रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासात महत्त्वाचा वाटा असणा-या ८५ टक्के छोटय़ा व्यवसायांची सुरुवात ही मालकाच्या वैयक्तिक बचतीतून होते. त्यांची निर्णय घेण्याची आणि संबंधित व्यवसाय चालवण्याची पद्धतीवरही याचा प्रभाव दिसून येत असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
गुवाहाटी- रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासात महत्त्वाचा वाटा असणा-या ८५ टक्के छोटय़ा व्यवसायांची सुरुवात ही मालकाच्या वैयक्तिक बचतीतून होते. त्यांची निर्णय घेण्याची आणि संबंधित व्यवसाय चालवण्याची पद्धतीवरही याचा प्रभाव दिसून येत असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
वित्तव्यवस्थापनाविषयी उपाययोजना पुरवणा-या इनटय़ुट इंडियासाठी संशोधन संस्था इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनने हा अहवाल तयार केला आहे. जवळपास सर्वच छोटे व्यावसायिक सुरुवातीपासून केलेल्या योग्य आर्थिक नियोजनामुळे अधिक यशस्वी होता येते असे मानत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
या सर्वक्षणातून मते जाणून घेण्यात आलेल्या ८५ टक्के छोटय़ा उद्योजकांनी वैयक्तिक बचतीच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केल्याचे म्हटले आहे. अनेक क्लृप्त्याही यासाठी वापरल्या जातात. एकूणच या सर्वाचा त्यांच्या निर्णयप्रक्रियेवर तसेच व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर प्रभाव दिसून येत असल्याचे ‘फायनान्शिअल मॅनेजमेंट – अॅन एशेन्शिअल टूल फॉर अ हेल्दी बिझनेस’ या अहवालात म्हटले आहे. याबरोबरच ९४ टक्के उद्योजकांना वित्तीय कौशल्यात सुधारणा होण्यात वाव असल्याचे वाटते आणि ८५ टक्के व्यावसायिक वित्त नियोजनात तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचा निष्कर्षही यात नोंदवण्यात आलेला आहे. देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने छोटय़ा व्यावसायांची महत्त्वपूर्ण भूमिका असून रोजगारनिर्मितीत मोलाचा वाटा आहे. मात्र वित्त व्यवस्थापन आणि व्यावसायिक प्रक्रिया यामधील एकजिनसीपणाचा अभाव हे या व्यवसायांपुढील मुख्य आव्हान असल्याचे इनटय़ुट इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निखिल अरोरा यांनी म्हटले आहे.
५४ टक्के व्यावसायिकांना वाटते की, आर्थिक व्यवस्थापनातील गुंतवणुकीअभावी पहिलले वर्ष खूप आव्हानात्मक ठरते. तर ७५ टक्के छोटय़ा व्यावसायिकांनाआर्थिक व्यवस्थापनाबाबत अधिक अभ्यासाची गरज असल्याचे वाटते. याबरोबरच कार्यक्षम आर्थिक नियोजनावर व्यवसाय टिकू शकते हे समजण्यास ३३ टक्के व्यावसायिकांना तीन वर्षाचा कालावधी लागत असल्याचे यात नमूद करण्यात आलेले आहे.