शहरात विक्रीसाठी येणा-या या हिरव्यागार भाज्या नक्कीच आरोग्यदायी आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाणे- शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर हिरव्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत, असा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात. पण शहरात विक्रीसाठी येणा-या या हिरव्यागार भाज्या नक्कीच आरोग्यदायी आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विक्रीसाठी येणा-या या हिरव्या भाज्या मोठय़ा प्रमाणात शहरातील रेल्वे रुळाजवळ पिकवण्यात येतात. या भाजीपाल्यात आरोग्यास हानिकारक घटक असल्यामुळे त्या शरीरास घातक ठरू शकतात. त्यामुळे ठाणेकरांनी स्वस्तात मिळणा-या या भाज्या घेताना काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.
घडाळ्याच्या काटय़ावर शहरवासीयांचे आयुष्य आहे. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाण्याकडे कल असतो. त्यामुळे नागरिकही भाज्या खरेदी करून त्या खात असतात. पण बाजारात येणा-या पालेभाज्या मानवी आरोग्यास हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, कळवा, कल्याण आदी परिसरात रेल्वे रुळालगत अनेक जण भाज्या पिकवतात. त्या शरीरास हानिकारक ठरण्याची शक्यता जास्त असते.
या भाज्या नाले, गटारातल्या घाण पाण्यात पिकवण्यात येतात. यात मुळा, पालक आदी भाज्यांचा समावेश असतो. त्यानंतर या भाज्या घाणेरड्या पाण्यात धुऊन त्या बाजारात आणण्यात येतात. त्या स्वस्तही उपलब्ध असतात. या भाज्या ज्या पाण्यावर पिकवल्या जातात. ते शरीरास घातक ठरण्याची शक्यता असल्याचा अहवाल मध्यंतरी एका संस्थेने दिला होता. तरीही या भाज्या अनेक रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवळ पिकवण्यात येत असल्याचे निदर्शनास येते.
रेल्वे रुळाजवळची जागा भाड्याने घेऊन या भाज्या पिकवण्यात येतात. या परिसरात शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याने जवळच असणा-या गटारातून, नाल्यातील पाणी घेऊन त्या पिकवण्यात येतात. यावर कोणाचेही निर्बंध नाहीत.