ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अखेर शिवसेना-भाजपाचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा १५१ मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत त्यांच्यासमोर याच मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले वसंत डावखरे यांचे आव्हान होते. डावखरे यांच्याकडे असलेला अनुभव पाहता त्यांचाच विजय निश्चित असल्याचे खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही म्हटले होते. मात्र अखेर डिप्लोमसीसमोर पैसा मोठा ठरल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले आहे.
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आघाडीच्या वतीने विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती आणि सलग चार वेळा याच मतदारसंघातून निवडून गेलेले वसंत डावखरे हेच यंदाही आघाडीचे उमेदवार असतील, अशी चर्चा होती. आणि अपेक्षेनुसार राष्ट्रवादीने यंदाही त्यांनाच संधी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांना काँग्रेस, बहुजन विकास आघाडी यांनीही पाठिंबा दिला. डावखरेंसाठी दिग्गज नेत्यांची फौज रिंगणात उतरली. मात्र नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी कितीही असले, तरी या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची भूमिका नगरसेवकांची होती. ते संख्याबळ डावखरेंकडे आधीपासूनच कमी होते. मात्र तरीही डावखरे आत्तापर्यंत संख्याबळ नसतानाही ज्या पद्धतीने विजयी झाले, तसेच ते यंदाही होतील, अशी अपेक्षा सर्वानाच होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने डावखरेंना कुठलीही छुपी मदत करायची नाही, असा निर्णय घेतला होता. शिवाय राज्य पातळीवरील प्रतिष्ठा जपण्यासाठी आपली जागा निवडून आणायचीच, असे फर्मान शिवसेना आणि भाजपाच्याही वरिष्ठांनी सोडले होते. त्यामुळेच भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह शिवसेना आणि भाजपाचे ठाणे जिल्ह्यातील झाडून सर्व लोकप्रतिनिधी या निवडणुकीत कामाला लागले होते. या निवडणुकीत सुरुवातीपासून शिवसेना, भाजपा आणि आरपीआयकडे ५२० मतदार होते, तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बविआ आघाडीकडे ४२६ मतदार होते. शिवाय अपक्ष, इतर लहान पक्ष यांचीही विभागणी झाली होती. त्यामुळे यंदा जर शिवसेना आणि भाजपाचे मतदार फुटले नाहीत, तर फाटक यांचाच विजय होणार, हे निश्चित होते. या निवडणुकीत शिवसेना-भाजपाने अमाप खर्च केल्याचे बोलले जाते. आपल्या पक्षाच्या मतदारांसह अपक्ष, इतर पक्षाच्या मतदारांनाही खूश करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला. शिवाय निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांना विमानाने गोवा वारीला नेण्यात आले. तिथे पंचतारांकित ललित हॉटेल आणि स्पामध्ये ‘सगळय़ा’ सोयी-सुविधांसह त्यांना ठेवण्यात आले होते. थेट मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना परत आणण्यात आले. त्यानंतरही मतदान होईपर्यंत ते पक्षाच्या ताब्यात होते. त्यामुळे एकंदरीत शिवसेना-भाजपाने आपली आजवरची प्रथा मोडून काढत स्पष्ट बहुमत असल्याने जिंकण्यासाठीच ही निवडणूक लढवल्याचे पाहायला मिळाले.
दुसरीकडे आजवरचा अनुभव पाहता डावखरे यांनीही या निवडणुकीत जोर लावला होता. त्यांच्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीही प्रचार केला होता. खुद्द शरद पवार यांनी ठाण्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. मात्र वास्तविक प्रचार कुणीही केला, तरी मुळात मतदारसंख्याच कमी असल्याने डावखरे यांचा विजय सुरुवातीपासून कठीण वाटत होता. त्यामुळे त्यांनी संख्याबळ जमवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मतदारांना गडबड केल्यास करिअर संपवण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हातात असलेल्या मतदारांवरच डावखरे यांची भिस्त होती. डावखरे यांनी या निवडणुकीत जिंकण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यांचा आत्मविश्वासही वाखाणण्याजोगा होता. अगदी सोमवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतरही डावखरे यांनी विजय आपलाच असल्याचे म्हटले होते. डावखरे हे आजपर्यंत चमत्कारिकपणे विजयी झाल्याने यंदाही काहीतरी चमत्कार ते करतील, अशी सर्वसामान्यांचीही अपेक्षा होती. डावखरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे आजवर शिवसेनेकडून अप्रत्यक्षपणे डावखरेंना मदत होत होती. मात्र यंदा डावखरे यांना मदत होणार नाही, असे स्पष्ट संकेत शिवसेनेने सुरुवातीपासून दिले होते. शिवाय ठाण्यातील डावखरेंशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांना याबाबत पूर्वकल्पना दिली होती. त्यानंतरही डावखरे मात्र आशावादी होते. पण शिवसेना-भाजपाने यावेळी जागा निवडून आणायचीच असा चंग बांधला होता. त्यांच्याकडे असलेले स्पष्ट बहुमत पाहता अपेक्षेप्रमाणे फाटक यांचा विजय झाला. डावखरे यांच्या या पराभवानंतर मते कशी विभागली? कुठून कुणाला किती मते मिळाली? मतांची फाटाफूट झाली का? या सगळय़ांचा अभ्यास होणारच आहे.
थोडक्यात, या पराभवानंतर डावखरे यांच्या पराभवाची कारणे शोधणे क्रमप्राप्त बनले आहे. डावखरे हे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते. या निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील मतदारांनाही मतदानाचा अधिकार होता. तिथे प्राबल्य असलेल्या बहुजन विकास आघाडीचा डावखरे यांना पाठिंबा होता. मात्र ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्राबल्य कमी असल्याने डावखरे विरुद्ध फाटक हा सामना सुरुवातीपासून ४२६ विरुद्ध ५२० असा होता. त्यात या निवडणुकीत फाटक यांना ६०१ मते मिळाली, तर डावखरे यांना ४५० मते मिळाली. या निवडणुकीत एकूण १०६० मतदार होते. त्यापैकी १०५७ इतके मतदान झाले होते. त्यानंतर मतमोजणीदरम्यान यापैकी ६ मते बाद झाली. ती कशी झाली? हा संशोधनाचा विषय आहे. डावखरे यांनी हक्काच्या मतांसह अपक्ष, इतर सेक्युलर पक्षांचाही पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ही मते फाटक यांच्याकडे फिरल्याचे यात पाहायला मिळत आहे. फाटक यांच्याकडे हक्काची ४९९ मते असताना त्यांना वरची १०२ मते कशी मिळाली? याचा आता अभ्यास होणे गरजेचे आहे. या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सगळय़ा गोष्टींचा आता अभ्यास होणे गरजेचे आहे.
मुळात ठाणे जिल्ह्यात आघाडीचे संख्याबळच कमी असल्याने ते आगामी काळात कसे वाढवता येईल? या दृष्टीने आता कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे. या पराभवाचे खापर नेत्यांवर फोडणे निश्चितच योग्य नाही. यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवून आपले बळ कसे वाढवता येईल? याचा अभ्यास आता करायला हवा. ज्यामुळे पुढच्या वेळी जमवाजमव करण्याची गरजच भासू नये. डावखरे यांच्या या पराभवानंतर युतीकडून करण्यात आलेल्या वारेमाप खर्चाचा मुद्दाही प्रामुख्याने चर्चेत आला आहे. त्यांनी भलेही त्यांच्याच नगरसेवकांना गोव्याला नेले असेल, पण लोकशाहीमध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेत हा खर्च बसतो का? गोव्याच्या ज्या ललित नामक पंचातारांकित हॉटेलमध्ये या सर्वाना नेण्यात आले होते, तिथे एका जणाला २४ तास राहण्यासाठी किमान १५ हजार रुपये मोजावे लागतात. मग ५०० जणांचा झालेला हा खर्च कुणी केला? प्रत्येक नगरसेवकाला दोन, तीन, पाच लाख रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. हा खर्च कुठून करण्यात आला? त्यामुळे एकिकडे हा प्रचंड खर्च आणि दुसरीकडे डिप्लोमसी, यात ‘पैसा झाला मोठा, डिप्लोमसीचा झाला तोटा’, असे पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता तळागाळातील कार्यकर्त्यांनी कामाला लागायला हवे. तरच भविष्यात पुन्हा ठाण्यावर आघाडीचा झेंडा फडकू शकेल.