जमाना ‘फटाफट’चा आला आहे. त्यामुळे जे फटाफट खेळणार नाहीत, ते मागे पडणार आहेत. एक काळ क्रिकेट खेळात गुणवत्तेला महत्त्व होते, मारामारीला महत्त्व नव्हते. आता एक दिवसाच्या सामन्याने आणि २० षटकांच्या सामन्याने हाणामारीला महत्त्व आले. क्रिकेट सुरू झाल्यापासून कोणी अशी कल्पना केली नव्हती की, ३१ चेंडूत १०० धावा होऊ शकतील. जुन्या काळात कसोटी क्रिकेट सामन्यात एका दिवशी नव्वद षटकांत म्हणजे ५४० चेंडूत जेमतेम २२०-२३० धावा व्हायच्या आणि त्या पुरेशा आहेत, असे मानले जायचे. कारण तेव्हा सरळ बॅटने खेळावे, असे प्रामुख्याने अपेक्षित होते; पण या पाच दिवसाच्या कसोटी सामन्यांचा वेग काळाच्या वेगाबरोबर मागे पडला. त्यामुळे अशा सलग पाच दिवस चालणा-या सामन्यापेक्षा काही वेगवान करावे, अशी एक कल्पना पुढे आली. त्यातून सुरुवातीला ६० षटाकांचा सामना (३६० चेंडू), मग ५० षटकांचा सामना (३०० चेंडू) आणि आता २० षटकांचा सामना (१२० चेंडू) असे हे प्रमाण घसरत घसरत रोज घसरतेच आहे. अनेक जणांना आठवत नसेल, की पूर्वीच्या काळी पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात तीन दिवस झाल्यावर एक दिवस विश्रांतीचा होता. अशी एकूण ६ दिवसाची कसोटी व्हायची. १९७०च्या दशकात ही सुट्टी बंद करण्यात आली आणि सलग पाच दिवस सामने खेळवले जाऊ लागले; पण आता लोकांना एवढा वेळ बसायला वेळ नाही. मग अस्सल क्रिकेटऐवजी कमअस्सल क्रिकेटची टूम या ५० षटकांनी आणि २० षटकांनी सुरू झाली. त्यातून फटाफट क्रिकेटचा जन्म झाला. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या एक दिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए.बी. डेव्हिलियर्स याने ३१ चेंडूत १०० धावा चोपून काढल्या. त्याच्या एकूण १४९ धावा ४४ चेंडूत आहेत. त्यात १६ षटकर आणि ९ चौकार. १७ चेंडूत त्याने अर्धशतक केले आणि शतक पूर्ण करायला त्याला चौदा चेंडू पुरेसे ठरले. लोकांचे पैसे वसूल झाल्यासारखे वातावरण अशा क्रिकेटने निर्माण होते. तसे ते पैसे वसूल झालेही असतील. या पूर्वी कोरी अँडरसनने ३४ चेंडूत शतक केले होते आणि शाहीद अफ्रिदीने ३७ चेंडूत. आता ३१ चेंडूत शतक झाले. आता हा विक्रमही कोणीतरी मोडेल. कदाचित वेस्ट इंडिजचा गेलच मोडेल. कारण चेंडू उचलून प्रेक्षकांत फेकून देण्याची क्षमता ज्याच्या बॅटमध्ये आहे. तोच असे विक्रम करू शकेल; पण या फटाफट क्रिकेटमध्ये तात्पुरते मनोरंजन होते. खेळाडूंचा कस लागत नाही. ५० षटकांत संघातल्या सर्व खेळाडूंना खेळावेसुद्धा लागत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाचा कणखरपणा आणि गोलंदाजाची ताकद याचा कस लागायचा. आता ५० षटकांच्या सामन्यात जास्तीत जास्त १० षटके टाकावी लागतात आणि २० षटकांच्या सामन्यात अवघी ४ . त्यामुळे वेगवान गोलंदाजांचा कस लागत नाही. अशा सामन्यांची सवय झाल्यामुळे कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज आणि खेळपट्टीवर दिवसभर उभे राहण्याची क्षमता असलेला फलंदाज यांची दमछाक होते. ऑस्ट्रेलियाच्या दौ-यात भारतीय खेळाडूंचे काय झाले आहे, हे आपण पाहत आहोत. त्यामुळे फटाफट क्रिकेट टिकाऊ कमी आहे, दिखाऊ जास्त आहे.