जहांगीर कलादालनात शुभा वैद्य यांचे स्त्रीजीवनाच्या भावमुद्रांचे प्रदर्शन सुरू आहे. पुढच्या आठवडय़ात शरद तावडे यांच्या रंगलेखनाचे प्रदर्शन सुरू होणार आहे. ही दोन्ही प्रदर्शने स्वतंत्र असली तरी या दोन्ही कलावंतांनी एकाच मालिकेत चित्रबद्ध केलेली संगती‘वि’संगती अधोरेखित करणारी आहे. ही दोन्ही प्रदर्शने आपले वेगळेपण अधोरेखित करणारी आहेत.
ठाणे येथील प्रसिद्ध रंगलेखक शरद तावडे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात १० ऑगस्टपासून सुरू होणार असून, ते १६ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या रंगलेखनात त्यांनी आपल्या अवतीभवती दिसणा-या वस्तूंद्वारे त्यांची जगण्याची गोष्ट विणण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वस्तूंचे एकमेकांशी असणा-या अधिक-उणेपणातून द्वैत ‘अ’द्वैत’ असा वेगळा भावबंध त्यांनी आपल्या रंगलेखनातून साकारला आहे.
या चित्रप्रदर्शनाबाबत शरद तावडे यांनी रंगलेखनाची भूमिकाही स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, ‘‘आपल्या प्रत्येकालाच आपापल्या आयुष्यात आपल्या दैनंदिन व्यवहारातून केवळ आणि केवळ आपली प्रगती अपेक्षित असते व ते स्वाभाविक आहे.
किमान आपला तसा प्रयत्न तरी असतोच. आहे त्यापेक्षा चांगलं आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचाच असतो. अशा प्रयत्नात यश किंवा अपयश काहीतरी एक पदरात पडते. ही सगळी धडपड, कसरत करणे वाटते तेवढे सोपे नसते. म्हणूनच सुखी-समाधानी माणूस शोधूनही सहसा सापडत नाही. तसा तो दुर्मीळच.
या प्रवासात सामान्यपणे आपण जर काही शोधत असू, तर तो असतो आनंदाचा क्षण, ज्यामुळे नव्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपली हिंमत, ताकद, सहनशक्ती, प्रातिकारशक्ती वाढते. अनेक प्रकारे हा आनंद मिळवण्याचे आपले प्रयत्न सुरूच असतात. व्यक्तिगणिक त्याचे रूप, मार्ग, परिणाम बदलत असतात. ते योग्य की अयोग्य हा वेगळा चर्चेचा विषय, पण आपल्याला हे क्षण हवे असतात.
मॉल्समध्ये, पाटर्य़ामध्ये, सिनेमा, पर्यटन, या ना त्या अनेक मार्गानी आपापल्या कुवतीनुसार, ऐपतीनुसार तो आनंद मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करीत असतो, परंतु सगळ्या प्रकारांमधून मिळणारा आनंद क्षणिक असतो. तात्पुरता असतो. या आनंदाच्याही पलीकडे एक आनंद आहे, ज्याची अनुभूती शब्दात वर्णन करणे शक्य नाही.
अशी अनुभूती, असा अलौकिक अनुभव केवळ तेव्हाच येऊ शकतो, जेव्हा आपण आपलं स्वत्व बाजूला सारून समोरच्या अस्तित्वाशी एकरूप होतो. द्वैताकडून नेणारी ही समरसता अंतिमत: अलौकिक आनंदाची अनुभूती देऊन जाते. अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी, अंतिम परिणाम साधण्यासाठी, जीवनाचा, आपल्या अस्तित्वाचा अर्थ उमगावा वाटत असेल, तर द्वैताचे अद्वैत होणे अपरिहार्य आहे.
आपण करीत असलेल्या कोणत्याही स्वरूपाच्या कार्यात, आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यात, जपून ठेवाव्याशा वाटणा-या नातेसंबंधात अगदी कुठेही, जोपर्यंत आपण समोरच्या अस्तित्वाशी अंतर्बाहय़ समरस होत नाही, तोपर्यंत अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. जगाला व्यापून टाकणारा एखादा शोध असो की एखाद्या लहान बाळाशी करावीशी वाटणारी सलगी असो, समर्पणास पर्याय नाही. असा विचार करता करता, मला माझ्या आजूबाजूला सामाजिक व खासगी पातळीवर अशी अनेक उदाहरणं दिसली ज्यांनी स्वत:ला विसरून त्यांच्या कार्यात वाहून घेतले.
उदाहरणांचा हा प्रवाह मला माझ्या आजूबाजूच्या सचेतन आयुष्यापासून अचेतन वस्तूंकडे घेऊन गेला. मग मला गंमत वाटली व कमालही. एकरूपतेचा, समरसतेचा नेमका हाच संदेश या वस्तू देत होत्या. जणू एकमेकांशिवाय आपले आयुष्य कवडीमोलाचेही नाही, असे सांगत होत्या त्या एकमेकांना.
साधा कपडे वाळत घालताना त्यांना लावायचा चाप पाहा. ते एकमेकांना घट्ट धरून राहतात तेव्हाच त्यात कपडे अडकू शकतात. नट-बोल्ट एकमेकांमध्ये तंतोतंत बसले तरच त्यांचे इप्सित साध्य होते. पकड, कैची, गीअर्स, घंटा अशा एक ना अनेक जोडय़ा. एकमेकांशिवाय अपूर्ण असणा-या, जणू प्रियकर-प्रेयसीचा प्रणयच.. द्वैताकडून अद्वैताकडे नेणारा.’’
रंगलेखकाने मांडलेल्या वरील भूमिकेवरून या प्रदर्शनातील कलाकृतींच्या अंतर्मनात दडलेले भाव चटकन डोळ्यापुढे येतात. ही भूमिका बाजूला ठेवून चित्ररसिक स्वतंत्रपणे या कलाकृती बघतील तेव्हा त्या रंगलेखनातील वस्तूरूपी प्रतिमा आपल्या अवती-भवतीच्या जगण्याचे घट्ट नाते सांगून जाईल.
अनेकांना अनेक संगती आणि विसंगतीचे पदर या कलाकृतींमध्ये दिसतील. एकमेकांची संगत आहे तोपर्यंत त्या वस्तूंना उपयुक्तता असते. ते एकमेकांपासून वेगळे झाले तर त्या वस्तूंनाही अपंगत्व येते. मानवी जगणेही त्याहून वेगळे नाही. एकमेकांच्या सोबतीने, एकामेकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन मानवी मन जगण्याचे गाणे गात असते. ते आपले जीवनगाणे होते. एकमेकांशी विलग झाले तर त्या विरहाची व्याकूळता हुरहुर लावून जाते. या चित्रातील रंगलेखन असे जगण्याचे तत्त्वज्ञान सांगून जाते. हे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला जहांगीरचा उंबरठा ओलांडावा लागणार आहे.
इंदूर येथील प्रख्यात रंगलेखिका शुभा वैद्य यांच्या चित्रांचे प्रदर्शन हिरजी जहांगीर कलादालन येथे ३ ऑगस्टपासून सुरू झाले असून, ते ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनातील कलाकृतींतून शुभा वैद्य यांनी स्त्रीजीवनाच्या पारंपरिक आणि आधुनिक भावमुद्रांचे द्वंद्व सौंदर्याकित केले आहे.
स्त्रियांच्या जगण्यात येणारे वेगवेगळे भावबंध मुखवटय़ांतून सांगण्याचा शुभा वैद्य यांचा हा प्रयत्न त्यांच्या रंगलेखनाचे वेगळेपण अधोरेखित करणारा आहे. कलात्मक शैलीतून स्त्रीजीवनाची विविधांगी रूपे, पैलू सादर केली आहेत. लाल, पिवळा, निळा, हिरवा, नारंगी अशा अनेक आकर्षक रंगसंगतींनी या चित्रांना श्रीमंती बहाल केली आहे.
हे वेगवेगळे रंग फक्त चित्ररसिकांना आकर्षित करणारे माध्यम वाटत नाही. ते रंग स्त्रीसौंदर्यातील वेगवेगळ्या रंगांशी नाते सांगणारे वाटतात. चित्राच्या विषयानुसार त्या स्त्रीव्यक्तिरेखेत असणारा आनंद, उत्साह,अभिरुची, उत्कंठा, प्रतीक्षा टिपण्याचा प्रयत्न रंगलेखिकेने या रंगलेपनाद्वारे केलेला वाटतो.
त्यामुळे हे प्रदर्शन वेगवेगळ्या स्त्रियांच्या मनातील असंख्य भावभावनांचा एक कोलाज रसिकांसमोर सादर केल्याचा भास होतो. आनंदी, सुखद, चितांतूर अन् आशावादी अशा कंगोऱ्यांचे एक रम्य दर्शन प्रस्तुत चित्रमाध्यमातून रसिकांपुढे सादर केले आहे.
रंगलेखिकेने मानवी मन व निसर्ग, त्याचप्रमाणे स्त्रीच्या आसपास आढळणा-या पाळीव प्राणी व पक्ष्यांशी असणारे भावनिक नाते विणलेले दिसते. निसर्गसान्निध्यात संवदेनशील तरुणीचे भावबंध आणि त्यांची रूपे यांचे भावनोत्कट लेखनही या चित्रांचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. मन प्रसन्न करणारा शुभा वैद्य यांचा चित्रखजिना प्रत्येक रसिक व कलाप्रेमीस आवडेल असाच आहे.