भारताच्या पाच मच्छीमारांना श्रीलंकेत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून या निकालाच्या विरोधात श्रीलंकेतील भारतीय दूतावास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
कोलंबो/नवी दिल्ली- भारताच्या पाच मच्छीमारांना श्रीलंकेत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्यावर अंमली पदार्थाची तस्करी केल्याचा आरोप ठेवला होता. या निकालाच्या विरोधात श्रीलंकेतील भारतीय दूतावास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने २०११ मध्ये तामीळनाडूतील पाच मच्छीमारांना अंमली पदार्थाची तस्करी केल्याच्या आरोपावरून पकडले होते. त्यापैकी पाच मच्छीमारांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. श्रीलंकेतील कोलंबो उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रीथी पदमन सुरासेना यांनी हा निकाल दिला.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. या निकालानंतर परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन म्हणाले की, या निकालाच्या विरोधात श्रीलंकेतील भारतीय दूतावास वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे. कायदेशीर व अधिकारी स्तरावर ही लढाई लढली जाईल. श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
२०११ मध्ये श्रीलंकेच्या नौदलाने पाच भारतीय मच्छिमार आणि तीन श्रीलंकेच्या मच्छिमारांना अंमलीपदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती. कोलंबो उच्च न्यायालयाने या आठही दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली.