‘नकोशी’ म्हणून पोटच्या गोळ्याची गर्भातच हत्या करणा-या माणूसघाण्या समाजात स्त्रीभ्रूणहत्येविरोधात जनजागृतीचा वसा ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी घेतला आहे.
‘नकोशी’ म्हणून पोटच्या गोळ्याची गर्भातच हत्या करणा-या माणूसघाण्या समाजात स्त्रीभ्रूणहत्येविरोधात जनजागृतीचा वसा ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी घेतला आहे. मागील काही वर्षात पंढरीच्या वारीत हा नवा विचार रुजल्याने सुरुवातीला त्यांना विरोधही झाला. पण, न-डगमगता त्यांनी हा प्रवास सुरूच ठेवला आहे.
गरिबी व दारिद्रय़ाचे चटके सोसताना कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी शेण-गौ-या थापून बॅरिस्टर, घटनाकार डॉ. आंबेडकरांना जीवनाच्या प्रत्येक संघर्षात साथ करणारी माता रमाबाई, बाल शिवाजीला घडवणारी माता जिजाऊ असे अनेक इतिहासाचे दाखले प्रवचन व कीर्तनातून समाजापुढे ठेवण्याचे काम वाबळे महाराज व त्यांचे सहकारी करत आहेत. दरसाल विठ्ठलाच्या ओढीने वारीचा खडतर प्रवास सुरू होतो. ही बिकट वाट पार करताना प्रत्येक वारक-याने एकतरी झाड प्रत्येक वाटेवर लावून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी उचलावी, हे समाजमनाला पटवून देण्याचा वाबळे महाराज यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’, हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व राज्य सरकारच्या पर्यावरण विभाग यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र कला संस्कृती मंचने पर्यावरणाचा जागर सुरू केला आहे. ‘दरवर्षी सा-यांनी वारीला यायचं, झाडं आंब्याचं, निंबाचं लावायचं, असा आग्रह वाबळे महाराज व त्यांचे सहकारी धरत आहेत.
तर दुसरीकडे ग्यानबा-तुकोबा माऊलीचा जागर करत भगवान महाराज गडदे यांच्या दिंडीने मागील १९ वर्षापासून पंढरीचा प्रवास सुरू ठेवला आहे. वारीत सहभागी होण्यासाठी भिशी बंद करून विठ्ठलाच्या भक्तांना मोफत दर्शन घडवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. १२०० हून अधिक वारक-यांचा सहभाग असलेल्या त्यांच्या दिंडीत शिस्तीला खूपच महत्त्व आहे. जेवण-खाण्यापासून ते अगदी वारीच्या दिवसांत पक्क्या निवा-याची व्यवस्था करून भक्तांची उत्तम सोय लावण्याचे काम नि:स्वार्थी बुद्धीने ते आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक २४, काळा किल्ला धारावी, यांचा मागील ३६ वर्षापासून पंढरीच्या दिशेने अथक प्रवास सुरू आहे. भक्तिभावात जराही खंड पडू न देता, पांडुरंग ज्ञानू महाराज कराडकर यांचा वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. शांताराम कारंडे चालवत आहेत. १७ जून रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून प्रस्थान केलेली त्यांची दिंडी भजन, कीर्तनाच्या माध्यमातून गावोगाव माऊलींच्या विचारांचा जागर करत पंढरीच्या दिशेने सरकत आहे. अशा अनेक दिंडय़ांचा व भक्तांचा संतमहात्म्यांच्या विचारांची पेरणी करण्यासाठी अथक प्रवास सुरू आहे. कोणताही पक्ष-संघटना, जात-धर्म आड न आणता भगवी पताका खांद्यावर घेऊन ही नि:स्वार्थी पावले पंढरीच्या दिशेने पडत आहेत. हीच खरी समाजक्रांती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.