प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला, तर त्याला खचित असे आढळून येईल, की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे. जो काही पैसा-अडका, मानमरातब मिळतो आहे, तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून, कोणत्याही ब-या-वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट करील. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करू या. ‘राम कर्ता’ म्हणेल तो सुखी, ‘मी कर्ता’ म्हणेल तो दु:खी. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावे आणि मजेने असावे; आनंदाने संसार करावा. ‘तुझ्या नामस्मरणाची गोडी दे’ हेच मागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होते आहे हे समजून, समाधानात राहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. असे वागल्याने हवे – नकोपण नाहीसे होते आणि अहंपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा, रामाला अनन्यभावे शरण जा. ‘रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानीन,’ अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळे मदतीकरिता हातच पुढे करीत नाही, त्याला तो काय करणार? तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले, म्हणून ते ‘समर्थ’ होऊ शकले. ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली, जो जगाचा स्वामी होईल. म्हातारे असतील त्यांनी भगवद्भजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत्स्मरणात कर्तव्याला चुकू नये, हाच समाधानाचा मार्ग आहे.
– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज