उकाडय़ापासून असह्य झाल्यावर अंगावर शिंपडणा-या पावसाचे थेंब प्रत्येकालाच सुखावणारे वाटतात; पंरतु हाच सुरुवातीला हवाहवासा वाटणारा पाऊस मात्र, काही दिवसांनी नकोसा वाटू लागतो. कारण, साथीच्या आजारांची लागण झाली की, घराघरात कोणीतरी आजारी असल्याचे दिसून येते. पावसाळ्यातील आजारांचे मूळ कारण म्हणजे, दूषित पाणी, खराब अन्न व आजूबाजूला असणारी अस्वच्छता. बरेचदा ताप, थंडी, खोकला, कावीळ, उलटी, जुलाब इत्यादी आजारांनी लहान मुले, वृद्ध तसेच तुमच्या आमच्यासारखे या साथीच्या किंवा पावसाळी आजारांची लागण झाल्याचे दिसून येते. सुरुवातीला साधा वाटणारा सर्दी-खोकला मलेरिया, डेंग्यूही असू शकतो. त्यामुळे स्वत:हून मेडिकलमधून औषधं-गोळ्या घेऊन आजार बरे करण्याचा प्रयत्न करणा-यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावे. तसेच, योग्य तपासणी करून आजाराबाबत वेळीच खातरजमा करावी, अन्यथा सर्दी-पडसे समजून अंगावर काढणे महागात पडू शकते.
पावसाळ्यात होणारे आजार
डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, अतिसार अर्थात जुलाब, टायफाईड, साथीचा ताप, कॉलरा, लेप्टोस्पायरासिस, पोटाचा संसर्ग, कावीळ हे सर्व आजार हे पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतात. ज्या रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता असते किंवा असे आजार झालेले आहेत. अशा रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुले, वृद्धांची या दिवसात काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी उकळून किंवा प्युरिफाईड करूनच प्यावे तसेच उघडय़ावरील अन्नपदार्थ शक्यतो टाळावेत. कोणताही साथीचा आजार ३-४ दिवसांपेक्षा अधिक असेल तर, अंगावर न काढता डॉक्टरांना दाखविणे चांगले. बरेचदा कावीळ, टायफाईड, मलेरिया आदी आजारांची लक्षणे त्वरित दिसून येत नाहीत. त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
– डॉ. रॉय पाटणकर, पोटविकार तज्ज्ञ