वाराणसीच्या नागरिकांनी भारताची महान सांस्कृतिक परंपरा जोपासावी, असे आवाहन कॉँग्रेस नेते व केंद्रीयमंत्री मनीष तिवारी यांनी शुक्रवारी केले.
वाराणसी- पवित्र शहर असलेल्या वाराणसीतील नागरिकांनी फुटीरतावादी शक्तींना थारा देऊ नये. लोकसभेची निवडणूक ही विचारधारेची लढाई आहे. वाराणसीच्या नागरिकांनी भारताची महान सांस्कृतिक परंपरा जोपासावी, असे आवाहन कॉँग्रेस नेते व केंद्रीयमंत्री मनीष तिवारी यांनी शुक्रवारी केले.
या लोकसभा निवडणुकीत विचारधारेची लढाई लढली जात आहे. वाराणसीची भूमी हा चांगल्या विचारधारेची जननी आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी फुटीरतावादी शक्तींना दूर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
मोदींच्या रोड शोबाबत ते म्हणाले की, त्यांच्या रोड शोसाठी गर्दी जमवण्यासाठी आणलेली माणसे ही शहराबाहेरील होती. कॉँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना आपण स्थानिक नागरिकांनाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते.
यूपीए सरकारने त्यांच्या कार्यकाळात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना संरक्षण दिले होते. महागाई रोखण्यासाठी आम्ही मोठया प्रमाणावर प्रयत्न केले. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही दमदार पावले उचलली. भाजपप्रणीत राज्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत, अशी टीकाही तिवारी यांनी केली.
या निवडणुकीत हिंसाचाराला कोणत्याही प्रकारे थारा दिला जाणार नाही. तसे कोणी करण्याचा प्रयत्न केल्यास निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, असेही तिवारी म्हणाले.