पहिल्याच पावसात भिजणे हा अवर्णनीय आनंद कुणीच रोखू शकत नाही. कडक उन्हाळय़ाने अंगाची लाही-लाही होत असतानाच, कधी एकदा पाऊस येतो आणि कधी मनसोक्त भिजायला मिळते, याची आपण चातक पक्ष्याप्रमाणेच वाट पाहतो. याचे कारण गेले दोन ते तीन महिने कडक उन्हाळय़ाचा त्रास सहन करीत आबालवृद्ध हैराण झाला असतानाच, गेला आठवडाभर पावसाने तर मन हलके केले; परंतु पावसात अति भिजणेही कसे धोकादायक असते हे पावसात भिजलेली व्यक्तीच सांगू शकते.
शनिवारी तर नाही नाही म्हणत पावसाने मुंबईत तुडुंब पाणीच पाणी झाले. पहिल्याच पावसात मुंबई महानगरपालिका आपल्या मान्सूनपूर्व व्यवस्थापनामध्ये सपशेल उताणी पडल्याचे समोर आले. ठिकठिकाणच्या नाल्यांमध्ये पाणी तुंबून प्रवास करणा-यांचा खोळंबाच केला. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सरकारी आस्थापनांमध्ये काम करणा-यांना ते सुखकारक होते. पण, खासगी कंपन्यांमध्ये किंवा खासगी काम करणा-या नोकरदारांचे हाल झाले. रेल्वेच्या तिन्हीही मार्गावरील गाडय़ा धीम्या गतीने धावत होत्या.
मुख्य म्हणजे, पावसाचा फटका हा सर्वसामान्यांबरोबरच समाजातील सर्व घटकांना होत असतो. कुणी पावसात भिजल्याने आजारी पडतो. कुणाची तरी नाल्यामध्ये पाणी आल्याने वाहून जाण्याची शक्यता असते. पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर खड्डा कुठे आणि पाणी कुठे हेच काही कळत नाही. गुडघाभर पाणी आहे म्हणून जर पाणी तोडण्याचा कुणी प्रयत्न केला तर कुठे तरी मॅनहोल आहे हे गृहित धरूनच चालावे लागणार आहे. या सर्वाचा विचार करून माणसाने आपल्या जिवाला थोडे तरी घाबरले पाहिजे. आपल्याला कोणताही आजार होऊ नये म्हणूनही प्रथमत: स्वत:ची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.
एकाच गावात राहणा-या ब-याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हटले जाते. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत. पण, वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर अशा साथीच्या रोगांची कारणे समजू लागली आणि त्यावर उपायही होऊ लागले. साथीचे रोग त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात, डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात किंवा आजार झालेला रुग्ण दुस-या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरल्याचे ऐकिवात आहे.
चिकुनगुनिया
एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV) विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. रोगाचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले. ताप येणे, तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो. सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही आहेत. चिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही fever ची अवस्था मात्र या रोगात त्यात जवळजवळ कधीच दिसत नाही. त्यामुळे चिकुनगुनियामुळे सहसा मृत्यू ओढवत नाही.
डांग्या खोकला
संसर्गजन्य रोग आहे. बोडेर्टेला पेर्तुसिस नावाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. श्वासातून पडणा-या थेंबावाटे हा विषाणू पसरतो. रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे थेंब उडतात. नाकातून वाहणा-या पातळ पदार्थाचा स्पर्श झाल्यानेदेखील हा रोग पसरतो. संसर्गानंतर सात ते दहा दिवसांत रोग-लक्षणे दिसू लागतात. पहिल्या अवस्थेत सर्दी, पडसे व थोडा ताप असतो. नंतर पाच-सात दिवसांनी दुसरी अवस्था सुरू होते. खोकला येऊ लागतो. प्रथम खोकला कोरडा असतो. पुढे खोकल्याच्या उबळी सुरू होऊन श्वास आत घेताना हुप असा आवाज येतो. म्हणून याला माकडखोकला असेही म्हटले जाते. शेवटी चिकट कफही पडतो. कधी कधी कफ परत घशात जाऊन तो गिळला जातो. कधी कधी उलटी होते. उबळी दररोज पंधरा वीस अगर जास्तही वेळा येतात. उबळीच्या जोराने चेहरा लाल होतो. नाकातून एखादे वेळी रक्तस्रव होतो. कोणाकोणाच्या डोळ्यातही रक्त उतरते. अशक्त रोग्याला खोकला झाला, तर तो बरा होणे कठीण असते. या विकारात ताप येऊन न्युमोनिया होऊन मूल दगावण्याची शक्यता असते. तिस-या अवस्थेत उबळी कमी होत जाऊन रोगी बरा होतो.
डांग्या खोकल्याची लस घेण्याची शिफारस सर्व बालकांसाठी केली जाते. ही लस सामान्यत: डीटीपी (घटसर्प, धनुर्वात, आणि डांग्या खोकला) अशी संयुक्तपणे दिली जाते. पूर्वीचे संसर्ग किंवा लसीकरण यांच्यामुळे आयुष्यभर प्रतिकारक्षमता मिळत नाही. तथापि, वयाच्या सहाव्या वर्षानंतर, संसर्गाचा उद्रेक होत नाही तोवर लसीचे बूस्टर डोस देण्याची शिफारस करण्यात येत नाही.
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप
या तापाला हाडमोडी तापही संबोधले जाते. हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रवात्मक ताप (डीएचएफ) डेंग्यू रक्तस्रवात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. भारतात १९६३ साली कलकत्त्यात डेंगीची पहिली मोठी साथ आली. त्यानंतर बहुतांश महानगरे, शहरे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याची वृत्ते येऊ लागली.
लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठय़ा माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात? एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलटय़ा, त्वचेवर व्रण उठणे, हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्रव – चट्टे उठणे, हिरडय़ांमधून रक्तस्रव, अंतर्गत रक्तस्रव-आंतडय़ांमधून रक्तस्रव, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.
ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये. (४-५ दिवसांपेक्षा जास्त.) त्यानंतर किंवा त्यापूर्वी पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्रव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. पपयाचा वापर हा डेंग्यू बरा करण्यासाठी केला जातो.
प्रतिबंध
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरण्यापासून थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.