कवी, नाटककार, संपादक, राजकारणी, चित्रपटनिर्माता असलेल्या आचार्य अत्रे यांची ११५ वी जयंती नुकतीच झाली. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या वर्षापासून त्याच्या नावाने मानचिन्ह देऊन विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना गौरवण्यात येतं. या वर्षी हे मानचिन्हं प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलं. त्या कार्यक्रमाचा हा वृत्तांत..
आचार्य अत्रे हे व्यक्तिमत्त्व मराठीजनांमध्ये आजही किती लोकप्रिय आहे, याचा प्रत्यय नुकताच मुंबईच्या रवींद्र नाटय मंदिर येथे झालेल्या आचार्य अत्रे मानचिन्ह वितरणांच्या कार्यक्रमात आला. मंगेश पाडगावकर, हृदयनाथ मंगेशकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांसारख्या अत्रेंचा सहवास लाभलेल्यांकडून त्याच्या खास अशा आठवणी ऐकायला मिळतील म्हणून तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्व जणांनी सभागृहात तुडुंब गर्दी केली होती.
या कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री शिरीष पै यांचे पुत्र आणि अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै यांच्या मनोगताने झाली. त्यांनी आपल्या भाषणात हा पुरस्कार देण्यामागच्या कारणांचा उलगडा करतानाच तो कुठल्या क्षेत्रातल्या व्यक्तींना दिला जातो याचीही माहिती दिली. या वेळी त्यांनी सांगितलेला एक किस्सा उपस्थितांची दाद मिळवून गेला. तो असा की, ‘सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यात १३ हा आकडा अशुभ म्हणून गणला जातो. पण अत्रेंच्या आयुष्यात या आकडय़ाला किती आणि कसं महत्त्व होतं, हे त्यांनी सांगितलं.
आपल्या जन्मतारखेवरून अत्रे यांनी पत्रकार मधुकर भावे यांना एक किस्सा सांगितला होता. ‘मी १३ ऑगस्टला जन्माला आलो आणि १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं ज्याप्रमाणे दोन चांगल्या गोष्टींमध्ये एखादी वाईट गोष्ट घडते. तसं १४ ऑगस्टला स. का. पाटील यांचा जन्म झाला.’ हा किस्सा भावे यांनी सांगताच सभागृहात हास्याची एकच लाट उसळली. भावे यांनी पत्रकार, राजकारणी म्हणून अत्रेंमधले गुणविशेष सांगितले.
‘मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण आचार्य अत्रे यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मला फार महत्त्वाचा वाटतो. कारण या पुरस्कारासोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे,’ अशी कृतार्थ भावना कविवर्य मंगेश पाडगावकरांनी व्यक्त केली. अत्रेंनी मला तू खूप मोठा कवी होशील, हा दिलेला आशीर्वाद मी कधीही विसरू शकणार नाही, असं सांगत त्यांनी अत्रे यांच्या ‘समीक्षक’ मासिकात प्रसिद्ध झालेली त्यांची कविता आणि त्यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
याच कार्यक्रमात अत्रेंच्या ‘विनोद गाथा’ या पुस्तकाच्या सहाव्या सुधारित आवृत्तीचं, शिरीष पै यांच्या ‘थोडे हायकू’ आणि चित्रकार अनिल दाभाडे यांच्या ‘विनोद गांभीर्य’ या विडंबनात्मक काव्यसंग्रहाचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
दोन्ही मान्यवरांनंतर हृदयनाथ मंगेशकरही अत्रेंबद्दलच्या आठवणी सांगतील, अशी श्रोत्यांची अपेक्षा होती, पण हृदयनाथांनी भाषण न करता केवळ पाडगावकराचं अभिनंदन केलं आणि त्यानंतर इतरांचे आभार मानले. हृदयनाथ का काही बोलले नाहीत, याबाबत सभागृहातल्या उपस्थितांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं. आत्रेय संस्था आणि आचार्य अत्रे कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आचार्य अत्रेंच्या कन्या ज्येष्ठ कवियत्री शिरीष पै यांनीसुद्धा व्यासपीठावर येणं का टाळलं, याहीबाबत रसिकांमध्ये कुजबूज सुरू होती.
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘दुनियादारी’ हा सिनेमा फारच गाजतोय. सिनेमाचा प्रभाव म्हणून ज्यांचा साहित्याशी फारसा संबंध नाही, अशा व्यक्तींनीही लेखक सुहास शिरवळकरांबद्दल तपशीलवार जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला शिरवळकरांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर http://suhasshirvalkar.blogspot.in या ब्लॉगवर नक्की भेट द्या. या ब्लॉगचं वैशिष्टय म्हणजे तिथे शिरवळकरांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांच्या यादीबरोबरच त्यांच्या पुस्तकाला असलेल्या अपर्णपत्रिका, त्यांच्या निधनानंतर विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या इत्यादी मजकूर इथे वाचायला मिळतो.
बाजारात आलेली नवीन पुस्तकं
अक्षर प्रकाशन
मितुले आणि रसाळ – डॉ. आनंद नाडकर्णी
लालबत्ती – विजय खाडिलकर
सुरेश एजन्सी
तो येतोय – प्रवीण दवणे
मूक संवाद – रामदास फुटाणे
अंधारातले दिवे – अरुणा ढेरे
मैत्रेय प्रकाशन
खवय्यांचे अड्डे.. प्रांतोप्रांतीचे!- विष्णू मनोहर
वृद्धाश्रम नव्हे आनंदाश्रम – उषा टोळे