पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सहरानपूर येथे इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी एजाज शेख याला अटक केली. या अटकेने पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटासह काही मुख्य घातपाती कारवायांवर नवा प्रकाश पडणार आहे.
पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सहरानपूर येथे इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी एजाज शेख याला अटक केली. या अटकेने पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटासह काही मुख्य घातपाती कारवायांवर नवा प्रकाश पडणार आहे. या सगळ्या घातपाती कारवायांमध्ये प्रत्यक्ष बॉम्बस्फोट करणारे, बॉम्ब ठेवणारे पकडले जातात पण त्यामागील सूत्रधारांचा छडा लावणे खूप कठीण बाब असते. कारण त्यांना कोणी ओळखत नसते, ते सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगत असल्यामुळे त्यांच्याकडे कोणी संशयाने पाहत नाही की, त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल नसल्यामुळे त्यांचा रेकॉर्डही नसतो.
दहशतवादी संघटनेत अनेक उच्चशिक्षित तरुणही असतात. एमआयचा अलीकडे अटक करण्यात आलेला एजाज एजाज शेख हा २७ वर्षाचा तरुण पुण्याचा रहिवासी आहे. तो सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होता. तो इंडियन मुजाहिदीन संघटनेच्या काही म्होरक्यांच्या संपर्कात आला आणि नंतर घातपाती कारवायांमध्ये ओढला गेला. या संघटनेचा एक हस्तक मोहसीन चौधरी याचा तो नातेवाईक आहे. त्याला माहिती तंत्रज्ञानातील माहिती असल्याने त्याच्यावर तशीच कामे सोपवण्यात आली.
दिल्लीच्या जामा मशिदीच्या परिसरात झालेल्या स्फोटानंतर त्याने विविध माध्यमांना या स्फोटांची जबाबदारी घेणारे ई-मेल पाठवले. आपल्या संघटनेनेच हे स्फोट केले आहेत, असा हा संदेश पाठवून त्याने त्या खाली आपले नाव ‘अल अरबी’ असे टाकले होते. तो २०१० पासून या संघटनेच्या संपर्कात होता; पण २०१३ साली तो दहशतवाद्यांसाठी सिमकार्ड मिळवून देणे, अशी संदेश वहनातली कामे करायला लागला होता. त्याने जर्मन बेकरी स्फोटात सहभागी असणा-यांना बरीच मदत केली होती. जर्मन बेकरी स्फोटातला मुख्य आरोपी यासीन भटकळ याच्याकडे त्याने स्फोटके सोपवली. हीच स्फोटके जर्मन बेकरी स्फोटात वापरण्यात आली. या माहितीने जर्मन बेकरी स्फोटाच्या तपासावर अजून नवा प्रकाश तर पडला आहेच पण आता त्याला ही पिशवी पुणे स्थानकावर कोणी दिली, याचाही तपास करावा लागणार आहे.
एजाजने ज्या दुकानातून मोबाइल फोन खरेदी केला होता त्या दुकानदाराने दिलेल्या माहितीवरून एजाजचे रेखाचित्र तयार करण्यात आले होते. जर्मन बेकरी प्रकरणाला दोनदा असे नवे वळण लागले आहे. या आधी या प्रकरणात बेग याला अटक केली होती पण नंतर नंतर या प्रकरणात यासीन भटकळचे नाव प्रकट होत गेले आणि बेगला यातून मुक्त करण्यात आले.
आता एजाज शेख हे नवे नाव पुढे आले आहे. अटक होईल, असे निदर्शनाला आल्यानंतर तो सहरानपूरला गेला. तिथून तो दिल्लीला जाण्याच्या बेतात होता. दिल्लीत त्याच्यावर काही नवी कामगिरी सोपवली जाणार होती की, तिथून त्याचा नेपाळला पळून जाण्याचा बेत होता, याचा तपास सुरू आहे. अटक टाळण्यासाठी तो ज्या गावाला जायचे असेल त्या गावाला सरळ जात नसे. आपला कोणी पाठलाग करीत असेल तर त्याला आपला योग्य पत्ता लागू नये, असा त्यामागील हेतू होता. तो आताही सहरानपूरहून लखनौला जाणार होता आणि तिथून दिल्लीला जाणार होता. शेख याच्या अटकेमुळे दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या घातपाती कारवायांमध्ये आणखी किती छुप्प्या पद्धतीने कारवाई करणा-या व्यक्ती असतात, याचाही शोध घेणे आवश्यक झाले आहे.