साहित्य विचार मंथनच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक सोहळा कल्याणमधील ज्ञानेश्वर मंदिरात झाला.
कल्याण – वाचन संस्कृती लयाला जात चालली आहे, असे कितीही म्हटले तरी ते चुकीचे आहे. अन्यथा दरवर्षी दिवाळी अंकांची भर पडली नसती. दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे मत साहित्यिक जनार्दन ओक यांनी व्यक्त केले. साहित्य विचार मंथनच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक सोहळा कल्याणमधील ज्ञानेश्वर मंदिरात झाला. या वेळी ‘प्रहार’च्या दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून गौरवण्यात आले. ओक यांच्या हस्ते ‘प्रहार’चे प्रतिनिधी संतोष गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नवसाक्षर व खेडोपाडय़ातील वाचन करणारे अनेक वाचक मला भेटतात. त्यामुळे वाचनसंस्कृती लयाला गेलेली नाही. दिवाळी अंकाने ते स्थान राखून ठेवले आहे, असेही ओक यांनी सांगितले. वाचन कमी झाले असे म्हटले जाते, मग दिवाळी अंक कसे वाढले आहेत, हे तर्क काही कळत नाही, असे ज्येष्ठ पत्रकार दत्ता कुलकर्णी म्हणाले. सासवड येथे आयोजित साहित्य संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, मग साहित्य प्रेम कमी झाले कसे म्हणता येईल, असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला. श्रोता आणि वाचक बनण्यासाठी कोणाचेही बंधन नसते.
साहित्य विचार मंथन ही साहित्य रसिकांचे विविध उपक्रम राबवणारे व्यासपीठ आहे. साहित्य विचार मंथनचा सदस्य बनण्यासाठी कोणतीही वर्गणी घेतली जात नाही. प्रेमाने जो साहित्य विचारांशी जोडला जाईल, तो मंथनचा सदस्य होतो, असे साहित्य विचार मंथनचे अध्यक्ष किरण जोगळेकर यांनी सांगितले. वाचकांचे प्रबोधन हाच ‘प्रहार’चा केंद्रबिंदू आहे. ‘शब्दाला सत्याची धार’ या संकल्पनेनुसारच ‘प्रहार’चे संपादक महेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रहार’ची टिम काम करत आहे. मागील पाच वर्षापासून वाचकाभिमुख होण्याचे काम ‘प्रहार’ने केले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. या वेळी ‘नवरंग’, ‘वयम’, ‘जलोपासना’, ‘साहित्यम’, ‘वास्तुसंस्कृती’, ‘स्पर्शज्ञान’ या दिवाळी अंकांनाही गौरवण्यात आले.