आपल्यावर कुणी प्रेम करावं, आपण प्रेमात असावं असं वाटणं वेगळं. त्यासाठी काही प्रयत्न करणं हे सुद्धा समजू शकतं. पण सतत प्रेम मिळवण्याची धडपड काही लोक करताना दिसतात.
आपल्यावर कुणी प्रेम करावं, आपण प्रेमात असावं असं वाटणं वेगळं. त्यासाठी काही प्रयत्न करणं हे सुद्धा समजू शकतं. पण सतत प्रेम मिळवण्याची धडपड काही लोक करताना दिसतात. आपल्यावर प्रेम करणा-या एकाहून अधिक व्यक्ती असाव्या असंही त्यांना वाटत असतं. एकप्रकारे ते त्या प्रेमावर अवलंबून राहतात असं दिसते. त्यांचा व्यवसाय वा नोकरी, एकंदर सामाजिक स्वास्थ्य या प्रेमावर अवलंबून असते. अशा गटामध्ये केवळ प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्ती असतात असं नाही, तर अगदी साध्या नोकरदार माणसाचाही यात समावेश असू शकतो.
काही कारणानं लहानपणी योग्य तेवढं प्रेम, आई-वडिलांचा वेळ यांना मिळाला नसतो. त्यांचं शोषण वा छळ झाला असतो. अनेकदा आपण आपल्या माणसांचे नावडते आहोत, अशी समजूत वा तसे वास्तव असेल तर मग ही सर्व मुलं मोठी झाली की लक्ष वेधून घेण्याकरता विविध प्रयत्न करताना दिसतात. एकंदर नात्याकडून त्यांच्या खूप अपेक्षा असतात.
कोणतंही नातं ते अतिशय उत्कटेनं अनुभवू शकतात. प्रेमभंग झाला की जसे लोक निराश होतात, तशी काही मंडळी एखादा मित्र वा मैत्रिणीने बोलणं बंद केलं की हे निराश होतात. या निराश होण्यामागे व्यवसायातला नफा, नोकरीतले प्रमोशन इत्यादी बाबी नसतात. नाकारले गेलो याचं दु:ख, फसवणूक आणि आपला स्वीकार कुणी करावा याची असोशी असते. अशी फसवणूक आयुष्यात वाटयाला येते आणि ते व्यवहारी जगात टाळता येणं शक्य नाही हे सुद्धा ही माणसं मान्य करत नाहीत.. या माणसांचं जगणं अवघड आहे, असं तुमच्या मनात आलं असेल ना? तसंच असतं.
आज संवेदनशीलता असणं हाच मुळी तुमच्या विरोधात जाणारा घटक आहे. साधे मानअपमान आणि फसवणूक यात अडकून पडणारी माणसं पुढे जाऊ शकत नाहीत. व्यक्तिगत आयुष्यातल्या दु:खाचा वा कोणत्याच प्रसंगाचा तुमच्या करिअरवर वा कार्यक्षेत्रावर परिणाम न होऊ देता जगणं आज आवश्यक झालं आहे. पण प्रेमावर अवलंबून राहणा-यांचं काय? प्रेम नाही म्हणजे स्थैर्य नाही, यश नाही आणि सुरक्षिततासुद्धा नाही अशा विचित्र साखळीला त्यांना सामोरे जावं लागतं. त्यातून बाहेर पडणं सोपं नाही.
तसं पाहिलं तर अशी टोकाची संवेदनशीलता आणि जगण्याचं बळ देण्यासाठी कायम नात्याची गरज असलेल्या लोकांची संख्या कमी असेल. पण ती संख्या वाढायला वेळ लागणार नाही एवढा भावनिक कल्लोळ आणि असुरक्षितता आपल्या आजूबाजूला आहे. समोर असलेली आव्हानं, ताणतणाव आणि आपली माणसं नसतील तर माणसाला प्रेमाची ओढ लागते यात शंकाच नाही. पण ओढ आणि त्याशिवाय राहणं, अशक्य होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
व्यसन असते त्यापासून आपण दूर राहू शकत नाही. प्रेमावर अशाप्रकारे विसंबून राहणारी माणसं काही जवळची माणसं दूर गेली की त्यावर काय उपाय करतात? ही त्यावर तोडगा म्हणून आणखी आठ-दहा मित्र-मैत्रिणी जोडण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करणं हे अगदी नसर्गिक आहे. पण ते करत असताना ती गरज या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यात डोकावते. त्यांचं त्यावर अवलंबून असणं अनेकदा समोरच्या व्यक्तीला नाटकी वाटतं, कधी बळजबरीचं वाटतं तर कधी भीतीदायकही!
प्रेमभंग झाला असेल तर मग विचारायलाच नको. सतत नवी व्यक्ती शोधणे आणि तिच्या प्रेमात पडणे, नवे मित्र जोडणे असे त्यांचे सुरू असते. या नात्यावर त्यांचं जीवन अवलंबून असतं ही वस्तुस्थिती असते. हे प्रेमाचे व्यसन!
आज मुलं-मुली आणि विवाहित माणसं मोकळ्या वातावरणाला सामोरे जात आहेत. अनेक माणसांशी दैनंदिन व्यवहारात येणारे संबंध, जोडीदारापासून दूर असणं, थ्रील मिळवण्याची वृत्ती अशा अनेक कारणांमुळे मानवी संबंध अधिक आव्हानात्मक तसेच गुंतागुंतीचे झाले आहेत. माणसांची तडजोड करायची वृत्ती, संयम आणि सहनशीलता हे सर्व बदलले आहे. त्याचा एक परिणाम त्याची अस्वस्थता वाढणे, मानसिक स्वास्थ्य असंतुलित होणे यात झाला आहे.
सर्वाचा फटका नात्यांना बसला आहे. मैत्र-मैत्रीण वा लग्नाच्या नात्यातही एकमेकांवर विश्वास असणे, एकमेकांमुळे आयुष्याला आधार मिळाला अशी भावना क्षणिक वा कमी काळापुरती अस्तित्वात असते, असं अनेकदा जाणवतं. अनेक कारणांनी नात्यात दुरावा येतो. प्रेमावर जगणं अवलंबून असेल वा त्यापासून कायम ऊर्जा मिळवण्याची सवय असेल तर एकटेपणाचा सामना करता येत नाही, समाधानात जगता येत नाही.
जोडीदार वा मित्र शोधण्याची व नातं तुटण्याची साखळी सुरू राहते. तसेच पुन्हा नाती जोडण्याची धडपड सुरू राहते.. ही अगतिकता आणि असुरक्षितता आपल्याला अनेक संबंधांमध्ये बघायला मिळते. या दोन गोष्टीला सामोरे जाणा-या जवळजवळ सर्व व्यक्तींच्या मनात प्रेमाविषयी एकीकडे ओढ असते तर दुसरीकडे मनात कटूता! या दोन्ही भावना उसळी घेत असतात आणि माणसे त्या कात्रीत सापडतात. माणसं नकोशी असणं जसं त्रासदायक तसंच माणसांच्या प्रेमावर आपण विसंबून राहणंसुद्धा धोकादायक आहे.
प्रेमाचं असं व्यसन आहे हे जाणवलं तर त्यातून बाहेर कसे पडाल?
योग्य समुपदेशन व सल्ला घेणं हे त्याकरता आवश्यक आहे. सन्मानानं आणि निर्भयपणे राहता यावं यासाठी प्रेम आहे. म्हणूनच स्वत:वर आणि आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या योग्यतेचं, तुम्हाला हवं असलेलं प्रेम मिळेपर्यंत संयम राखणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे.