आपलं प्रत्येक पाऊल हे सतत कोणाच्या तरी आधारानेच पडत असतं. तारुण्यात बरंच स्वातंत्र्य मिळतं, आपल्याला दाही दिशा खुल्या होतात, बंध थोडेसे सैल होतात मात्र आपल्याभोवती कुटुंब आणि मित्रमंडळीच्या आश्वासक नात्याचं वर्तुळ मात्र घट्ट असतं. किंबहुना ते तसंच असलं पाहिजे, त्यामुळेच तर भरकटण्याच्या शक्यता कमी होतात.
‘आधार’ हा शब्द तसा फक्त तीन अक्षरांचाच असला तरी त्याचा अर्थ फार गहन आहे. माणसाच्या आयुष्यात शरीराच्या दृष्य भागांमुळे जितका त्रास होतो, त्याहून अधिक त्रास अदृष्य अशा ‘मन’ या भागामुळे होतो. कुठल्याही समस्येत सर्वप्रथम अडचणीत येतं ते मानवी मन. आणि मग सुरू होतात त्या नराश्य, ताण-तणाव, एकटेपण अशा समस्या. सध्याच्या जगात या समस्यांना वयाचं बंधन राहिलेलं नाही. कुठल्याही वयातल्या मनुष्याला आता या समस्या भेडसावू लागल्या आहेत.
त्या वयानुरूप तो मनुष्य कितीही समजूतदार असला तरी होणारा त्रास मात्र स्वत: एकटय़ाला टाळता येत नाही. तरुण वयात तर अशा अनेक समस्या उभ्या ठाकतात, जेव्हा काय करावं हे कळत नाही. नेमक्या अशाच अडचणींमुळे तरुण मुलं भरकटली गेली आहेत अशी उदाहरणं आपण बरेचदा पाहतो. अशा तरुणांना गरज असते ती आधाराची, त्यातही महत्त्वाचं म्हणजे मानसिक आधाराची. आणि तो आधार प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात आधी मिळतो तो म्हणजे कुटुंबाकडून! समस्या कितीही मोठी असली तरी एका क्षणाला ती आपल्या आई-वडील किंवा अगदीच हिंमत नाही झाली तर आपल्या भावंडांना सांगावीच लागते. पण आयुष्यात काही समस्या अशा असतात ज्या, मग ती भीती असो वा परिस्थिती, काही कारणाने घरी सांगताच येत नाहीत आणि सहनही होत नाहीत.
मग पुढची सपोर्ट सिस्टीम जी सदैव आपल्यासोबत असते आणि जिथे काय सांगावं आणि काय नाही याची कसलीही आणि कधीही अट नसते. आणि हा आधार म्हणजे आपला मित्रपरिवार. शैक्षणिक, मानसिक, आर्थिक अशी कुठलीही समस्या असली तरी सर्वप्रथम बाहेरच्या या जगात ती आपण आपल्या जवळच्या मित्रांना सांगतो किंवा सांगितली पाहिजे. त्यामुळे त्या क्षणाला होणारा त्रास तात्पुरता का होईना, पण कमी होतो. प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी असा मित्र असतो ज्याला आपण सगळं काही विश्वासाने सांगत असतो. आपल्या अडचणी आपण जितक्या जास्त शेअर करू तितकीच त्यावर तोडगा मिळण्याची किंवा कमीत कमी आपल्याला थोडा का होईना, दिलासा मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सततच्या स्पध्रेच्या या युगात, आधीच स्वत:ला सिद्ध करण्याची तारेवरची कसरत करताना, ही अनपेक्षित ओझी आपल्या जवळच्या माणसांशी शेअर केली तर त्या तारेवरून तोल जाऊन पडण्याचा धोका टळू शकतो. आपल्याला वाटलं की आपण कितीही खंबीर आहोत तरीही आपल्या समस्यांबद्दल बोललं पाहिजे. पण याचा अर्थ असाही नाही की पूर्णपणे परावलंबी होऊन जावं. शेवटी आपल्या समस्यांवर तोडगा हा आपण आपलाच आपल्या बुद्धीने ठरवायचा असतो.
शाळा-कॉलेजांमध्ये आपल्याहून मोठय़ा आणि आपल्याला समजून घेऊ शकतील अशा शिक्षक मंडळींशी आपण अभ्यासतल्या समस्यांबद्दल चर्चा करू शकतो. पुढे नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा आपल्याहून अनुभवी अशा सीनिअर्सशी आपण चर्चा करू शकतो. महत्त्वाचं काय, तर आपल्या समस्यांबद्दल आपण आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तींशी आपण चर्चा केली पाहिजे. आणि हे लहान वयात जरी भीतीमुळे होत नसलं तरी वाढत्या वयानुसार जमलं पाहीजे. त्यामुळेच मनावरचा ताण हलका होऊन शांत चित्ताने विचार करण्याची आणि कृती करण्याची संधी मिळते. अलीकडे अनेक सामाजिक संस्थाही तरूणांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्याकडेही मदत मागू शकता.
एकटेपणाने एका मर्यादेनंतर सद्विवेकबुद्धी काम करणं थांबवते आणि मग नको त्या कल्पना मनात येत राहतात. तेव्हा आपलं कुटुंब, मित्रपरिवार, किंवा आधी म्हटल्याप्रमाणे कुठलीही सपोर्ट सिस्टिम आपल्याला यातून बाहेर पडायला मदत करते. अनुभव हा माणसाचा आयुष्यातला सर्वात मोठा गुरू असतो. त्यामुळे आपल्याला नवनवीन अनुभव येत असताना त्यातल्या समस्यांबद्दल त्या त्या क्षेत्रातल्या अनुभवी व्यक्तींशी सल्ला-मसलत करून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं. मग ते कौटुंबिक असो, आíथक असो वा व्यावसायिक. कारण त्या व्यक्तींनी यापूर्वी त्या किंवा तत्सम समस्यांवर तोडगा शोधलेला असतो. ते ही त्या काळातून गेलेले असतात. त्यामुळेच आपलाच फायदा होतो.
कुठलाही वाईट काळ हा फार दिवस टिकत नाही हे नेहमी लक्षात ठेवून समस्यांचा सामना करायला हवा. ‘THE BEST WAY TO FACE THE PROBLEM IS TO FACE THE PROBLEM’, असा इंग्रजी सुविचार आहे. समस्यांपासून पळत राहीलो तर त्या आपला पाठलाग करतच राहतील. त्यापेक्षा त्यांचा सामना करून त्यातून बाहेर पडण्यातच शहाणपण आहे, ज्यात आपली ही सपोर्ट सिस्टिम किंवा आधार व्यवस्था म्हणवल्या जाणा-या व्यक्तींची आपल्या या कठीण काळात नेहमीच आपल्या सोबत असते. आपण एकटे आहोत ही भावना बळावू न देता समस्यांवर उपाय काढण्यासाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या पर्यायांचा विचार करणं हा सरळ मार्ग आहे. तो अवलंबत गेलो की आयुष्याच्या कुठल्याही समस्यांचा आपल्या माणसांच्या सहाय्याने आपण सामना करू शकतो. एखादं तरुणांना मदत करणारं मंडळ तुम्ही स्वत:ही स्थापन करू शकता. तेव्हा मदतीचा हात आयुष्यात सर्वात महत्त्वाचा हे विसरू नका!