अलीकडे पाकिस्तानच्या भारत विरोधी वाढत्या कारवाया, त्यातून दोन्ही देशांत निर्माण होणारा तणाव लक्षात घेता त्या देशात कोणत्या पक्षाचं सरकार येणार आणि त्या पक्षाची कोणती धोरणं असणार, हे पाहणं भारतासाठी महत्त्वाचं ठरत आहे. तर पाकिस्तामध्येही विविध पक्षांची भारताविषयी काय भूमिका आहे, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील आताच्या निवडणुकांमधील ताज्या घडामोडींचा घेतलेला वेध.
सध्या पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांचं जोरदार वारं वाहत आहे. तिथं कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी त्यावर लष्कराचं नियंत्रण राहत असल्याचा इतिहास आहे. तरीही लोकशाही मार्गानं होणा-या सार्वत्रिक निवडणुकांना मोठं महत्त्व राहिलं आहे. शेजारी देश म्हणून पाकिस्तानात होणा-या निवडणुकांकडे भारताचंही लक्ष लागलेलं असतं. अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या भारतविरोधी वाढत्या कारवाया, त्यातून दोन्ही देशांत निर्माण होणारा तणाव लक्षात घेता त्या देशात कोणत्या पक्षाचं सरकार येणार आणि त्या पक्षाची कोणती धोरणं असणार, हे पाहणं भारतासाठी महत्त्वाचं ठरत आहे. त्यादृष्टीने या निवडणुकांमधील घडामोडी आणि निवडणुकांचे निकाल यांचा वेध घेतला जाणं गरजेचं आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार यावेळच्या निवडणुकांमध्ये १० कोटी ६५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०१३ मधील एकूण मतदारांच्या संख्येच्या मानाने ही संख्या दोन कोटींपेक्षा अधिक आहे. यामध्ये ५ कोटी ९२ लाख पुरुष मतदार असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६७ लाख इतकी आहे. आणखी एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी ९१ लाख महिला प्रथमच मतदान करणार आहेत. त्याचबरोबर २९१७ च्या निवडणूक कायद्यानुसार यावेळी प्रत्येक राजकीय पक्षाला एकूण लढवल्या जाणा-या जागांपैकी कमीत कमी पाच टक्के जागांवर महिलांना उमेदवारी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हे पाकिस्तानातील यावेळच्या निवडणुकांचं मुख्य वैशिष्टय़ म्हणता येईल.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यावेळी निवडणुकीच्या िरगणात उतरली आहे. २०१२ मध्ये पाकिस्तानातील राजकारणात प्रवेश केलेली मरियम प्रथमच निवडणूक लढवत आहे. तिने २०१३ च्या निवडणुकांमध्ये नवाज शरीफ यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षातून बाहेर पडलेल्या आयशा गुलालीनं स्वतंत्र पक्ष स्थापन केला असून त्याद्वारे ती स्वत: निवडणूक लढवत आहे. याशिवाय शाहरूख खानची चुलत बहीण नूर जहाँ ही सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे. या काही महिला उमेदवार विशेष चच्रेत आहेत. अशा काही वैशिष्टय़ांसह पार पडणा-या पाकिस्तानातील यावेळच्या निवडणुकांच्या निकालाबाबत बरीच उत्सुकता आहे. त्यादृष्टीने पाकिस्तानातील काही राजकीय घडामोडी, सामाजिक स्थिती यांचा वेध घेणं उचित ठरणार आहे.
दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम आणि जावई सफदर यांना पाकिस्तानी न्यायालयानं भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवलं. त्यानुसार नवाज शरीफ यांना १० वर्षे तुरुंगवास तसंच ७२ कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर मुलगी मरियमला सात वर्षाची कैद आणि १८ कोटी रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली. जावई सफदरला केवळ एक वर्षाच्या कैदेची शिक्षा देण्यात आली. या घडामोडीचा पाकिस्तानातील निवडणुकांवर परिणाम होणं साहजिक आहे. एकीकडं ही स्थिती असताना दुसरीकडं पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना तेथील निवडणूक लढवण्याची दिलेली परवानगी पाकच्या सर्वोच्च न्यायालयानं नाकारली. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मुशर्रफ यांना सशर्तपणे निवडणुकीला उभे राहण्याची परवानगी दिली होती; परंतु मुशर्रफ न्यायालयात हजर झाले नाहीत. न्यायालयानं मुशर्रफना २५ जुलै रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक लढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर त्यांनी उत्तर चित्राल जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुशर्रफ हे विविध खटल्याप्रकरणी १३ जून रोजी न्यायालयात हजर राहतील, असं सांगण्यात आलं होतं; परंतु मुशर्रफ हजर न झाल्याने पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश साकिब निसार यांनी ताशेरे ओढले. सुनावणीदरम्यान मुशर्रफ यांचे वकील कमर अफजल यांनी मुशर्रफ यांचं न्यायालयात हजर राहणं निश्चित आहे, मात्र आताच तातडीनं येता येणार नसल्याचं सांगितले. मुशर्रफ यांना आणखी वेळ हवा आहे. त्यानंतर याचिकेवरील सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित केली. याचिकाकर्ता हजर होईल, तेव्हाच सुनावणी घेतली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. या दरम्यान मुशर्रफ यांना निवडणूक लढण्याची दिलेली परवानगी मागं घेत असल्याचं न्यायालयानं जाहीर केलं. परवेज मुशर्रफ हे मार्च २०१६ पासून दुबईत असून, त्यांच्याविरुद्ध पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नवाज यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवलं. त्यांची उत्तराधिकारी मरियम निवडणुकीच्या िरगणात आहे. नवाज यांच्या पत्नी कुलसूम यांच्या घशावर कर्करोगाचा उपचार सुरू आहे. दोघांनाही तुरुंगात जावं लागणार असल्यानं त्यांना सहानुभूतीचा फायदा घेण्याची शक्यता आहे. नवाज यांनी निर्णय होण्यापूर्वी सात दिवसांची सवलत मागितली होती; परंतु न्यायालयानं त्यांची विनंती फेटाळली. पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांनी त्यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती.
पाकिस्तानात जागावाटपाचा विषय असो की, मतदारांची संख्या किंवा दिग्गज नेता, प्रत्येक पातळीवर पंजाब अव्वल स्थानी आहे. पंजाब प्रांत जिंकणा-या राजकीय पक्षाला देशात सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होतो, असं मानलं जातं. त्यामुळं पाकिस्तानात यंदाही राजकीय पक्षांच्या प्रचार मोहिमेचं केंद्र पंजाब प्रांत हेच आहे. सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पंजाबमधून भाग्य आजमावू लागले आहेत. यंदा पाकिस्तानात २७२ जागांसाठी एकूण ३ हजार ४५९ उमेदवार मैदानात आहेत. त्यात १ हजार ६२३ अर्थात ४६.९२ टक्के एकटय़ा पंजाब प्रांतातून निवडणूक लढवणार आहेत. नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी १४१ जागा पंजाब प्रांतातील आहेत. पाकिस्तानात १०.५९ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ६.६७ कोटी अर्थात ६३ टक्के एकटय़ा पंजाबमध्ये आहेत. पाकिस्तानात गेल्या पाच वर्षात गैरमुस्लीम मतदारांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गैर मुस्लीम मतदार ३६.३ लाख आहेत. त्यात १७.७ लाख हिंदू, ख्रिश्चन १.४० लाख आहेत. शीख मतदार केवळ ८ हजार आहेत. १९७२ मध्ये पाकिस्तानचं विभाजन झाल्यानंतर आतापर्यंत दहा पंतप्रधान झाले. त्यापैकी सहा पंजाब प्रांतातून निवडून आले. तीन पंतप्रधान सिंध प्रांतातून आणि एक बलुचिस्तानमधील होते. खैबर पख्तुनख्वामधून आतापर्यंत एकही पंतप्रधान झालेला नाही.
पाकिस्तानात एकूण चार प्रांत आहेत. सध्याच्या सत्ताधारी पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ चार मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी एन-१३२, एन-१९२ डेरा गाझी खान, एनए-२४९ कराची व एन-३ स्वातचा समावेश आहे. मरियम लाहोरच्या एनए-१२७ मधून लढत आहे. माजी पंतप्रधान शाहिद खान पंजाबच्या एनए -५७ मुरी आणि इस्लामाबादमधून लढत आहेत. इम्रान खान पाच जागांवरून निवडणूक लढवत आहेत. त्यात खैबरची एन-३५ बानू, पंजाबची एनए-५३, इस्लामाबाद, एनए-९५ मियानवाली, एनए-१३१, लाहोर व सिंधच्या एनए-२४३ कराचीमधून नशीब अजमावत आहेत. पीपीपी चेअरमन बिलावल भुत्तो तीन प्रांतांतील तीन जागांवर लढत आहेत. त्यात खैबर पख्तुनख्वा, मालाकंद, लाहोर आणि सिंधच्या लयारी मधून लढवत आहेत. त्यांचे वडील झरदारी सिंध व गिलानी पंजाबमधून लढत आहेत. पाकिस्तानात मागील ४६ वर्षात राष्ट्रीय राजकारणात सिंध राज्याचा दबदबा सुमारे १२, तर पंजाबचा २० वर्षे राहिला आहे. सिंध राज्य हा भुत्तो कुटुंबाचा गड आहे. पंजाब राज्य शरीफ कुटुंबाचा गड आहे. पीपीपीने राजकीय ध्रुवीकरणासाठी २००८ मध्ये पंजाबच्या युसूफ रझा गिलानी यांना पक्षाकडून पंतप्रधान बनवलं होतं. या वेळी खैबर पख्तुनख्वामधून आलेल्या इम्रान खानमुळं मोठं आव्हान आहे. पीटीआयचे प्रमुख इम्रान खान हे खैबर पख्तुनख्वा भागातील आहेत. त्यांनी पीएमएल-एन व पीपीपीसमोर कडवं आव्हान निर्माण केलं आहे. पीटीआयनं २०१३ मध्ये खैबर पख्तुनख्वा राज्यात प्रथमच सरकार स्थापन केलं होतं. नॅशनल असेंब्लित ३५ जागा जिंकल्या होत्या. गेल्या पाच वर्षात शरीफ यांच्याविरोधात रान पेटवण्यात इम्रान यशस्वी झाले. त्यांना लष्कराचीही छुपी साथ मिळाली. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत काय होतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.