भाऊ जांबुवंतराव धोटे म्हणजे मूर्तिमंत क्रोध, अंगार. १९६५ ते १९७५ हा भाऊ जांबुवंतराव धोटे यांचा काळ होता. त्यांच्या काळात विदर्भ राज्याचे आंदोलन शिगेला पोहोचले होते. लाखोंचे मोर्चे, घेराव. पुढे जांबुवंतराव काँग्रेसमध्ये गेले आणि विदर्भाची चळवळ संपली. तसली आंदोलने, तसल्या चळवळी आता होत नाहीत. चळवळे नेतेही उरले नाहीत. आहेत त्या नेत्यांची विश्वासार्हता नाही. आता आंदोलने होतात ती निव्वळ राजकारणापुरती. त्यामुळे भाऊंचे जाणे चटका लावून जाते..
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आयुष्य झोकून देणारे विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे नुकतेच वयाच्या ८३व्या वर्षी हे जग सोडून गेले. नव्या पिढीला जांबुवंतराव धोटे कोण? हे फार माहीत असणार नाही. अन्यायाने चिडून जाणारा, दुर्बलांच्या संरक्षणार्थ हात उचलणारा, लाखालाखाची आंदोलने, मोर्चे काढणारा कुणी नेता ३५ वर्षापूर्वी विदर्भात होऊन गेला असे या पिढीला सांगितले तर त्यांचा पटकन विश्वास बसणार नाही. त्यांच्या एका आवाजावर हजारो लोक धावून येत.
भाऊंचे भाषण म्हणजे ज्वाळा असत. एका शब्दावर ‘विदर्भ बंद’ होत असे. जांबुवंतराव एकटे पायी निघाले तरी ५-२५ जण मागे कधी आले हे कळत नसे. त्यांचे पायी चालणे हे बघता बघता मोर्चा होऊन जात असे. कमांडोंच्या घे-यात फिरणारे आजचे पुढारी कुठे आणि जांबुवंतराव कुठे? विलक्षण लोकप्रियता जांबुवंतरावांना लाभली होती. अलीकडच्या काळात एक शरद जोशी सोडले तर कुण्या आंदोलक नेत्याला जनतेने एवढे डोक्यावर घेतलेले नाही. त्यांचे बलदंड शरीर, लुंगी, त्यावर पहेलवान छाप कुडता, काळीभोर दाढी आणि डोक्यावर बांधलेला केसांचा बुचडा.. जांबुवंतराव या अवतारात साक्षात भडकलेला क्रोध दिसत असत. सरकारही त्यांना टरकून असे.
१९६५ ते १९७५ हा जांबुवंतरावांचा काळ होता. स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ त्या काळात पूर्ण जोरात होती. ते समोर दिसले की, ‘व्वा रे शेर, आ गया शेर’ या गर्जनांनी आसमंत निनादत असे. हल्लीचे मार्केटिंगवाले आजच्या राजकारण्यांना असले नारे ‘कॉइन’ करून देतात. त्या पठडीतला हा नारा नव्हता. जनता जनार्दनाच्या अंतर्मनातून उठलेला हा आक्रोश होता. हा शेर बरेच काही करू शकला असता. विदर्भ राज्य त्या काळातच झाले असते. पण पुढे काँग्रेसवाल्यांच्या घे-यात तो अडकला आणि पुढे तर डिपॉजिट गेल्याचे दिवस त्यांना पाहावे लागले.
एका लढवय्याची ही शोकांतिका आहे. तरीही भाऊंचे जाणे मनाला अस्वस्थ करून जाते. ते तीनदा आमदार, दोनदा खासदार होते. पण आठवतात ती त्यांची आंदोलने, तो रुद्रावतार. गरिबांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, ते लाखांचे मोर्चे, त्या विराट सभा आता कोण करणार?
जांबुवंतरावांना राजकीय वारसा नव्हता. यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपरी या लहान गावी गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अमरावतीत कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी यवतमाळ नगर परिषदेच्या शाळेत शारीरिक शिक्षकाची नोकरी पकडली. पण नियतीला काही वेगळे अपेक्षित होते.
वर्षभरातच यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि जांबुवंतरावांनी नोकरीवर लाथ मारून राजकारणात उडी घेतली. निर्भीड वाणी आणि आक्रमक स्वभाव या कारणाने यवतमाळने त्यांना उचलून धरले. वसंतराव नाईक यांचे सहकारी जवाहरलाल दर्डा यासारख्या हेविवेट नेत्याचा त्यांनी पराभव केला आणि मग वळून पाहिले नाही. १९६२ मध्ये फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर त्यांनी यवतमाळमधून विधानसभेची निवडणूक लढवली व जिंकली. १९६४ची गोष्ट आहे.
विधानसभेत वादळी चर्चा सुरू असताना भाऊंनाही काही बोलायचे होते. पण त्यांच्या माईकचा आवाज बंद करण्यात आला होता. या प्रकाराने भाऊ एवढे संतापले की, समोरचा पेपरवेट उचलून त्यांनी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या दिशेने फेकून मारला. हादरलेल्या विधानसभेने त्यांची आमदारकी रद्द केली. गडबड केल्याबद्दल बडतर्फ होण्याची देशातली पहिली नोंद भाऊंच्या नावाने आहे. भाऊंनी पुन्हा तिथली पोटनिवडणूक लढवली आणि निवडून आले. जांबुवंतराव म्हटले की विदर्भ राज्याचे आंदोलन आठवते. पण जांबुवंतराव सुरुवातीला महाराष्ट्रवादी होते. ते विदर्भवादी कसे झाले त्याचाही इतिहास आहे.
१९६८ मध्ये विदर्भासाठी मंजूर झालेले कृषी विद्यापीठ राहुरीला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने केला. सरकारचा हा निर्णय विदर्भाच्या जिव्हारी लागला. आंदोलन पेटले. सरकारच्या या एका निर्णयाने भाऊंच्या आयुष्याची दिशा बदलली. विदर्भाचे वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते. अकोल्यात जाऊन भाऊंनी आंदोलनात जोष भरला व विदर्भ धगधगू लागला. या आंदोलनात पोलीस गोळीबारात नऊ विद्यार्थी शहीद झाले. हादरलेल्या सरकारने राज्याच्या चार भागात चार विद्यापीठे देण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा कुठे वणवा शांत झाला. अकोल्याला कृषी विद्यापीठ मिळाले आणि विदर्भाला एक लढवय्या नेता. पुढची ५० वर्षे जांबुवंतरावांनी नुसती आंदोलने केली. वादळं अंगावर झेलत हा नेता जगला.
एकच मिशन होते, विदर्भ राज्याचे. इतवारी चौकात विदर्भ चंडिका देवीची मूर्ती स्थापून ‘रंग दे बसंती’ सुरू झाले. आज विणकर औषधालाही सापडत नाहीत. पण त्या काळात नागपुरात विणकर समाज मोठया संख्येने होता. त्यांच्या मागण्यांसाठी भाऊंनी आंदोलन छेडले होते तेव्हाचा किस्सा आहे. जांबुवंतराव विणकर ओळीतील एका घरात मुक्कामाला असताना पोलीस त्यांना अटक करायला मोठा फौजफाटा घेऊन आले. ८-१० दिवस पोलीस व विणकरांमध्ये संघर्ष चालला.
अखेर अटक न करताच पोलीस माघारी गेले. आपल्या नेत्याच्या जीवासाठी बलिदान करणारे असे कार्यकर्ते आता मिळतील? भाऊंमध्ये ही जादू होती. अनेकांनी त्यांच्यासाठी वेळोवेळी प्राणाची बाजी लावली होती. १९७१ मध्ये देशभर इंदिरा काँग्रेसची लाट होती. पण ही लाट भाऊंपुढे टिकली नाही. इंदिरा लाटेतही भाऊ फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर नागपुरातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर भाऊंची लोकप्रियता खूप वाढली. नागपूर विधानसभेवर त्यांच्या नेतृत्वात लाखालाखाचे मोर्चे येत असत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ राज्याच्या मागणीसाठी कडकडीत विदर्भ बंद पाळला जाई.
आताही विदर्भवादी विदर्भ बंदचे आवाहन करतात. पण बंद होत नाही. त्या काळात काही वेगळी हवा होती. एका वर्षी त्यांनी नागपूर विधानसभेला घेराव घालण्याचे आंदोलन जाहीर केले होते. पोलीस भाऊंना अटक करायला आले. पण भाऊ सापडेनात. दुपारी भाऊ कस्तुरचंद पार्क मैदानात प्रगट झाले. बघता बघता तिथे मोठा जमाव जमला. भाऊंना बोलायचे होते. पण बोलतील कसे? व्यासपीठ, माईक वगैरे कसलीही व्यवस्था नव्हती. तिथे एक झाड होते. भाऊ त्या झाडावर सरसर चढले व त्या झाडावरून भाषण ठोकले. त्या शैलीला जगभर प्रसिद्धी मिळाली.
लोकप्रियतेचा ग्राफ कळसावर असताना जांबुवंतरावांनी गिरकी घेतली. आंदोलनाच्या राजकारणातून ते सत्तेच्या राजकारणात उतरले. १९७७ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली तेव्हा जांबुवंतरावांनी आणीबाणीचे समर्थन केले. एवढेच नव्हे तर १९७८ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाऊंचा दबका आणखी वाढला. पण विदर्भ राज्याची चळवळ संपली. अशी संपली की, गेल्या ४० वर्षात ती एक इंचही उठू शकली नाही. १९७८ची विधानसभा निवडणूक त्यांनी यवतमाळमधून स्वत: तर जिंकलीच, सोबत आपल्या १८ सहका-यांनाही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणले. १९८०मध्ये ते स्वत: नागपुरातून लोकसभेवर गेले. इंदिरा गांधी विदर्भ राज्य देतील, असा त्यांचा कयास असावा.
पण झाले उलटे. विदर्भ राज्य तर मिळाले नाहीच, उलट काँग्रेसमधील गटबाजीत त्यांची घुसमट होऊ लागली. पुढे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी काँग्रेसमध्ये जाणे लोकांना आवडले नव्हते. जांबुवंतराव जनतेच्या मनातून एकदम उतरले. नंतर जंगजंग पछाडूनही वर येऊ शकले नाहीत.
१९८० नंतरच्या काळात त्यांनी खूप निवडणुका लढवून पाहिल्या, पण अनामत रक्कम गमावण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. गोंधळलेल्या जांबुवंतरावांनी शिवसेनेत जाऊन पाहिले. पण तिथेही त्यांचे मन रमले नाही. दरम्यानच्या काळात त्यांचे जवळचे सहकारी त्यांना सोडून गेले होते. त्यांचा स्वत:चा करिश्माही संपला होता. २००२ साली त्यांनी ‘विदर्भ जनता काँग्रेस’ नावाचा पक्ष काढला. पण चालला नाही. त्यांच्या जागी दुसरा एखादा नेता असता तर त्याने हाय खाल्ली असती. बरेचदा त्यांच्या आंदोलनांची टिंगल झाली. अशा परिस्थितीतही जांबुवंतरावांनी विदर्भ राज्याचे आंदोलन आपल्या परीने चालू ठेवले. पण पूर्वीची विश्वासार्हता ते मिळवू शकले नाहीत.
घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेले भाऊ विदर्भाला हवे होते. भाऊ त्यांना वेगळे वाटले तेव्हा लोकांनीही पाठ फिरवली. जांबुवंतरावांना समजण्यात विदर्भाच्या लोकांनी चूक केली का? असा प्रश्न आता विचारावासा वाटतो. कारण या ‘सिंहा’ने अनेकदा भूमिका बदलल्या, पक्ष बदलले. पण एक मान्य केले पाहिजे की, या नेत्याने माती खाल्ली नाही. विदर्भ राज्याचा मुद्दा अखेपर्यंत सोडला नाही. लहानसहान प्रश्नांवरही ते रस्त्यावर आले. तब्बल दहा वर्षे भाऊंचे विदर्भावर राज्य होते. ते म्हणतील तो शब्द खोडण्याची सरकारचीही हिंमत नव्हती. इतरांप्रमाणे त्यांनाही इस्टेट बनवता आली असती.
भाऊंना हे काहीही जमले नाही. विदर्भाच्या लोकांना भाऊ समजले नाहीत की भाऊंना विदर्भ समजला नाही? कुठे गडबड झाली? या प्रश्नांच्या उत्तरात विदर्भाच्या मागासलेपणाचे उत्तर दडले आहे. भाऊ गेले. आता गरिबांची आंदोलने कोण करणार? सभोवताल पाहिले तर कुणीही दिसत नाही. महागाई, बेकारी.. कुठेही आंदोलन नाही. समस्या आहेत, नेते आहेत. पण नेत्यांची विश्वासार्हता नाही. त्यामुळे चळवळी उठत नाहीत. ही पोकळी अस्वस्थ करणारी आहे.