लाखो भाविकांचा आवडता गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. राज्यासह देशा-परदेशात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. गणपतीच्या दहा दिवसांच्या काळात भाविकांच्या उत्साहाला मोठे उधाण आलेले असते. हजारो भाविक भक्तिभावाने गणपती घरी आणतात. मात्र, या मोठय़ा उत्सवात पर्यावरणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे भाविकांनी उत्सवाचा आनंद लुटतानाही पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीपेक्षा शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. तसेच बाप्पांची आरास, विसर्जन करताना पर्यावरण जपल्यास या उत्सवाचा आनंद द्विगुणित होऊ शकेल.
गणपती हे सर्व भाविकांचे आराध्य दैवत. कोणत्याही पूजेचा प्रारंभ हा गणपती पूजनाने केला जातो. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढय़ात नागरिकांना एकत्रित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना मांडली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आता घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जातो. परदेशात स्थायिक झालेली भारतीय मंडळी बाप्पाचा सण मोठय़ा उत्साहात साजरा करतात. गणेशोत्सव दीड, पाच, सात, दहा, अकरा आणि एकवीस दिवस साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवात तर खूपच मोठी उलाढाल होते. मंडप, विविध चित्रांचे देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षा व्यवस्था, भाविकांची दर्शनासाठी गर्दी यामुळे अकरा दिवस मोठय़ा उत्साहात जातात. या गणेशोत्सवात आता पर्यावरणाची काळजी घेणेही अत्यंत गरजेचे बनले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्याचा निश्चय मुंबई ग्राहक पंचायतीने केला आहे. नागरिकांनी या उपक्रमाला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षाही आहे.
आपणास पत्र लिहिण्यास थोडासा उशीर झाला आहे याबद्दल क्षमस्व. मग काय मंडळी, तुमची आता अगदी गडबड उडाली असेल ना? अहो कसली काय विचारता, आता आपले गणपतीबाप्पा यायला फक्त दोन महिनेच राहिले आहेत. गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर देणे, मखर, आरास, देखावे, कार्यक्रम ठरवणे, केवढी कामे करायची आहेत. रोज तुमच्या बैठका, चर्चा सुरू असतील. पण काही म्हणा हं! यात एक गंमत असते. खरं ना? या श्रमाचं खरंच काही वाटत नाही. काय म्हणता? देखावा कुठला करायचा, गणपतीची मूर्ती कशी आणायची हे ठरलेसुद्धा! बरोबर आहे या सर्वासाठी पुरेसा वेळ द्यायलाच हवा. मग काय यंदा गणेशमूर्ती शाडू मातीच्याच आणणार ना? आणि त्या मूर्तीची उंची फार मोठी वा अवाढव्य नसेल ना? हो, कारण गेली काही वर्ष प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अवाढव्य, मोठय़ा मूर्तीनी आणि त्यावर लावलेल्या विविध रासायनिक रंगांनी या विघ्नहर्त्यांचे रूप पार बदलून टाकलंय ते तुम्हाला माहीतच आहे. आपण या गजाननाला विघ्नहर्ता म्हणूनच आणायचे, त्याची षोडषोपचारे १० दिवस पूजा करायची. या विघ्नहर्त्यांचे विसर्जन झाल्यानंतर त्याच्या मूर्तीतील घटकांमुळे जलचरांना त्रास होतो हे आपणास पटते का? कित्येक टन पाण्यात न विरघळणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, विषारी रंग पाण्यातील जलचरांचे काळ ठरतात. पण म्हणतात ना? पाण्यातील माशांचे अश्रू दिसत नाहीत. त्यांची मृत कलेवरे आपण पाहतो. प्रत्यक्ष त्या मूर्तीचे काय हो? विसर्जनानंतर भग्नावस्थेत किना-याला लागलेल्या मूर्तीची विटंबना पाहवत नाही. मला खात्री आहे, आपण सा-यांनीच यंदा याचा विचार केला असणार आणि पर्यावरणप्रिय मूर्तीच आणायची ठरवली असणार.
तीच कथा गणपतीच्या आराशीची, देखाव्यासाठी आज-काल थर्माकोलचा मुक्त वापर करून मखरे बनवली जातात. हा पदार्थ विघटनशील नाही. हे आपणास ठाऊक आहे. मग कशाला हवा हा पर्यावरणाचा समतोल बिघडवणारा थर्माकोल. मला माहीत आहे आपणाकडे अनेक सृजनशील कलावंत आणि हात आहेत. आज कित्येक तरुणांना त्यांची कला वास्तवात उतरवायला संधी हवी आहे. द्याल का त्यांना तुम्ही मदतीचा हात. कमीत कमी खर्चात टाकाऊतून सौंदर्य निर्माण करणारे हात आसुसले असतील. मिळेल का त्यांना ही संधी? आता तुम्ही म्हणाल तुमचं काय जातयं हे सांगायला? आम्ही तर असे आकर्षक देखावे केले नाही तर कोण येणार आमचा गणपती पाहायला? कसे टिकणार आम्ही या स्पर्धेत?
आता मला सांगा या देखाव्यानेच का गणपती उत्सव आकर्षक ठरतो? खरं तर समाजप्रबोधनासाठी, जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पुढे त्याचे स्वरूप विस्तृत झाले, पण विकृत झाले नव्हते. वेगवेगळ्या वक्त्यांची व्याख्याने, अनेक उत्तमोत्तम गायकांच्या मैफली, सुंदर सुंदर नाटकांनी त्या गणेशोत्सवाचे दहा दिवस कसे सरायचे ते कळायचेही नाही. एक कलासक्त अभिरुची संपन्न समाजपरिवर्तन होत होते. पण आजचे चित्र खरेच मन विषण्ण करतं. दहा दिवस कर्कश्श आवाज, धांगडधिंगा, आरोग्यास घातक पदार्थाच्या जाहिरातींचे प्रायोजकत्व घेऊन साजरा केला जाणारा हा गणेशोत्सव आपल्याला अभिप्रेत आहे का? आजची उमलती पिढी सुसंस्कारित करण्यापेक्षा अभिरुचीहीनतेकडे नेणे म्हणजे विघ्नहर्त्यांचा अपमान वाटत नाही का?
या विषयावर खूप काही सांगावसं वाटतंय, संवाद साधावासा वाटतोय, पण पत्र फारच लांबतंय, पण एवढं मात्र खरं की आम्ही नुसतं बोलघेवडे नाहीत. अशा पर्यावरणप्रिय गणेशोत्सवासाठी वर मांडलेल्या विचारांची सुरुवात आम्ही या पूर्वीच केली आहे. मुंबई ग्राहक पंचायत दर वर्षी गणपतीपूर्वी पर्यावरणप्रिय गणपती पेठेचे आयोजन करते. यंदाही दि. १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत दादरच्या भवानी शंकर रोड येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या सभागृहात ही पेठ आयोजित करण्यात आली आहे. गौरी-गणपतीसाठी इको-फ्रेंडली मखरे, कागदी फुले, सजावटीचे साहित्य, गौरीसाठी दागिने, केळी सुपारीच्या सोपापासून बनविलेले द्रोण, डिश अशा अनेक वस्तूंनी सजलेली ही पेठ असेल. शिवाय मोदक पीठ, आणि उत्सवासाठी लागणारा उत्तम दर्जाचा सुकामेवा, वेलची व अन्य वस्तू रास्त किमतीत उपलब्ध असेल. मग देणार ना भेट आपण आपल्या या पेठेला? चला तर मग, आपण सारेच या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणप्रिय करण्याचा निश्चय करूया.