पाणी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. अशी पाण्याची महती आपण कित्येकदा ऐकत आलो आहे. पण शरीरात पाण्याची नेमकी भूमिका काय आहे, कोणी किती पाणी प्यावं याचे काही नियम आहेत. शरीरात पाणी कमी असून चालत नाही तसंच अधिक असून चालत नाही. शुक्रवार, २२ ऑगस्टला असलेल्या ‘जागतिक पाणी दिवसा’च्या निमित्ताने पाण्याची ही महती
पाणी हे जीवन आहे, पाण्याशिवाय आपण अधिक काळ जगू शकत नाही, म्हणूनच पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. केवळ मनुष्यच नाही तर प्राणीमात्रांनाही पाण्याची तितकीच गरज असते. पाण्यातून जरी कॅलरीज आणि पोषक तत्त्व मिळत नसली तरी पाण्याला आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. पाणी हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे, हे आता हळूहळू लोकांच्या चांगलंच पचनी पडलं आहे. त्यामुळे गेल्या काही दशकांत शरीराला आवश्यक तेवढं पाणी पिण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येतो. असं असलं तरी अजूनही कित्येक लोक पाण्याच्या महतीपासून वंचित असल्याचं दिसून येतं. मानवी शरीर हे अन्नाशिवाय काही आठवडे जगू शकतं मात्र पाण्याशिवाय केवळ एकच दिवस राहू शकतं. कारण आपल्या शरीराचा ५० ते ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. रक्त, काही पाचक रस, मूत्र आणि घाम आदी रुपात ते शरीरात असतं. इतकंच नव्हे तर काही प्रमाणात ते स्नायू, चरबी आणि हाडांमध्येदेखील असतं. शरीरात पाण्याचा साठा होत नसल्यामुळे आपल्याला दररोज ताज्या पाण्याची आवश्यकता असते जेणेकरून फुफ्फुसं, त्वचा आणि मल-मूत्र याद्वारे बाहेर पडलेल्या पाण्याचा निचरा भरून निघेल. आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे, हे प्रत्येकाच्या शरीराचा आकार, चयापचय क्षमता, आजूबाजूचं वातावरण, आपण काय अन्न सेवन करतो यावर तसंच आपण कोणकोणत्या उपक्रमांमध्ये सहभागी होतो यावर अवलंबून असतं. अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची पातळी बदलत जाते.
वयोमर्यादा पाण्याची गरज
०-६ महिने ०.७ लिटर दिवसाला
७-१२ महिने ०.८ लिटर दिवसाला
१-३ वर्ष १.३ लिटर दिवसाला
४-८ वर्ष १.७ लिटर दिवसाला
९-१३ वर्ष मुलांना २.४ लिटर दिवसाला तर
मुलींना २.१ लिटर दिवसाला
१४-१८वर्ष मुलांना ३.३ लिटर दिवसाला तर
मुलींना २.३ लिटर दिवसाला
१९-७० वर्ष पुरुषांना ३.७ लिटर दिवसाला तर
स्त्रियांना २.७ लिटर दिवसाला
शरीरातील पाण्याच्या पातळीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी
» शरीरातील पाण्याची पातळी ही स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. ही पातळी कमी होण्याची क्षमता मात्र वयानुसार बदलत जाते.
» प्रौढ मंडळींमध्ये दिवसाला २.५ ते ३ लिटर पाण्याची पातळी घटते. गरम होत असल्यास किंवा व्यायाम केल्यास शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
» ज्येष्ठांमध्ये दिवसाला २ लिटर इतकी ही पातळी घटते.
» विमानातून प्रवास करणा-या मंडळींमध्ये तीन तासांच्या विमान प्रवासात अंदाजे १.५ लिटर पातळी घटते.
» पाण्याची घटलेली पातळी भरून काढण्याची नितांत गरज असते.
पाणी का प्यावं?
शरीराच कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी पाण्याची गरज असते. यात कोणत्या प्रकारची कार्य समाविष्ट आहेत याची माहिती करून घेऊयात.
» पेशींचं आरोग्य आणि त्यांची अखंडता तशीच राहावी म्हणून
» नलिकांमधून रक्तप्रवाह सुरळीत व्हावं म्हणून
» चयापचय क्रिया, अपचन किंवा मूत्रावाटे होणारी शरीराची झीज भरून काढण्यासाठी.
» अति घाम आल्याने शरीराचं तापमान बदलतं. त्या तापमानाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी.
» सांध्यांमधलं वंगण टिकवून त्यांचं कार्य नियमित सुरू ठेवण्यासाठी.
» मूत्राशयाचं कार्य नियंत्रित ठेवण्यासाठी.
» पचनक्रियेला साहाय्य करणे आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंध घालणे.
» त्वचेचा पोत सुधारण्यासाठी त्वचेची आद्र्रता टिकवून ठेवणे.
» शरीरासाठी आवश्यक असलेली पोषकतत्त्व आणि प्राणवायू पेशींपर्यंत पोहोचवणे.
» शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवणे आणि मेंदूचं कार्य सुधारणे.
» वजन कमी करण्यासाठी साहाय्य करते.
» मूत्राशय किंवा कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचाव होण्यासाठी.
» शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा करून मूत्रसंसर्गापासून शरीराचं संरक्षण करणं.
» मुरगळणे किंवा लचक भरणे याला प्रतिबंध आणते.
» तुम्हाला आनंदी ठेवते.
कोणी भरपूर पाणी प्यावे?
» डाएट करण्या-या मंडळींनी
» गरोदर किंवा स्तनपान देणा-या महिलांनी
» उलटी किंवा अतिसार या विकाराने त्रस्त असलेल्यांनी
» शारीरिक श्रम अधिक करणा-यांनी
» शरीराचे तापमान अधिक असलेल्यांनी
कोणी कमी पाणी प्यावे?
» बैठे काम करणा-यांनी
» थंड वातावरणात राहाणा-यांनी
» रसदार फळं किंवा भाज्या खाणा-यांनी
अति पाण्यामुळे शरीरावर काय दुष्परिणाम होतो?
शरीराला आवश्यक असेल तितकं पाणी शरीरात गेलं नाही तर महिलांना किडणी स्टोन, मूत्रसंसर्ग सारख्या शारीरिक विकारांना सामोरं जावं लागतं. याशिवाय कित्येकांना मानसिक विकारांनादेखील सामोरं जावं लागतं. पाणी भरपूर प्या, पाणी भरपूर प्या असं सगळं ऐकून काही जण पाणी पिण्याचा अतिरेक करतात. शरीराला आवश्यक असेल त्यापेक्षा अधिक पाणी प्यायल्यानेदेखील शरीराला हानी पोहोचू शकते. इतकंच नाही तर हायपोनॅट्रेमिया सारखे आजारही होऊ शकतात. रक्तातील सोडियमची पातळी अनपेक्षितरीत्या कमी होते. स्नायूंचं आकुंचन करण्यासाठी सोडियमची गरज भासते. कमी वेळात अधिक प्रमाणात पाणी प्यायल्यास किडणीद्वारा शरीराला नको असलेलं पाणी उत्सर्जित होत नाही. हायपोनॅट्रेमियामुळे डोकेदुखी, अंधुक दिसणे, गोळे येणे, डोक्यातून घाम येणे, कोमात जाणे आणि परिणामी मृत्यू होणे आदी गोष्टी होऊ शकतात. हायपोनॅट्रेमिया प्रामुख्याने आजारी व्यक्ती किंवा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्ती त्यातही स्क्रिझोफिनिया झालेल्या व्यक्तिंचा समावेश आहे.
असे सगळे पाण्याचे फायदे किंवा पाण्याची महती जाणून घेतल्यावर पाणी आपल्या जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावते हे समजलं असेलच. पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास आपण निरोगी राहू शकतो
हे करू नका
» सुगंधित दूध, मिल्कशेक किंवा कडेन्स्ड दूध पिण्यावर नियंत्रण ठेवा.
» बाहेर मिळणा-या मिनरल बॉटलमधील पाणी पिणं टाळावंच. कारण त्यात मिठाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे घाम येणे किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता अधिक असते.
» तहान लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
हे अवश्य करा
» साधारणत: प्रत्येकाला दिवसाला किमान ८ ग्लास पाण्याची आवश्यकता असते.
» गरोदरपणात दिवसाला २ ते ३ लिटर पाण्याची गरज भासते.
» व्यायाम करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतर पाणी अवश्य प्यावे. थोडासा लिंबाचा रसही पाण्यात घालावा.
» पाण्याची बाटली सतत जवळ ठेवावी.
» ताज्या फळांच्या ज्युसमध्ये बर्फाचे खडे घालावेत.
» बाहेर खाताना कोल्ड्रिंकपेक्षा पाणीच प्यावे.
» सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी अवश्य प्यावे.
» जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे.
» फळांचा ज्युस पिण्यापेक्षा फळं खावीत.
» कॅनमध्ये असलेले सूप्स पिणं टाळावं. कारण त्यात सोडियमचं प्रमाण अधिक असतं.
(शब्दांकन : आदिती पराडकर)