी, ही त्यांची भावना असायची.
पहिल्या वर्षी तिरवडेकरांनी चार कंपन्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांचे दहा-बारा शो झाले. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हा पन्नास, पंचवीस रुपये असे तिकिटांचे दर होते. प्रत्येक नाटकाला पंचवीसेक हजार रुपये गल्ला जमला. त्यातून नाटक कंपन्यांची बिदागी, थिएटर भाडं, इतर खर्च जाता त्यांना थोडेफार पैसे मिळाले. दशावतारी नाटक करणा-या आठ कंपन्या सिंधुदुर्ग येथील आहेत. त्यांच्यापैकी महोत्सवाच्या तारखांना ज्या उपलब्ध असतात, त्यांना तिरवडेकर बोलावतात. गेल्या एकोणीस वर्षात तसे मोचेमाडकर, वालावलकर, कलेश्वर, आजगावकर अशा सगळ्याच कंपन्यांनी महोत्सवात नाटकं सादर केलेली आहेत. तिरवडेकर यांच्यावर या नाटक कंपन्यांच्या मालकांचा इतका विश्वास आहे की, ते एका फोनवर महोत्सवासाठी मुंबईत येतात. अॅडव्हान्स वगैरेंचीही मागणी करत नाहीत. तसंच त्यांना कितीही बिदागी दिली तरी विचारत नाहीत. अनेक जण तर दिलेलं पाकीट उघडूनही बघत नाहीत.
तिरवडेकर सांगतात, ‘या नाटक कंपन्यांना मला फार पैसे देता येत नाहीत. इतकी र्वष मी त्यांना चार-पाच हजार रुपयेच देत होतो. यंदाच मी त्यांना अकरा हजार रुपयांचं पाकीट दिलं. या नाटक कपंन्यांचा मुंबईत येण्या-जाण्याचा, राहण्याचा बराच खर्च येतो, पण अमुक पैसे दिले म्हणून कंपनीचे मालक कधी माझ्याकडे तक्रार करत नाहीत. कारण मी हे सगळं एकटय़ाच्या जीवावर करतोय, याची त्यांनाही कल्पना आहे.’ साधारणपणे दिवाळीच्या सुमारास तिरवडेकर हा महोत्सव भरवतात. कारण त्या वेळी नाटक कंपन्यांकडे वेळ असतो. नंतर एकदा जत्रांचा मोसम सुरू झाला की, त्यांना सवड नसते. असं असलं तरी तिरवडेकरांनी एकदा होळीच्या काळातही महोत्सव भरवला होता. किती कंपन्या नाटकं सादर करणार आहेत, यावर महोत्सव किती दिवस चालणार आहे, हे अवलंबून असतं. कधी तो चार दिवसांचा असतो, कधी आठ, तर कधी दहा. दरवर्षी महोत्सवात नवी नाटकं दाखवली जातात. त्यांची निवड तिरवडेकर स्वत:च करतात. कधी कंपनीला अमुक नाटक हवं, असं सांगतात.
हा महोत्सव भरवताना तिरवडेकरांना अनेक बरे-वाईट अनुभव आले. सुरुवातीला त्यांना अनेक जणांकडून असं ऐकायला मिळायचं की, कशाला नको ते धंदे करतोस? एक तर तुझी गेटकीपरची नोकरी, त्यात महोत्सव वगैरे करून कमाई त्यात कशाला घालवतोस? तिरवडेकरांनी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. त्यांचं महोत्सव भरवणं लोकांच्या दृष्टीने अव्यवहार्य असलं तरी तिरवडेकर फायद्या-तोटय़ाचा कधीच विचार करत नाहीत. ‘आजही डोअरकीपर म्हणून माझी महिन्याला साडेतीन-चार हजारांची कमाई होते. म्हणून मी इतर लहानसहान काम करत असतो. त्यातून थोडेफार पैसे सुटतात. महोत्सवातून कधी दोन-चार हजार सुटतात, तर कधी खिशातलेच घालायला लागतात. तरीही मी निव्वळ कलेसाठी हे करतो. ही कला पाहायला येणारे खूप आहेत, पण आता अनेक ठिकाणी मालवणी जत्रा भरू लागल्यात. तिथे दशावतारी नाटकंही दाखवली जातात, तीही खुल्या मैदानात. त्यामुळे पूर्वीसारखे लोक ही नाटकं बघायला परळला येत नाहीत. त्याचा फटका बसतो. गेल्या वर्षी मात्र महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि मला चार-पाच हजार रुपये फायदाही झाला.’ असं ते सांगतात तेव्हा त्यात हिशेबीपणा अजिबात नसतो.
२००९ साली तिरवडेकरांनी परळऐवजी भांडुपला महोत्सव भरवला होता, पण त्यात त्यांना जबर नुकसान सहन करावं लागलं. ‘परळ सोडून मी दुसरीकडे कुठेच महोत्सव घेतला नव्हता. पण भांडुपला कोकणातील लोकांची बरीच लोकसंख्या असल्याने तिथे महोत्सव करून बघूया, विचाराने मी त्या वर्षी तो तिथे भरवला. तो खुल्या मैदानात होता, पण मला वेळेचं गणित कळलं नाही. तो खुल्या मैदानात असल्याने नाटकं लवकर म्हणजे साडेसात वाजता सुरू करून दहा-साडेदहा वाजेपर्यंत बंद करावी लागायची. भांडुपला राहणारा माणूस एवढय़ा लवकर कामावरून परत येतच नाही. त्यामुळे नाटकांना गर्दी जमली नाही आणि माझं तीस-पस्तीस हजारांचं नुकसान झालं. त्याचं मला खूप वाईट वाटलं. त्यानंतर मी पुन्हा परळलाच महोत्सव भरवला.’ तिरवडेकर आपल्या कटू अनुभवाबद्दल सांगत होते.
मच्छिंद्र कांबळी, राजा मयेकर, अनिल गवस, अप्पा घाडी यांच्यासारख्यांनी त्यांना प्रोत्साहनही दिलं, पण तिरवडेकर यांच्या घरच्यांचा त्यांच्या या उपक्रमाला किती पाठिंबा असतो? विशेष गोष्ट अशी की, त्यांच्या पत्नी दशावतारी महोत्सव बघायला एकदाही आलेल्या नाहीत. ‘तिचा या सगळ्याला पाठिंबा नसला तरी विरोधही नाही. कारण तिला ठाऊक आहे की, मी एकदा करायचं असं ठरवलं की, मी ते करणारच. चांगली नोकरी धरा, असं मात्र ती मला सतत सांगत असते. माझ्या आठ वर्षाच्या मुलीला मात्र नाटकं बघायला आवडतात. ती मला सारखं सांगत असते की, बाबा मला नाटकं बघायला घेऊन चला.’ असं तिरवडेकर सांगतात. गेली सतरा वर्ष तिरवडेकर एकटय़ाने हा महोत्सव भरवत आहेत. यासाठी करावी लागणारी खर्चाची हातमिळवणी पाहून ते दर दिवाळीला ते ठरवतात की, यंदा हा शेवटचा महोत्सव, पण दरवर्षी दिवाळी आली की, त्यांची ऊर्मी उफाळून येते आणि मग नाटक कंपन्यांना फोन सुरू होतात. त्यांची ही ऊर्मी म्हणजे लोकरंगभूमीची निव्र्याज सेवा आहे.