साता-याजवळचं कासचं पठार म्हणजे महाराष्ट्रातलं स्वित्झर्लंडलड. तिथे कित्येक किलोमीटपर्यंत रंगीबेरंगी फुलांच्या रांगा दिसतात, तशाच कास पठारावरही दिसतात. सगळीकडे फुलंच फुलं नि रंगांची बहार. गुलबक्षी, जांभळा, पांढरा, निळा, पिवळा, हिरवा असे रंगांचे फटकारे आणि मधूनच ठिपके यातून फुलांचा मोहमयी गालिचाच इकडे पसरलेला असतो. या गालिचांतून निसर्गाचं ईश्वरी रूपच पाहायला मिळतं.
कासच्या पठाराबद्दल खूप ऐकलं होतं गेल्या काही वर्षात, पण मुंबईत राहून ते जमवणं जमत नव्हतं. माझ्या काही मैत्रिणींना मी खूप आग्रह करत दोन र्वष घालवली होती. ती वारीही घडावी लागते, हेच खरं. ती तशी अचानक घडली. माझ्या आठवणीत प्रथमच मी गेल्या गणेशचतुर्थीला पुण्यात होते. त्या सुटीत मी निसर्गाच्या मला माहीत नसलेल्या स्वरूपाला भेटायचं ठरवलं. लक्षात आलं की जवळच तर निसर्ग एवढे गालीचे अंथरून येणा-यांची वाट बघतोय.. कास, कासला जाऊ या. हे मनात आलं तो दिवस रविवारचा होता. पुढचा दिवस जायला योग्य-सोमवार-गणेश चतुर्थी!!! लोकं घरी राहणार म्हणजे बाहेर गर्दी कमी.
लगेचच कॉम्प्युटरवर मी कासची साइट उघडली असता समजलं की, तिथे जाण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. फी भरावी लागते. तीदेखील किती ते कळेना. असंही कळलं होतं की, दिवसाला फक्त दोन हजार माणसांनाच प्रवेश मिळतो. (मनात आलं ‘युनेस्को’ने ती जागा घेतली त्यांच्या निगराणीखाली म्हणून बरं. नाहीतर एकाच दिवशी जास्त माणसं जाऊन ती जागा खराब झाली असती.) म्हणून घाईने क्रेडिट कार्डने पैसे भरले तेव्हा कळलं की प्रत्येकी फक्त दहाच रुपये दिले मी.
दुस-या दिवशी सकाळी लवकर साता-याच्या दिशेने निघालो. जरा ढगाळ होतं. रस्त्यातही थोडा शिंपडला पाऊस. साता-यापर्यंत पटकन पोहोचलो. अजिंक्यताराच्या दिशेने जाणारा रस्ता पकडला. यवतेश्वरहून पुढे गेलो तर काही अंतरावर एक पठार लागलं. दोन्ही बाजूला पिवळ्या फुलांनी सजलेलं. मला वाटलं हेच ते कासचं पठार. काही मोटारीही थांबलेल्या होत्या. उतरून जवळून पाहिलं तर त्या पिवळ्या फुलातही तीन-चार प्रकार होते. दूपर्यंत तसलीच पिवळी फुलं दिसत होती. बारीक नजरेनं पाहिलं तर त्या पिवळ्या रंगात कुठे कुठे गुलाबी रंग दिसला. तीही अगदी लहानगी फुलं होती. कुठलंही रोपटं वीतभरापेक्षा जास्त उंच नव्हतं. फुलांबरोबर फुलपाखरंही होती. आमच्या मागून आलेल्या मोटारी आम्हाला पाहून थांबल्या. मी रस्त्यावर उभं राहूनच त्या गालिच्याचा, कॅमे-यात राहील तेवढा भाग बंदिस्त केला. मग फुलांकडे पाहत बसलो. नजर पुढे-मागे करत राहिलो.
आमच्या मागून पोहोचलेल्या मोटारीतून बरीच तरुण मंडळी उतरली होती. ती धावत फुलांमध्ये घुसली. तिथे त्यांचं फोटो शूट सुरू झालं. त्या उत्साहात पायाखाली फुलं तुडवली गेलेली त्यांना कळतच नव्हती. सगळ्या बाजूंनी डोंगर होते. फुलांचं रक्षण करण्यासाठी त्यांची रचना केली असावी. कुठंही हेच ते पठार असल्याचा बोर्ड दिसेना. शिवाय इतर मोटारी पुढे जात होत्या, त्यामुळे आपणही पुढे जाऊन बघावं असा विचार आम्ही केला. पुढे जवळजवळ पंधरा किलोमीटरवर डावीकडे एक तंबू दिसला. तिथे रस्त्यावर उभ्या काही जणांनी आम्हाला थांबवलं. रजिस्ट्रेशन पाहण्यासाठी. कासच्या पठारावर प्रवेश करत असल्याची सूचनाही दिसली. जरासं पुढे गेलो तर दोन्ही बाजूला गुलाबी-किरमिजी फुलांचा गालिचा. ‘ओ२२२हो’ असं म्हणत पुढे जात होतो. फुलांचा गालिचा संपत नव्हता. मग आधीही होतं ते काय कमी सुंदर होतं? तोही याचाच तर एक भाग होता. तितकाच सुंदर. तितकाच मन मोहवणारा. इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूने कुंपण घातलेलं होतं, तिथे नव्हतं एवढाच काय तो फरक.
जरा पुढे वनरक्षक अधिका-यांनी आम्हाला थांबवलं. ‘‘पार्किंग पुढे आहे. बाई, तुम्ही इथेच उतरा. साहेब, तुम्ही या गृहस्थांना बरोबर नेणार का?’’
‘‘मी का उतरू इथे?’’ माझा सवाल. ‘‘इथेच तर जायचंय तुम्हाला. या गेटमधून आत जायचं. हा एकच भाग खुला आहे जवळ जाऊन पाहण्यासाठी..’’ वनअधिकारी.
तेवढयात बाजूला उभ्या असलेल्या गृहस्थांनी विनंतीच्या सुरात म्हटलं, ‘‘मला पाìकगपर्यंत न्या की आणि येताना तुम्ही माझ्या गाडीतून या परत इथे. चांगलं एक ते दीड किलोमीटर दूर आहे ते.’’ ते पटण्यासारखं होतं. किती छान कल्पना होती एकमेकांना मदत करण्याची. वनरक्षक स्वत:च तसं सुचवत होते. मला ते म्हणाले, ‘‘इथून आत जा तुम्ही. आत आणखी छान आहे.’’
मी आत शिरले. व्वा. वा २२२२!! सगळीकडे फुलंच फुलं होती. रंगांची बहार होती. गुलबक्षी, जांभळा, पांढरा, निळा, पिवळा, हिरवा असे रंगांचे फटकारे आणि मधूनच ठिपके यातून किती मोहमयी गालिचा बनला होता!! तिथेही एक वनरक्षक होता. तो म्हणाला, ‘‘बाई तुम्ही जा की पुढे. साहेब सहज शोधतील आज तुम्हाला. खूपच थोडी माणसं आहेत आज. काल एवढी गर्दी होती सांगू. आम्हीपण हैराण होतो. रविवार होता ना! ३००० गाडया आणि साधारण ९००० माणसं होती इथे..’’ म्हणजे ती ‘दिवसाला फक्त दोन हजार पर्यटक’ ही बातमी खोटी होती तर. मी आणखी आत गेले. तिथे फुलांचा सागर उसळलेला होता. सारी गवतावरची फुलं. तशी त्यातली बरीचशी मी कोकणात व सह्याद्रीत फिरताना वेगवेगळ्या ठिकाणी पाहिली होती. अगदी थोडी थोडीशी. पण इथे काय जादू पसरवली होती त्यांनी एकत्र येऊन!!
माझ्या बाजूला एक तरुण मुलगा उभा होता आणि कुंपणापलीकडचा फोटो काढत होता. ते त्याला सहज जमत होतं कारण तो बराच उंच होता. मी म्हटलं, ‘‘मलाही द्या न तसाच एक काढून.’’ त्याने तसा दिला काढून. मग काहीसं पुटपुटला. मी त्याला विचारलं, ‘‘त्या हॉटेलवाल्याने सांगितलं मला की, काही नाहीये तिथे. सगळं पावसाने गेलं. माहिती नसते त्यांना की मुद्दामच सांगतात.. त्यांचं ऐकलं असतं तर या दृश्याला मुकलो असतो.. ‘‘कुठलं हॉटेल?’’ मी विचारलं. त्याने काहीसं नावही सांगितलं. तो तिथे येऊन राहिला होता. त्याच्याकडे एसएलआर कॅमेरा होता. खरं तर साता-यातल्या हॉटेलांनी तिथे राहणा-यांना सगळी माहिती नीट द्यावी. टॅक्सी पाहून द्यावी. रजिस्ट्रेशन करून द्यावं आणि त्या सगळ्याचे पैसेही घ्यावे. लोकं आनंदाने देतील. इथे तर प्रकार उलटाच होता. ‘‘व्वा! किती सुंदर आहे हे सगळं. मला आज खूप मस्त आठवणी साठवता येतील. मी हा कॅमेरा घेतला त्याचं सार्थक झालं..’’ तो खूप समाधानाने बोलत होता. त्याला आवड होती, हौस होती आणि ऐपतही होती. परत जाताना तो मला परत भेटला तेव्हा त्याचं मन, कॅमेरा आणि डोळे सगळं तृप्त दिसत होतं.
तिथे हळूहळू जास्त माणसं जमत होती, तरीही सुमारे शंभरपेक्षा जास्त नव्हती. त्यातल्या त्यात तरुण मंडळी जी या जागेला पाहण्यासाठी खूप उत्सुकतेनं आली होती व ज्यांना निसर्गाची खरी ओढ होती, ते खूप काळजी घेत, फुलं पायाखाली येणार नाहीत अशा बेतानं चालत होती. त्यांना सगळंच ‘ऑसम’ वाटत होतं. ‘‘कित्ती सुंदर!’’, ‘‘क्या नजारा है!’’, ‘‘मस्तच!’’ अशा प्रकारचे उद्गार सगळ्या दिशांनी ऐकू येत होते. बहुतेक जण तर आल्याआल्या फक्त आ वासून सगळीकडे बघत होते. काही एकरांची ती जागा पर्यटकांसाठी राखीव होती. आणखीही अनेक एकरच्या एकर गालीचे पसरलेले होते. पण तो खराब होऊ नये म्हणून तिथे कुंपणं घालून ठेवलेली होती. शिवाय सगळीकडे रखवालदार होतेच. एका ठिकाणी काही जण आत शिरायचा करण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांना लगेच थांबवलेलं मी पाहिलं, तेव्हा मला खूप बरं वाटलं.
सगळा भाग खडकाळ होता, पाणथळ होता. मधे फुलांचे ताटवे. पठाराच्या एका टोकाला एक गावकरी बसलेला होता. तो काही पुस्तकं विकत होता. ती जरा जास्त सुंदर असायला हवी, असं मला वाटलं. (कुणातरी जाणकाराने ते मनावर घ्यायला हवं.) तो गाइड होता. आदल्या दिवशी त्याने खूप पैसे कमावल्याने तो खूश होता. आम्हाला तो सांगू लागला, ‘‘ही समोर लहान झुडुप हायेत त्यांना दर सात वर्षानी येकदा फुलं येतात. आता ती पुढच्या वर्षी येतील..’’ म्हणजे पुढच्या वर्षी यायला हवं तर, मी मनात ते ठरवून टाकलं. तो सांगतच होता, ‘‘दर पंधरा दिवसांनी या फुलांचे रंग बदलतात. आता या नंतर पिवळी फुलं दिसतील. मग पांढरी, नंतर निळी..’’ निसर्ग किती वेगवेगळी रूपं दाखवत होता! जमलं तर याच वर्षी परत यायला हवं.
‘‘ए, आता मी गणपतीसारखा झोपतो, माझा फोटो घ्या.’’
‘‘साहेब, कपडे खराब होतील.’’
‘‘होऊ देत. ए, काढा रे. चांगला यायला हवा बरं.’’
पांढ-या कपडयातले सरकारी साहेब गणपतीसारखं दिसण्याचा खुळा प्रयत्न करत होते. मला दिसत होता तो निसर्गरूपातला गणपती त्यांना दिसण्याची शक्यता नव्हती. माझ्या देवाने-गणपतीने-फुलं उमलवली होती. सौंदर्य वाढवत होती. हे स्वत:चे स्वत:च झालेले गणपती ती तुडवत होते. सौंदर्य कमी करत होते. पांढ-या नेहरू शर्ट-चुडीदारमधला तो गृहस्थ शेषशायी भगवानासारखा पहुडला होता. हुजरे त्याचं कौतुक करत होते. त्यांच्या ओरडयाने फुलंही डिस्टर्ब होत असावीत.
‘‘माझी पोझ छान आहे ना. आता घे.’’ दुसरीकडे तो व ती पोझेसमधे एकमेकांचे फोटो काढत होते. फुलांनी घेतलेल्या पोझेस त्यांना दिसतच नव्हत्या. फुलांना तुडवणं चालूच होतं. ‘‘आहनू, आनिरुद्ध इकडे या. सो मेनी नाइस फ्लॉवर्स आर हियर.’’ एक आई ओरडली. फुलांच्या गालिच्यावरची दुसरी काही ‘नाइस’ फुलं मुलांनी धावताना दुखावली.
मी त्या कत्लेआममधून बाहेर पडून पुढे खालच्या बाजूला तळ्याकडे गेले. तिथे चहाच्या एका टपरीपाशी (तेवढं एक बरं होतं की त्या गालिच्याच्या आसपास काही खायला-प्यायला नव्हतं. तिथे घाण झाली असती. तरीही कचरा उचलायला माणसं होतीच तिथे.) एक म्हातारा गावकरी भेटला. त्याच्याशी बोलताना तो म्हणाला, ‘‘आता बगा दर आठवडयाला येगळा रंग. चंदेरी, सोनेरी..’’ माझ्या ‘कधीपर्यंत ही जादू दिसणार?’ या प्रश्नावर तो म्हणाला, ‘‘सांगता येत नाही तसं. ढगाला हवा राहील, तोवर ही फुलं राहतील. जमीन खडकाल आहे. ऊन पडलं की पानी सुकनार. मग फुलं संपनारच की.. निसर्ग माऊलीचं काय सांगावं कुनी?.. पूर्वीपासून बगतच होतो की आमी ही फुलं. कोन ती चार डाकतर मानसं आली आनी यो सगला झाला..’’ तिथेच एक तरुण होता. तो म्हणाला की, ते अजूनही दर आठवडयाला वर जाऊन फुलांचं बदलतं रूप पाहतात. आता खूप परदेशी लोकंपण येतात. ते कोणत्याशा कंपनीनं (युनेस्कोने ही जागा जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.) फुलांची काळजी करायला सुरुवात केली, हे बरीक ठीक झालं, नाही तर इथे एवढयातच सिमेंटचे मळे उभे राहिले असते भोवती. विचार करायला लावणारं विधान होतं त्याचं.
परतताना मनातले विचार थांबले नव्हते. निसर्गाच्या किती जवळ होते मी! ईश्वराचंच एक रूप पाहायला मिळालं होतं. ती लहान फुलं होती तसेच आपणही सगळे होतो. त्याने तयार केलेल्या निसर्गाचा एक भाग! एकटं फूल किती लक्षातही न येण्यासारखं. त्याचं असणं अलक्षणीय. पण एकत्र येऊन किती सुंदर गालीचा विणला होता त्यांनी! एकजुटीतली शक्ती तिथे दिसत होती. मानव आणि निसर्ग यांचं नातं जवळून पाहण्याचा तो समारंभ किती लोकांना मनापासून समजला होता कोण जाणे!