फ्रान्समध्ये पॅरिसच्या रस्त्यांवर गेल्या रविवारी हजारो लोकांनी निदर्शने केली. कारण होते ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा होलांद यांनी केलेल्या नव्या कायद्यांचे.
फ्रान्समध्ये पॅरिसच्या रस्त्यांवर गेल्या रविवारी हजारो लोकांनी निदर्शने केली. कारण होते ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा होलांद यांनी केलेल्या नव्या कायद्यांचे. समलिंगी विवाहांना मान्यता देणा-या आणि गर्भपातावरील निर्बंधांना शिथिल करणा-या या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या या आंदोलकांची संख्यादेखील प्रचंड होती. अधिकृत आकडय़ानुसार सुमारे दोन लाख, तर आयोजकांच्या म्हणण्यानुसार पाच लाख लोक रस्त्यांवर उतरले होते.
फ्रान्समधील पारंपरिक कुटुंबव्यवस्था या कायद्यांमुळे नष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे होते. कुटुंबामध्ये मुलांसाठी एक माता आणि एक पिता हेच सर्वोत्तम समीकरण असून समलिंगी कुटुंबामध्ये असलेले दोन पिता आणि दोन माता हा प्रकारच कुटुंबव्यवस्थेला छेद देण्याची भीती हे निदर्शक व्यक्त करत होते. होलांद यांच्या बहुतेक धोरणांनाच त्यांचा विरोध होता. फ्रान्समध्ये लिंगभेद नष्ट करण्यासाठी शाळांमध्ये सुरू केलेले कार्यक्रम बंद करण्याची त्यांची मागणी होती.
फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात इतक्या मोठय़ा प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरण्याची ही घटना तशी दुर्मीळच म्हणावी लागेल. त्यांनी केलेले आंदोलन बरोबर की चुकीचे हा वादाचा विषय ठरेल. याबाबतीत भारतातील आणि परदेशातील लोकांचीही मते भिन्न असू शकतील. पण कुटुंबव्यवस्था टिकून राहावी, ती नष्ट होऊ नये, यासाठी धरलेला आग्रह लक्षात घेतला पाहिजे. या आंदोलनाबाबत फ्रान्समध्ये आणि इतरत्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. हे आंदोलन करणारे बुरसटलेले, जुन्या विचारांचे आहेत. त्यांना नव्या सुधारणा नको आहेत. त्यांना अश्मयुगात जायचे आहे, अशी टीकाही करण्यात आली. या आंदोलनामध्ये काही प्रमाणात वांशिक घोषणाबाजीही करण्यात आली. त्यामुळे फ्रान्समधील कट्टरवाद्यांचे हे आंदोलन होते की काय, असा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. पण त्यांच्या आंदोलनाची योग्यायोग्यता ठरवण्यापेक्षा त्यांनी उपस्थित केलेला कुटुंबव्यवस्थेचा मुद्दा विचारात घ्यावा लागेल.
सहजीवन आणि अपत्यांचे संगोपन हे कुटुंबव्यवस्थेच्या निर्मितीचे उद्देश आहेत. उत्क्रांतीनंतर समूहाने राहायला लागलेल्या मानवाला या व्यवस्थेचे फायदे लक्षात आल्यानंतर ही व्यवस्था रूढ होत गेली आणि त्यातून मानवाचा विकास होत गेला. अगदी आधुनिक काळापर्यंत ही व्यवस्था टिकून असली तरी प्रगत देशांमध्ये काळानुरूप होत गेलेल्या बदलांनुसार कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत असल्याचेच दिसत आहे. विवाहानंतर काही वर्षातच कोणत्या ना कोणत्या कारणाने होणारे घटस्फोट ही बाब परदेशात नित्याचीच बनली आहे, पण त्यातून निर्माण झालेल्या समस्यांकडे त्यांनी कधी लक्ष दिल्याचे किंवा त्याबाबत ओरड केल्याचे आठवत नाही. म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा एक भाग म्हणून कोणत्याही बंधनांना जुमानायचे नाही किंवा आधुनिकतेच्या नावाखाली ठरावीक काळासाठी तात्पुरते नातेसंबंध प्रस्थापित करून ते तोडून टाकायचे, या प्रकारांचे वावडे त्यांना कधीच नव्हते, मात्र आता फ्रेंच सरकारने समलिंगी विवाहांना मान्यता दिल्यावर तेथील नागरिकांना पारंपरिक कुटुंबव्यवस्थेबाबत आणि तिच्या फायद्यांबाबत जाग आली आहे.
परदेशात काय किंवा भारतात काय सध्या जे प्रकार घडताना दिसत आहेत, त्यांच्या कारणांचा शोध घेतल्यावर या घटनांना कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी हाही एक घटक असल्याचे लक्षात येईल. घडणारे गुन्हे, हरवलेली माणुसकी आणि लोकांमध्ये असलेली एक प्रकारची असुरक्षित भावना या सर्वामागे तकलादू कुटुंबव्यवस्था असल्याचे लक्षात येईल. काही वर्षापूर्वी अमेरिकेत काही बालकांना ठार करणा-या किशोरवयीन मुलाचे संगोपन योग्य प्रकारे झाले नसल्याचा निष्कर्ष त्याच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी काढला होता. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणा-या बहुतेक लोकांचा पूर्वेतिहास तपासल्यावर त्यामागे हेच कारण दिसून आले आहे. दुसरीकडे एखाद्या भरकटलेल्या किशोराला संकटातून बाहेर काढण्याचे, त्याला मार्ग दाखवण्याचे कामही भक्कम कुटुंबव्यवस्थेतील आई-वडील करू शकत असतात. अगदी कमी वयात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यामुळे यशाची नशा डोक्यात भिनलेल्या जस्टीन बिबर या तरुण गायकाने हीच भावना काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. ज्या प्रकारे तो एकामागून एक वादग्रस्त प्रकरणात अडकत चालला होता, त्या वेळी त्याच्या आईने आणि नंतर त्याच्या वडिलांनी त्याला धीर दिला नसता, तर चित्र काही वेगळेच दिसले असते. त्यामुळेच यापुढील काळात या दोघांनी दिलेल्या पाठबळाच्या आधारावर चांगल्या मार्गावर चालण्याची आशा बिबरने व्यक्त केली आहे. एकंदरच हळूहळू आई-वडील त्यांचा पाठिंबा यांचे महत्त्व मुलांच्या लक्षात येऊ लागले आहे. तर दुसरीकडे आपली हरवत चाललेली पारंपरिक कुटुंबपद्धती आपण जपली पाहिजे हे भानही आता त्यांच्यात येऊ लागले आहे. अनियंत्रित राजेशाही मोडीत काढून जगाला एक वेगळी दिशा दाखवण्याचे काम यापूर्वी फ्रेंच राज्यक्रांतीने केले होते. काही दिवसांपूर्वी झालेले आंदोलन वादग्रस्त असले तरी त्यानिमित्ताने ढासळणा-या कुटुंबव्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण करणा-या एका चळवळीची ही नांदी म्हणावी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.