मकर संक्रांत म्हटल्यावर पतंगाची आठवण येणारच. जानेवारी महिना उजाडला की बाजारात पतंगाची दुकानं फुलून निघायची. अर्थात आजही मुंबईतल्या काही बाजारांत वेगवेगळ्या प्रकारचे पतंग, दोरे, मांजा, फिरकी पाहायला मिळतात. त्यामुळे छोटया छोटया वस्त्यांतील दुकानातही लहानग्यांची पतंगे घेण्यासाठी झुंबड पाहायला मिळायची. तेव्हा चाळी असायच्या किंवा दोन-तीन मजल्याच्या छोटया छोटया इमारतींच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवले जायचे.
चाळीतील लोक सर्रासपणे पत्र्यांवर चढून पतंग उडवण्याचा आनंद घ्यायचे. पण आता ही मजा कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते. अर्थात यामागे अनेक कारणे आहेत. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचं कारण म्हणजे या काळात चांगलीच थंडी पडलेली असते. शरीराला उष्णतेची आणि ‘व्हिटामिन डी’ची आवश्यकता असते.
उन्हात गेल्याने शरीराला ‘व्हिटामिन डी’ मिळतं हे शास्त्र सा-यांना माहीतच आहे, त्यामुळे या हिवाळ्याच्या दिवसात सकाळ प्रहरी उन्हात गेल्यास आरोग्याच्या दृष्टीने हिताचं ठरतं. त्यामुळे पूर्वी लोक पतंग उडवण्याच्या हेतूने पहाटे उन्हात जायचे. तेव्हापासून हिवाळ्यात पतंग उडवण्याचा प्रयास सुरू झाला.
वर सांगितल्याप्रमाणे आता पतंग उडवण्याची क्रेझ काहीशा प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे मुंबईत असणारी पतंगांची बाजारपेठही पूर्वीप्रमाणे भरत नाही. मुंबईतील डोंगरी, कुर्ला, वांद्रे, क्रॉफर्ड मार्केट अशा ठिकाणी पतंगांची होलसेल दुकानं पाहायला मिळायची.
मात्र आता ओसरत चाललेला उत्साह पाहता या दुकानातही हवी तेवढी गर्दी पाहायला मिळत नाही. हा उत्साह कमी होण्याचीही अनेक कारणं आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे लोप पावलेली चाळ संस्कृती. पूर्वी चाळीत लोक एकोप्याने राहायचे, त्यामुळे सर्व सण-कार्यक्रम एकत्र मिळून साजरे केले जायचे. या चाळीतील बच्चेकंपनी किंवा तरुण मंडळीही एकत्र येऊन कोणत्याही गच्चीवर जाऊन बिनधास्त पतंग उडवायची. मात्र आता टोलेजंग टॉवर उभे राहिल्याने पतंग उडवण्याची मजा काहीशी कमी झाली आहे.
शिवाय मधल्या काळात पतंग उडवताना झालेले अपघात लक्षात घेता अनेक पालक मंडळीही आपल्या मुलांना पतंग उडवण्यासाठी पाठवताना फार निरुत्साही झाले आहेत. झाडावर अडकलेली पतंग काढताना झालेला अपघात किंवा पतंग उडवताना शरीराला लागलेल्या मांज्यामुळे झालेली दुखापत यामुळे पतंग उडवण्याची भीतीच लोकांना वाटू लागली आहे.
मध्यंतरी एक व्हीडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओतील आशय पाहता कमी झालेली पतंगाची क्रेझ उत्तम असल्याचं वाटेल. या व्हीडिओचा आशय असा होता की, आपण पतंग उडवताना जो मांजा वापरतो तो आपल्यासाठी तर घातक असतोच; मात्र आपल्यापेक्षाही परिणामकारक मुक्या प्राणी-पक्षिमात्रांना आहे. कारण पक्ष्यांचा थोडाफार जरी संबंध या मांज्याशी आला तरी त्यांचा हाकनाक जीव जाण्याची शक्यता आहे.
काही पर्यावरणवादी, प्राणी-पक्षिप्रेमींनी पतंग न उडवण्याचाही संदेश दिला आहे. त्यामुळे असा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून पतंग उडवण्याचा ट्रेंड कमी झालेला पाहायला मिळतो.
सर्वानी एकत्र यावं, एकमेकांचे आचार-विचार परस्परांना द्यावे या हेतूनेच सणवार साजरे केले जातात. मात्र आपल्या सणवारामुळे कोणाला इजा पोहोचता कामा नये, ही काळजी आपण घेतली पाहिजे. प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना आपल्यामुळे त्यांची संख्या कमी करणे हितावह ठरणार नाही. त्यामुळे यंदा जर तुम्ही पतंग उडवायला जात असाल तर या गोष्टीची नक्की काळजी घ्या.