पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अलिबाग- पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना व मच्छिमार, सोसायटय़ांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रामध्ये गोवा राज्यापासून नैऋत्यपासून सुमारे ४१० कि.मी. व मुंबई पासून नैऋत्येकडे ६३० कि. मी. असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो पुढील काही काळात उत्तरेकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मच्छिमार करणा-या सोसायटय़ांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटींना किना-यावर परत यावे असेही सूचित करण्यात आले आहे.
अतिवृष्टी व वादळामुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक त्या आपत्कालीन उपाययोजना तयार ठेवून दक्षता घ्यावी. असे जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.