जगभर आज इस्लामबद्दल चर्चा आहे. काही धर्मापासून भरकटलेले लोक प्रेषितांची शिकवणूक विसरले आहेत असेच वाटते. भलेही मध्यपूर्वेतील काही लोक त्यांच्या शिकवणुकीचा विपर्यास करून त्यांची शिकवण अव्हेरीत असले तरी पैगंबरांना अभिप्रेत असलेला खरा मुस्लीम भक्त मात्र सौम्य होता. त्यांनी आपल्या अनुयायांसाठी अतिशय आदर्श असे वर्तन पुरस्कृत केलेले हदीथमध्ये आपल्याला पदोपदी दिसते.
एकदा त्यांनी म्हटले आहे, ‘ज्याच्यामध्ये सभ्यता नसेल तो सर्वच भद्र गोष्टींपासून वंचित राहील.’ (सलीह मुस्लीम) त्यांनी क्षमाशीलतेलाही खूप महत्त्व दिले होते. ते म्हणत ‘जो मुसलमान आपल्याला इजा करणा-याला क्षमा करतो परमेश्वर त्याचे एक पाप माफ करील आणि स्वर्गातील त्याचे स्थान उच्च करील.’
सामान्य माणसासारखे मुस्लीम व्यक्तीचे वर्तन नसावे असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. त्यांनी ‘मुस्लीम’ म्हणजे ईश्वराचा खरा भक्त, कसा असावा हे सांगताना जणू आदर्श माणसाची कल्पनाच पुढे ठेवली आहे. ते म्हणतात, ‘तुम्ही इतरांसारखे स्वत:ची स्वतंत्र बुद्धी नसलेले, विवेक नसलेले होऊ नका. जे तुमच्याशी चांगले वागले त्याच्याशी चांगले आणि जे वाईट वागतील त्यांच्याशी वाईट वागावे असा विचार करू नका. तर जो चांगला वागेल त्याच्याशी चांगलेच वागा, मात्र जो तुमच्याशी वाईट वागेल त्याच्याशीही वाईट वागू नका.
खरा जिहाद
आज जिहादच्या संकल्पनेचा खूप बोलबाला आहे. जगभर याबद्दल चिंता आहे. काही लोक प्रचंड िहसेचा आधार घेऊन पैगंबरांच्या जिहादच्या संकल्पनेला बदनाम करीत आहेत. मात्र खुद्द प्रेषितांना अभिप्रेत होता तो जिहाद म्हणजे सत्याचा आग्रह असे सिद्ध करणारे त्यांचे वचन उपलब्ध आहे. ते म्हणतात, ‘सर्वात सात्विक (आणि श्रेष्ठ) जिहाद म्हणजे एखाद्या अन्यायी सत्ताधीशासमोर निर्भयपणे केलेला सत्याचा पुरस्कार होय!’ सच्चा मुस्लीम कधीही तुच्छतेने बोलणार नाही, तो कुणाला बददुवा देत नाही किंवा अश्लील शब्द वापरीत नाही. तो कधीही उर्मटपणाची भाषा करीत नाही.’ आपल्या अनुयायांसाठी वागणुकीचे इतके उच्च दंडक त्यांनी घालून ठेवले आहेत. आता आपण ते किती पाळतो हा ज्याने त्याने आत्मपरीक्षण करून पाहायचा प्रश्न आहे.
संपत्तीच्या मोहाला आवर
पैगंबरसाहेब हे अतिशय आध्यात्मिक नेते होते. त्यांनी आपल्या शिकवणुकीत नेहमी ‘या जगापेक्षा’ ‘त्या जगाचा’ विचार मांडला. इहलोकातील संपत्तीविषयी ते म्हणतात, ‘खूप संपत्ती असली म्हणजे संपन्नता आली असे नाही, संपन्नता येते ती चित्तवृत्तीतील समाधानाने.’ हे विश्व आणि खुद्द आपल्याला निर्माण करणा-या ईश्वराला मानणारा आणि न मानणारा यातील फरक सांगताना ते म्हणतात, ‘एक जिवंत आहे तर दुसरा मृत्यू पावलेला आहे.’ त्यांचे मानवी स्वभावाचे निरीक्षण बारीक होते.
कित्येकदा लोक आपल्याशी अतिशय नम्रतेने, प्रेमाने वागतात. प्रभावशाली व्यक्तींना तर असा अनुभव अनेक वेळा येतो. मात्र असे सर्वाशी चांगले वागणारे लोकही कुटिल असू शकतात. त्यांचा चांगले वागण्यामागचा उद्देश काही वेगळा असू शकतो. म्हणून पैगंबरांनी सांगून ठेवले आहे, ‘परमेश्वर केवळ माणसाचे कर्म बघून त्याचा न्याय करेल असे नाही तर तो त्या कर्मामागचा उद्देश पाहून न्याय करेल.’ (सलीह बुखारी सलीह मुस्लीम)
तुम्ही या जगात जगताना लोकांवर दया दाखविली तरच तो स्वर्गातला परमपवित्र तुम्हावर दया दाखवील असेही ते सांगत. त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे हित असे इतर माणसांच्या हिताशी, मानवी समाजाच्या सौहार्दपूर्ण परस्पर व्यवहाराशी जोडून टाकलेले दिसते. प्रामाणिकपणा माणसाला सात्विक वर्तनाकडे घेऊन जातो आणि सात्विकतेतूनच स्वर्ग प्राप्त होतो असे त्यांचे म्हणणे होते. असत्य भाषणातून माणूस पापास प्रवृत्त होतो आणि मग त्याला शेवटी सार्वकालिक अग्नीला अर्थात नरकाला सामोरे जावे लागते अशी ताकीद त्यांनी आपल्या अनुयायांना दिली होती.
धार्मिक परस्परद्वेष पैगंबराच्या काळीही नव्हता असे नाही. एकदा ते मदिना शहरात आपल्या शिष्यांबरोबर बसले होते. जवळून एक प्रेतयात्रा चालली होती. ते दृश्य पाहताच पैगंबरसाहेब उठून उभे राहिले. यावर त्यांचा एक शिष्य म्हणाला, ‘गुरुजी, गेलेली व्यक्ती एक ज्यू व्यक्ती आहे. (म्हणजे ती व्यक्ती मुस्लीम नाही, म्हणून आपण उठून उभे राहायची गरज नाही.) पैगंबरांना हे मुळीच आवडले नाही. ते तत्काळ उदगारले, ‘म्हणजे तो माणूस नाही का?’
खरा शांतिदूत
असाच एकदा एक बेडोईन समाजाचा नास्तिक माणूस मशिदीत शिरला आणि त्या उद्दाम माणसाने चक्क तेथेच मूत्रविसर्जन केले. लोक संतापले. त्याला चांगला चोप द्यावा म्हणून लोक धावले. यावर पैगंबरांनी स्वत: मधे पडून लोकांना थांबविले आणि त्याला त्याचे पापकर्म पूर्ण करू दिले. मग ते शांतपणे शिष्यांना म्हणाले, ‘पाणी टाकून ती जागा स्वच्छ धुवून टाका.’ त्या इसमाला ते म्हणाले, ‘बाबा, ही अल्लाच्या इबादतची पवित्र जागा आहे. इथे कुराण वाचले जाते, परमेश्वराची प्रार्थना केली जाते.’ नंतर तो मनुष्य गेल्यावर पैगंबरांनी आपल्या शिष्यांना जो संदेश दिला तो आश्चर्यकारक आहे. ते म्हणाले, ‘तुम्हाला या जगात माणसांचे व्यवहार सोपे-सुलभ करण्यासाठी पाठविले आहे. ते अवघड करण्यासाठी नाही!’ इतक्या प्रक्षोभक प्रसंगीही त्यांचे वर्तन इतके शांतपणाचे होते.
समानतेला महत्त्व
ईश्वराकडून आलेला इस्लामचा विचार जगभर पसरविताना पैगंबरांनी केवढी दक्षता घेतली आहे आणि प्रसंगी ते किती सडेतोड बोलत असत ते पाहून आपण स्तिमित होतो. त्यांच्या दूरदृष्टीचा एक नमुना पाहा. ते म्हणतात, ‘माझ्या धर्मात अरब मनुष्य हा अरब नसलेल्या माणसापेक्षा श्रेष्ठ नाही किंवा अरब नसलेला मनुष्यही अरबापेक्षा श्रेष्ठ नाही, गोरा माणूस काळ्यापेक्षा किंवा काळा माणूसही गो-यापेक्षा श्रेष्ठ नाही. तर सर्व समान आहेत. केवळ जो देवाचा खरा भक्त आहे आणि सात्विकपणे जीवन जगतो तोच देवाला अधिक प्रिय होईल आणि सन्माननीय मानला जाईल.’ आज जगभर इस्लाम हा धर्म समानतेकरता ओळखला जातो, त्यामागे पैगंबरांची अशी अत्यंत मूलगामी शिकवण आणि त्यांचे मानवी स्वभावाचे सखोल चिंतन कारणीभूत आहे.
समाधानी वृत्तीला उत्तेजन
‘चित्ती असू द्यावे समाधान’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओवीशी साम्य सांगणारे त्यांचे हे वचन पाहा, पैगंबर म्हणतात ‘नेहमी आपल्यापेक्षा ज्याच्याकडे कमी आहे त्याचा विचार करा, ज्याच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आहे त्याचा विचार करून मत्सरी बनू नका. नाहीतर अल्लाहने जी कृपा तुम्हावर केली आहे तिचा तुमच्या हातून नकळत अपमान होईल.’
संत कबिरांवरही इस्लामच्या तत्त्वज्ञानाचा खूप प्रभाव होता. त्यांचे वचन ‘साई इतना दे दे जामे कुटुम समाय, मैं भी भुखा न रहू, साधू भी भुखा न जाय,’ हे जणू पैगंबरसाहेबांचा विचार पुढे नेताना दिसते. त्यांनी म्हटले होते, ‘जे थोडे आहे, पण पुरेसे आहे. गरजेपेक्षा अधिक मिळाल्याने माणसात अहंकार निर्माण होतो. दोन लोकांचे जेवण तिघांना सहज पुरते आणि ३ लोकांचे जेवण ४ लोकांना पुरू शकते.’
पशुपक्षांचीही काळजी
हदीथमध्ये आइशा यांनी म्हटले आहे, ‘एकदा मी एका हळू चालणा-या उंटावर बसून प्रवास करीत होते. तो खूपच हळू चालत असल्याने मी त्याला सारखी मारीत होते. पैगंबरसाहेबांनी हे पाहिले. ते माझ्या जवळ येऊन म्हणाले, ‘नेहमी सौम्यपणे वागत जा. सौम्यपणा माणसाला शोभा देतो आणि कठोरपणा देवाच्या दृष्टीने शापित आहे.’
एका प्राण्याबद्दलही इतकी करुणा दाटून येणा-या प्रेषिताच्या शिकवणुकीपासून आपण किती दूर गेलो आहोत हा विचार कुणालाही अस्वस्थ करील. ‘जो कुणी विनाकारण एखाद्या चिमणीलाही मारेल त्याला माझे सांगणे आहे, कुणाही प्राण्याला विनाकारण त्रास देताना विचार करा, तो चिमुकला पक्षी न्यायाच्या दिवशी अल्लाहपुढे ओरडून तुझ्याविरुद्ध साक्ष देणार आहे. तेव्हा आपल्या वर्तनात आताच सुधारणा करा.’