भाद्रपद हा उत्तरायणातला तिसरा महिना. या काळात भूक हळूहळू वाढत जाते. त्यामुळे थोडंथोडं जड अन्न या काळात खायला सुरुवात करायला हरकत नसते. मात्र या अन्नात कंदमुळांचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे.
गोकुळाष्टमी झाली की, गणपतीच्या आगमनाचे वेध लागतात. यंदा मात्र भाद्रपद मास अजून सुरू व्हायचा आहे. यावर्षी भाद्रपद अधिक मास आहे. श्रावण संपला तरी मधेच पाऊस आषाढात पडतो, त्याप्रमाणे पावसाच्या सरी बरसत आहेत. आता श्रावणासारखा ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. हळूहळू पूर्वेकडे पांढरे ढग दिसू लागले आहेत. अशा या वातावरणात बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागेल. भाद्रपद हा उत्तरायणातला तिसरा महिना. या काळात भूक हळूहळू वाढत जाते. त्यामुळे थोडंथोडं जड अन्न या काळात खायला सुरुवात करायला हरकत नसते. कंदमुळं पचायला जड असतात. ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर कंदमुळांची भाजी करतात. भाद्रपदात ऋषीची भाजी मिळते. ऋषीची भाजी म्हणजेच वाढलेला लाल माठ. सर्वसाधारणत: भाद्रपदात ऋषीपंचमीच्या दिवशी या भाजीला मागणी फार असते. पण या वर्षी आताच ही भाजी बाजारात दिसू लागली आहे. या भाजीकरता वापरली जाणारी कंदमुळंही बाजारात दिसू लागली आहेत. त्यामुळे ऋषीची भाजी करताना कंदमुळांचा वापर केला जातो.
सुरण, रताळी, कोनफळ, आळूच्या मुंडल्या (अरवी), अळूची पानं, लाल भोपळा, पडवळ, घोसाळी, शिराळी, कच्ची केळी, कच्चे टॉमेटो, आंबाडी, मक्याची कोवळी कणसं, ओल्या शेंगातील दाणे, हिरवे वाटाणे इ. सगळय़ा भाज्या, दाणे, मुळं, कंदमुळं एकत्र शिजवून ऋषीची भाजी’ तयार केली जाते. यात काही जणं चवळी, गवार, ऊसही घालतात. गूळ घालत असल्याने ही भाजी फारशी तिखट नसते. यात बटाटे घातलेच तर लहान संसारी बटाटे वापरतात. शिराळीच्या शिरा काढून टाकाव्यात. कच्ची केळी, मुंडल्या, सुरण व ऊस यांची साल काढून टाकावीत. हिरव्या मिरच्या मोठय़ा चिरून घालतात. सर्व भाज्या शिजल्यावर त्यात शहाळ्यातील खोबरं किसून घालतात. ही भाजी तांदळाच्या वडय़ांबरोबर खायला मजा येते. थंड झालेल्या भाजीत दही घालून खाण्याची मजा तर काही औरच.
या दिवसांत भोपळय़ाच्या वेलीचे देठ, कच्ची पपई, तूरडाळ, मुळाही मुबलक प्रमाणात मिळतो. या चार भाज्या एकत्र करून मिक्स भाजी करता येते. ती भाजी ‘खतखते’ या नावाने ओळखली जाते. त्यात हळद, लाल तिखट, मीठ, गूळ, चिंच टाकतात. खोबर आणि तिरफळं एकत्र वाटून घातल्याने भाजीची रुचकरता वाढते.
वर सांगितलेल्या सर्व कंद तसंच रानभाज्यांत सुरण, रताळी, मुंडल्या(अरवी) या भाज्यांचं पौष्टिक मूल्य जास्त आहे.
सुरण– सर्व कंदभाज्यांत सुरण श्रेष्ठ. ज्यांना सुक्या मूळव्याधीचा त्रास असतो त्यांच्यासाठी तर ही कंदभाजी उपयुक्त ठरते. ही भाजी खाल्ल्याने मूळव्याधीच्या सुजेत रक्त साठून राहत नाही. मूळव्याधीच्या मोडातील रक्तवाहिन्यांचं संकोचन होतं. भाजी पचायला हलकी आणि गुणांनी गरम आहे. भाजी खाल्ल्याने शरीरातील वाढलेला तेलकटपणा कमी होतो. संपूर्ण पचनसंस्थेवर सुरणाचं नियंत्रण असतं. सुरणामुळे तोंडाची चव वाढते. भूक वाढते. पचनशक्ती सुधारते. वात सुटतो. यकृताचं आरोग्य सुधारून कार्यक्षमता वाढते. यामुळे यकृताची सूज कमी होते. दमा-खोकल्याच्या रोग्यांनाही सुरण चांगला. मात्र खरूज, नायटा यांच्यासारखे त्वचेचे विकार असणा-यांनी तसंच शरीरात कोणत्याही मार्गाने रक्त जात असणा-यांनी सुरणाची भाजी जास्त खाऊ नये.
रताळी– हे कंदमूळ सर्वाच्या परिचयाचं आहे. लालरंगाची साल असल्याने त्यास ‘रक्ताळू’ असंही म्हणतात. पांढ-या रंगाचीही रताळी असतात. उपवासाच्या वेळी रताळ्याचा वापर करतात. रताळी पचायला वेळ लागतो. त्यात साखर असते. त्यामुळे उपवासामुळे रक्तातली साखर कमी होत नाही. भूक चांगली लागते त्यांनी रताळी खावीत. जाडय़ा माणसांनी रताळी खाऊ नयेत. मधुमेही रुग्णांनीही रताळी आपल्या जबाबदारीवर खावीत.
मुंडल्या– पावसाळ्यात आळू फार होते. अळूच्या कंदाला मुंडल्या किंवा अरवी म्हणतात. सुरणाप्रमाणेच यकृताच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मूळव्याधीत आळूचे कांदे उपयुक्त असतात. भाजी करताना सालं काढून टाकावीत. पिष्टमय असतात त्यामुळे पौष्टिक गुणधर्म जास्त असतात. अरवी बुळबुळीत असते. त्यामुळे त्यांना चिरून पाण्यातून धुऊन घ्यावं लागतं. अरवीची भाजी गुजरातमध्ये जास्त खाल्ली जाते. भाजी करण्याची पद्धत थोडी निराळी आहे. तेलात मोहरीची फोडणी करून त्यात दोन-तीन कोकम परत घ्यायचे. नंतर त्यात कांदा परतून घ्यावा. बदामी झाल्यावर त्यात मुंडल्या टाकाव्यात. एक वाफ आली की, त्यात हळद, लाल तिखट, मीठ टाकून मिश्रण चांगलं परतून शिजवायचं. शिजल्यावर खोबरं टाकून वाफ काढून घ्यावी. कोकमामुळे यांचा बुळबुळीतपणा जातो.
तिरफळ : अनेकांची तिरफळ आणि त्रिफला यात गल्लत होऊ शकते. पण जे कोकणातील आहे त्यांचा गोंधळ उडणार नाही. त्रिफळा म्हणजे हरडा, आवळा आणि बेहडा यांचं मिश्रण. हे सौम्य विरेचन आहे. तिरफळ हे एक फळ आहे. मसाल्याच्या पदार्थात आणि खास करून बांगडा, पेडवे, हलवा या माशांच्या पदार्थात तिरफळांचा वापर प्रामुख्याने केला जातो. संस्कृतमधे या फळाला ‘तुम्बरू’ असं म्हणतात. तिरफळांना मराठीत ‘चिरफळं’ असंही म्हणतात. या फळांना मध्येच चिरा गेलेल्या असतात. फळं घोसांनी येतात. ओली तिरफळं वाटाण्याएवढी आणि हिरवी असतात. सुकल्यावर ती काळी होतात. त्यात एक काळ्या रंगाचं बी असते. ही बी काढून टाकतात. सालीची तीन दलं असतात. या फळांची झाडं विशेष करून कोकणात होतात. याचे वृक्ष काटेरी असतात. फळांमधे सुगंधी तेल असतं. सुकवलेल्या फळांना सहा एक महिने वास येतो. माशांच्या आमटीत माशांची हिवसाण कमी करण्यासाठी तिरफळं टाकतात. या फळांमुळे भाजी किंवा आमटीला एक विशिष्ट गंध येतो. या गंधामुळे तोंडाला चव येते. पोटात पाचक पित्ताचे स्रव वाढतात. त्यामुळे अन्नाचं पचन होण्यास मदत होते. पोटात गॅसेस होत नाहीत. मासे खाणार्यासाठी हे उत्तम पाचक आहे. हे फळ ग्राही म्हणजे मलाला बांधून आणणारे आहे. तिरफळं आणि ओव्याचे वाफेने काढलेले तेल हगवणीत देतात. बिया काढलेल्या फळांचं चूर्ण 125 ते 250 मि.ग्रॅ. इतक्या प्रमाणात मधाबरोबर दिलं जातात.