महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना, तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने पाणी बचाव जनजागृती साप्ताह सुरू केला आहे.
कल्याण – महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना, तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने पाणी बचाव जनजागृती साप्ताह सुरू केला आहे. असे असतानाच कल्याण शहराच्या पाश्चिम भागात पाच ते सहा ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनमधून पाण्याची गळती सुरूअसल्याचे दृश्य आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याची टंचाई असताना पाण्याची अशा पद्धतीने नासाडी होत आहे.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे १६ ते २२ मार्च दरम्यान पाण्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका मुख्यालयात बुधवारी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, जलअभियंता अशोक बैले, शहर अभियंता पी.के. उगले यांच्यासह नगरसेवक, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी पाणी जपून वापरण्यासाठी सामूहिक शपथ घेतली.
यावेळी पाणी वाचवा या विषयावर पथनाटय़ सादर करण्यात आले. या घटनेला २४ तासही होत नाही तोच शहराच्या लालचौकी भागात स्मशानभूमी शेजारी नाल्याजवळच महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत असल्याचे आढळून आले. महापालिका कर्मचा-यांकडून पाईपला प्लास्टिकची पिशवी लावून गळती रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
याच प्रकारे रामबागेत मुख्य रस्त्यावरच आठ दिवसांपासून मोठय़ा पाईपलाईनच्या व्हॉल्व्हमधून पाणी वाहत आहे. तिकडेही कुणाचे लक्ष गेलेले नाही. शहरातील अनेक विहिरींना पाणी नाही. ज्यांना पाणी आहे त्याची पातळी खाली गेली आहे. पाणी कपातीमुळे शहरात तीन दिवस पाणीपुरवठा बंद असतोच, शिवाय अचानकही पाणी बंद केले जाते. अशी स्थिती असताना शहाराच्या अनेक भागात नळाच्या पाण्याची गळती सुरू आहे. त्याकडे लोकप्रतिनिधी व महापालिका अधिका-यांचे लक्ष नाही. पाण्याच्या या गळतीमुळे शहराच्या अनेक भागात पाण्याला पुरेसा दाब नसल्याने तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.